हिमाली मुदखेडकर
जानेवारीचा महिना सुरू झाला की, चंद्रपुरच्या वरोऱ्याचे दिवस आठवल्याशिवाय राहात नाही. Electrolux कंपनीच्या क्वार्टर्समध्ये तेव्हा आम्ही राहात होतो. रस्त्याच्या दुतर्फा इटालियन आर्किटेक्चर पद्धतीने बांधलेल्या छोटेखानी सदनिकांची ही इलेक्ट्रॉलक्सची कॉलनी खूप छान पद्धतीने बांधलेली होती. दर चार क्वार्टरमध्ये एक सुंदर लॉन मेन्टेन केलेले होते. शिवाय, घरांच्या भोवताली आंबा, पेरू, जास्वंद, लिंबू, कढीपत्ता अशी झाडे लावलेली होती.
यातील एका लेनमधील क्वार्टर्समधून आम्ही दहा-पंधरा नवविवाहित जोडपी राहात होते. ज्याचे त्याचे कुंकवाचे धनी न्याहारी करून कंपनीत गेले की, मग आम्ही सगळ्या जणी लॉनवर किंवा एखादीच्या अंगणात एकत्र जमत असू. गप्पटप्पा, गमतीजमती खूप चालत.
जानेवारी महिन्यात एखाद्या शनिवारचा किंवा रविवारचा बेत ठरायचा. आदल्या दिवशी भाजी बाजारातून चांगली वांगी आणायची, कोवळ्या सालीची… पोपटी हिरव्या रंगाची, मोठी जळगावी वांगी चांगली निवडून पारखून घ्यायची. किमान एक पोतंभर तरी वांगी घ्यावी लागायची. सोबत हिरव्या पातीचा कांदा, या दिवसात मुबलक प्रमाणात मिळणारा हिरवा पातीचा लसूण, हिरव्या मिरच्या, आले आणि नेहमीचा लाल कांदा… सगळे जिन्नस घेऊन आदल्या दिवशीच एका मोठ्या रिक्षेतून आणून ठेवायचे. दुपारी घरातील कामे आवरून एक वामकुक्षी घेऊन झाली की, मग आम्ही सगळ्याजणी साधारण 4 वाजताच्या सुमारास लॉनच्या बाजूच्या मोकळ्या जागेत जमत असू. आमच्यातली रुपाली नेहते स्वयंपाकात तरबेज होती. तिला चुलीवर स्वयंपाक करता यायचा. मग तिच्या निगराणीत पुढील कारभार सुरू व्हायचा… ती एक कोपरा निवडून तिथे विटांची भली मोठी चूल मांडून घ्यायची. तीन फूट लांबी रुंदीचा चौकोन असायचा तो विटांचा, त्यात कोळसा घालून ती तो पेटवायची. अर्थात, हे तिलाच जमायचे…
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
तिचे एवढे होईपर्यंत काहीजणींनी आदल्या दिवशी आणलेली वांगी पोत्यातून काढून त्यावर सुरीने किवा काटे चमच्याने टोचे मारून त्यांना वरून थोडे तेल माखून ठेवायचे. कोळसा एकदा का रसरसून पेटला आणि लाल भडक दिसायला लागला की, मग त्यावर ही वांगी भाजण्यासाठी ठेवायची… चांगला लालसर डाग पडला की बाजू पलटवायची. आलटून पालटून सगळीकडून वांगी छान खरपूस भाजून घ्यायची आणि वेगवेगळ्या परातीतून थंड करण्यास ठेवायची.
तोपर्यंत बाकीच्या मंडळींनी कांदे नीट चिरून घ्यायचे. पात वेगळी करून पतीच्या वर असणारे छोटे कोवळे कांदे नीट सोलून वेगळे ठेवायचे. लहान अंजिराच्या आकाराचे हे कांदे कच्चे खायला फार छान लागतात. कांद्याची पात, लसणाची पात स्वच्छ धुवून एकसारखी चिरून ठेवायची. हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घ्यायचा. कोथिंबीर नीट निवडून धुवून बारीक चिरून घ्यायची. एक मोठ्या काहिलीच्या आकाराची पसरट कढई आणि एक मोठा सराटा बिछायतवाल्याकडून सकाळीच मागवून ठरवलेला असे. ती कढई दोघी-तिघींनी मिळून चुलीवर चढवली जाई.
त्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजलेले दाणे खाली काढून घेऊन कढईत भरपूर तेल घालायचे. भरपूर म्हणजे जवळ जवळ पाच लिटर तेल घालायचो आम्ही त्यात! तेल तापले की, त्यात मोहरी, जिरे घालून छान तडतडले की, लसूण-मिरचीचा ठेचा आणि चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा.
चुलीवर एवढे होईपर्यंत काहीजणींनी गार झालेली वांगी सोलून त्याचा मऊ गर एकजीव करून ठेवायचा. पसरट बुडाच्या भांड्याने हे एकजीव करण्याचे काम सुरू असे… साधारणपणे पाच ते सात परातीभरून हा गर असे!
कांदा लसुण मिरची परतल्याचा सुंगध वातावरणात भरून जाई. त्यात आता सोलून पाखडून ठेवलेले भाजके दाणे, चिरलेली कांदा आणि लसूण पात घालून आणखी एकदा छान मिसळून घेतले जाई. चवीप्रमाणे मीठ घालून वांग्याचा गर आता त्यात आम्ही ओतायचो. आता हे सगळे मिश्रण ढवळणे एका माणसाने शक्य नसे. चारजणी चार बाजूने मोठ्या चमच्याने याला चांगले ढवळून सारखे करत भरपूर ताजी कोथिंबीर घालून भरीत तयार झाले, हे निराळे सांगावे लागत नसे. आसमंतात पसरलेला दरवळ याची एव्हाना दवंडी पिटून आलेला असे…!
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
आतापर्यंत संध्याकाळचे सात-साडेसात वाजलेले असत. भरीतात घालून शिल्लक उरलेल्या शेंगदाण्याची लसूण, जिरे आणि भरपूर तिखट घालून छान चटणी झालेली असे. आधीच ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणींनी सकाळीच घराघरातून भाकरी करून ठेवलेल्या असत. लॉनवर मग मध्यभागी मोठ्या भांड्यात हे भरीत, त्याच्या बाजूला शेंगदाणे चटणी बाजूलाच, परातीत भाकरी आणि दुपारी सोलून ठेवलेले छोटे कांदे… कुणाला लागलेच तिखट तर सोबत थोडे दही आणि सुवासाच्या दवंडीने तिथवर येऊन पोहोचलेले आम्हा सगळ्याजणींचे नवरे…
अशी सुरू होई आमची भरीत पार्टी… गप्पागोष्टी… कधी गाणी… भेंड्या… अशा गंमतीजमतीत! आपापल्या घरातून आणलेल्या ताटांमधून खाताना पदार्थांची जी काही चव लागे ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. जेवणानंतरचा पुढील साफसफाईचा कार्यभाग पुरुष मंडळी सांभाळत…
हासतखेळत, भरल्या पोटाने आम्ही सगळे रात्री साडेदहाच्या सुमारास आपापल्या क्वार्टरमध्ये परतत असू… जुने दिवस आठवले की, हुरहूर लागते… आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी घरी भरीत करून खाताना मुलांना या जुन्या गोष्टी सांगते आणि घरच्या भरीताला ती चव पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करते…


