Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!
    ललित

    Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJanuary 6, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, Bookshelf, नाच ग घुमा, माधवी देसाई, रणजीत देसाईंची पत्नी, भालजी पेंढारकरांची कन्या, माधवी देसाई आत्मचरित्र,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी देसाई यांचं ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र मी साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी वाचलं होतं, तेव्हा ते मला आवडलं नव्हतं. नंतर अनेकदा या पुस्तकाचा उल्लेख कोणी न कोणी करताना ऐकला, वाचला. फेसबुकवर या पुस्तकाबद्दल सकारात्मक पोस्ट वाचली होती. ‘पुस्तक किती छान आहे’ अशा आशयाच्या पोस्ट अन् खाली काही कमेंट्स होत्या, ज्यात रणजीत देसाई यांच्याबद्दल फारच वाईट मत व्यक्त केलं होतं. पुस्तक का आवडलं असेल? याबद्दल मला कुतूहल वाटू लागलं म्हणून पुन्हा एकदा वाचायला घेतलं…

    माधवी देसाईंच्या या आत्मचरित्राच्या चौदा आवृत्ती निघाल्या आहेत. निश्चितच वाचकांचं हे आवडतं पुस्तक आहे. माधवी देसाई या भालजी पेंढारकरांची कन्या आणि स्वामीकार रणजीत देसाई यांच्या पत्नी! त्या म्हणतात, कु. सुलोचना भालजी पेंढारकर, सौ. माधवी नरेंद्र काटकर, श्रीमती माधवी काटकर, सौ. माधवी रणजीत देसाई आणि शेवटी माधवी देसाई… हा प्रवास आहे.

    आयुष्य या भागांत वाटले गेले आहे. त्यांनी flashback  तंत्र वापरलं आहे. सुरुवातीपासून चरित्रावर घटस्फोटाची छाया मृत्यूच्या छायेसारखी गडद आहे, ज्यामुळे दु:ख शब्दाशब्दांतून जाणवत राहाते. पुस्तक वाचायला घेतल्यावर सुरुवातीपासूनच असे का घडले असावे? याचे कुतूहल वाटत राहते… जसे एखाद्या रहस्याबद्दल वाटत रहावे तसे. वडील आणि पती सुप्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे एक वलय लेखिकेभोवती आहे, त्यामुळे अधिक जिज्ञासा वाटली असावी.

    हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’

    बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, गोवा, कोवाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या राहिल्या. बालपण आजीबरोबर, किशोर वयात आईबरोबर, लवकर विवाह झाल्यामुळे पहिल्या पतीबरोबर, पतीच्या निधनानंतर मुलींबरोबर, दुसऱ्या विवाहानंतर रणजीत देसाई यांच्याबरोबर, शेवटी धाकटी मुलगी… अन् त्या एकट्या असे आयुष्य गेले. आजीबरोबर असताना तिने खूप लाड केले, पण आईविरुद्ध कान भरले. आई त्यावेळची सुप्रसिद्ध नटी आणि भालजींच्या तीन पत्नींपैकी एक! तिच्याशी सुरुवातीला फारसा संबंध आला नाही, भावबंध जुळले नाहीत. वडील सतत कामात आणि घरी इतर मुले सुद्धा असल्याने फारसे वाट्याला आले नाहीत. आधी इतर सावत्र भावंडांनी आपलेसे केले नाही. नरेंद्र काटकरांबरोबर विवाह करून देताना त्यांचं मत विचारलं नाही. नरेन्द्रांचा अबोल स्वभाव, शांतपणा यामुळे थोडासा विरस झाला. त्या म्हणतात, त्यांनी केलेली रोमँटिक गोष्ट एकच – माधवी नाव ठेवले.

    सासरी मोठा गोतावळा होताच आणि शेतीवाडी जमीनजुमला बराच असून सुद्धा सासू सासऱ्यांच्या हितासाठी घर सोडून परगावी नोकरी करायचा निर्णय घेतला, त्यांनी पतीला घ्यायला लावला! चाळीत राहावे लागले. श्रीमंती असून गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेत नोकरी सुरू झाल्यावर घर आणि नोकरी सांभाळताना झालेली तारेवरची कसरत, मुलींचं पालकत्व, पतीची चिडचिड, सर्वांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन दिवस काढावे लागले. तीन मुलींना पोरके करून पतीचा मृत्यू झाल्यावर माहेरी आणि सासरी न जाण्याचा निर्णय घेऊन एकटीने राहायचे ठरवले, तेव्हा समाजाकडून वाईट अनुभव आले, जे दुर्दैवाने एकट्या राहणाऱ्या सर्व स्त्रियांना येतात!

    नंतर रणजीत देसाई ऊर्फ दादा यांच्याशी विवाह झाला. लेखिका लिहिते, अमेरिकन कुटुंबाची सुरुवात झाली. दादांच्या दोन आणि यांच्या तीन एकूण पाच मुलींचे मातृत्व आले. दादांच्या मुली, नातेवाईक स्त्रिया यांनी आपलेसे केलेच नाही. दादांची पत्नी आणि मुलींची आई दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करताना तारांबळ उडाली आणि कोणीही संतुष्ट झाले नाही.

    ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू?’ हा खेळ आहे, ज्यात मुलींनी केलेल्या रिंगणात मधे एक मुलगी नाचत असते, तिला रिंगणाच्या बाहेर पडायचे असते आणि मुली तिला अडकवून ठेवतात. मग ती नाचू न शकण्याची कारणे देते, असा गमतीशीर खेळ आहे. लेखिका स्वतःला रिंगणात अडकलेल्या मुलीची उपमा देते. रिंगण आयुष्याचे, संसाराचे, आव्हानांचे आहे. ती आत नाचते आहे, थकते आहे… पण अडकली गेली आहे. तिला यातून सुटायचे आहे का? सुटायचे होते का? असते तर, तिने पुन्हा विवाह केला असता का? पहिल्या विवाहात असताना सुद्धा ती रिंगणात अनिच्छेने नाचत होती, मग पुन्हा डाव का मांडला?

    तिने गोवा सोडून पतीला नोकरी करायला सांगणे, एकटे राहण्याचा निर्णय घेणे किंवा पुनर्विवाह करणे यापैकी कुठलीही गोष्ट लादलेली नव्हती. दादा व्यसनाधीन आहेत किंवा मुली नव्या घरात जुळवून घेऊ शकणार नाहीत, हे माहीत असताना नवा डाव मांडला होता. मग परिणामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. संपर्कात आलेल्या बव्हंशी व्यक्तींबद्दल तक्रार करते, हे खटकते. स्वत:चे कौतुक किंवा समर्थन करण्याचा भाव दिसतो. दादांच्या पेक्षा त्यांचे भाषण प्रभावी झाले, असेही त्या म्हणतात!

    त्यांच्या प्रसिद्धीचा, कौतुकाचा दादांवर विपरीत परिणाम झाला आणि तिथे कटूपणाची ठिणगी पडली. रणजीत देसाई यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना पद्मश्री मिळाली आहे. त्यांच्या स्वामीसारख्या कादंबऱ्या मनामनात वसलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लेखिकेचे हे विधान अचंबित करते.

    लालित्यपूर्ण लिहिण्याच्या आग्रहामुळे काही प्रसंग भडक झाले आहेत. काही वेळा कांगावा सुद्धा वाटतो. इतरांच्या चुका थोड्या अधिक मोठ्या करून सांगितल्या आहेत, असे वाटत राहते. त्यामुळे आत्मप्रौढीचा वास येऊ लागतो. स्वत:च्या सौंदर्याचे, मोठ्या मनाचे, सोशिकपणाचे, सुगरण असण्याचे, कष्टाळूपणाचे, प्रेमळ स्वभावाचे, सेवाभावी असण्याचे, बुद्धिमत्तेचे, वाकपटुत्वाचे आणि इतर बऱ्याच गुणांचे वर्णन जागोजागी वारंवार येते, तेव्हा प्रश्न पडू लागतात. एकमेकींशी खेळीमेळीने राहणाऱ्या सवती, तीन ‘आई’ असण्याचा दावा बुचकळ्यात पाडतो. बाकीच्या दोघी ‘आई’ (आया हे बहुवचन लेखिकेने सुरवातीला कटाक्षाने टाळले होते, नंतर वापरले.) बिकट प्रसंगात सुद्धा मदतीला कशा आल्या नाहीत आणि आल्या असतील तर त्यांचा साधा उल्लेख सुद्धा कुठे कसा नाही?

    हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

    सोळा-सतरा वर्षांच्या मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहिल्या तर त्यांच्यासोबत राहण्याची खरंच गरज होती का? ही घुमा स्वत:हून नाचते आहे, तिला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही, असे वाटते. किंबहुना स्व-अनुकंपा करते आहे, असे वाटते.

    लेखिकेचे वडील भालजी त्यांना म्हणतात, “कादंबरीतील चार वाक्य वाचून प्रेम करणाऱ्या पोरी तुम्ही अशाच रडणार.” लेखनावर भाळून जास्त विचार न करता विवाह केल्यामुळे असे घडले. रणजीत देसाई यांची लेखक आणि व्यक्ती अशी दोन रूपे आहेत, सर्वांचीच असतात, हे लक्षात घेतले नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमधील नायिका, नायक हे वास्तव जग नाही. प्रत्येक नात्यात तीच व्यक्ती वेगळी असते… नवरा, वडील, सरदार, कादंबरीकार अशी त्यांची वेगवेगळी रूपे आहेत. जशी लेखिकेचीही आहेत. पतीवर (दोन्ही) आणि इतर माणसांवर सुद्धा खूप आरोप केले आहेत. काही सहज वाक्यांचा अनर्थ केला आहे, असे वाटले. उदा. लेखिकेचा भाऊ गेल्यावर ‘’सावर आणि आपण आई-बाबांची काळजी घेऊ,’’ असं पतीने म्हटल्यावर ‘परदु:ख शीतल असतं,’ ही रागाने दिलेली प्रतिक्रिया पटली नाही. घटस्फोटाचे कारण देताना देसाई म्हणतात, “मला माझा जीव प्यारा आहे म्हणून घटस्फोट दे.” त्यांना लोकांनी, नातेवाईकांनी चिथवले असे लेखिका म्हणते. घटस्फोटाचे कारण स्पष्ट होत नाही.

    कोवाड गावात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणे, बालवाडी सुरू करणे, महिला संघटना उभी करणे, रणजीतनगर वसवण्याचा प्रयत्न करणे इत्यादी समाजसुधारणेची कामे करून सुद्धा नंतर लोकांनी आपले मानले नाही. केवळ घरातले सहाय्यक आणि पाळीव प्राणी सोडून बाकी कोणी साथ दिली नाही. त्यावेळी त्यांना प्रश्न पडला, हे घर माझे होते का? चौदा वर्षं ज्या घरासाठी कष्ट केले ते सोडताना यातना झाल्या आणि त्याहीपेक्षा आपण बंध निर्माण करू शकलो नाही, याचे दुख झाले. त्या दादांची पत्नी राहिल्या नाहीत, त्यामुळे सगळी नाती संपली, असे त्या म्हणतात.

    लेखिकेच्या दोन्ही पतींना, समीक्षेच्या कमेंट्समध्ये काही वाचकांनी दूषणे दिलेली आहेत, त्यांना वाईट माणसे म्हटलं आहे. पण त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिलेले नसल्यामुळे त्यांची बाजू आपल्याला माहीत नाही आणि असे असूनही देसाई यांचे लेखक म्हणून असलेले श्रेष्ठत्व कमी होत नाही. इतरांवर दोषारोप करताना मीच बरोबर असा थोडा अहंभाव वाटतो. कथन अजून प्रांजळ केले असते तर, कदाचित त्यांच्या चुकाही दिसल्या असत्या किंवा समोरच्या व्यक्तीची बाजू समजली असती. लेखिकेची मनस्थिती काही वेळा गोंधळलेली वाटते, त्यामुळे पहिल्या विधानाच्या अगदी विरुद्ध विधान नंतर केलेले दिसते. उदा. दादांचे लेखिकेच्या मुलींशी असलेले नाते किंवा माहेरी सासरचे काही सांगितले नाही, असे म्हणताना बाबांना सर्व गोव्याचे सांगून रडले, असेही त्या लिहितात.

    आत्मचरित्र आत्मसमर्थन व्हायला लागले की, शंका निर्माण होते. उपमा, रूपके किंवा इतर तंत्रे आणि लालित्यपूर्ण लिहिण्याचा अट्टाहास बाजूला ठेवून साध्या शब्दांत हे लिहिले असते तर, अधिक भावले असते, वेदना मनाला भिडली असती. जसे स्मृतिचित्रे, समिधा, केतकर वहिनी या स्त्रियांचे आत्मचरित्र भावते. त्यांचे दुख थेट हृदयाला भिडते.

    पुन्हा पुस्तक वाचले ते इतरांना का आवडले असेल, हे समजून घेण्यासाठी… पण पुन्हा माझे तेच मत झाले. ज्यांना आवडले त्यांची कारणे असतीलच. पण कोणती? मला उत्सुकता आहे. कमेंट्स मध्ये सांगाल का?

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    By रेवती निलेश पांडेApril 15, 2026

    दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या…

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.