Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितआराध्या घरी परतली, पण एका निर्धाराने!

आराध्या घरी परतली, पण एका निर्धाराने!

भाग – 9

शिवाने मचाण सुंदर बनवलं होतं… “आज इथेच राहायचं का…?” तिने विचारलं.

” हो…”  उत्तर देताना त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच असल्याचं तिच्या लक्षात आलं.

“शिवा, काय झालं? तुम्ही असे इथे का पाहताय?”

“काही नाही… असंच…”

“काहीतरी असं आहे, ते शिवा माझ्यापासून लपवत आहेत…” ती मनातच विचार करत होती. रात्रीच्या त्या दाट सावलीत, तळ्याच्या पलीकडच्या झाडीत त्याने बांधलेलं ते उंचच उंच लाकडी मचाण, झाडावर उभारलेल्या सिंहासनासारखं भासत होतं.

हेही वाचा – सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि….

आराध्या शहरातली मुलगी, तिच्यासाठी हा अनुभवच नवा होता. त्या बांबूच्या आणि वेलींच्या सहाय्याने केलेल्या जिन्यावरून वर चढताना तिच्या मनात थोडा संभ्रम होता, पण शिवाच्या शिकवणीत आत्मविश्वासही होता. त्यांनी तिथे बसून केलेली फळांची छोटीशी जेवणाची मेजवानी… गरजेपुरतीच पण समाधान देणारी होती. रामफळ, केळी, थोडंसं गोड, थोडं पोषण… आणि शिवाचं ते खांद्यावरून आणलेलं पखालीतील पाणी, तोंडाला स्पर्श करताच थंडावा देऊन गेलं.

रात्र जसजशी गडद होत गेली, तसतशी जंगलाची भाषा अधिकच खोल होऊ लागली. आवाज, सावल्या, सशंकता… सगळं एका अज्ञात भावनेने भरून गेलं. झोप लागलेल्या आराध्याच्या श्वासात शांतता होती. पण शिवाच्या डोळ्यांत काहीतरी सतत सर्जनशील चालू होतं. त्याचं ध्यान, त्याची शांत नजर… त्याच्या आत काही खोल हालचाली होत होत्या… आणि तेव्हाच, एका अनोळख्या, थरकाप उडवणाऱ्या आवाजाने आराध्या दचकून जागी झाली.

“श्श्श… काही बोलू नकोस.”

शिवाचा हात अलगद तिच्या तोंडावर गेला. त्याचा स्पर्श थरथरलेल्या आराध्याला थोडी स्थिरता देत होता.

“समोर बघ…” शिवाने हलक्या हाताने दिशा दाखवली.

आराध्याने डोळे विस्फारून पाहिलं, दोन प्रचंड सर्प… एकमेकाभोवती वळवळणारे, पण त्यांच्यापैकी एकाच्या डोक्यावर असणाऱ्या तेजस्वी मणीमुळे रात्र असूनही सगळं स्पष्ट दिसत होतं.

“मणी… खरंच असतो?” तिच्या मनात हेच वाक्य घुमत होतं. त्या प्रकाशात त्या सर्पांचं नृत्य, त्यांचं गुंतागुंतीच्या हालचालींमधून काही संवाद चालल्यासारखं वाटत होतं. आराध्याच्या अंगावर शहारे आले. ती मागे सरकू लागली, भीतीने तिचं शरीर गारठलं…

शिवाने तिला आपल्या जवळ ओढलं.

“शांत रहा… काही होणार नाही!”

त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरत होता, समजावत, आधार देत… तिच्या डोळ्यांतल्या धडधडत्या भावनांवर तो हात अलगद पांघरूण घालायचा प्रयत्न करत होता.

थोड्या वेळात सगळं निवळलं. ते सर्प झाडीत विलीन झाले. जंगल पुन्हा शांत झालं. पण त्या शांततेतही काहीतरी खोल हलून गेलं होतं. आराध्या आता शिवाच्या कुशीत झोपलेली होती, तिचं भाबडं, घाबरलेलं मन थोडं शांत झालं होतं. पण शिवाच्या मनात वेगळेच प्रश्न घोंगावत होते…

“हे सर्प… हा मणी… हे तिला आणि त्याला दिसणं… काय संकेत आहेत? हे सगळं काही वेगळ्याच शक्यतेकडे इशारा करतंय.” त्याच्या मनात आराध्याच्या जन्माच्या आसपासचे संदर्भ उजळू लागले. त्या राखाडी रंगाच्या चिमुकल्या बाळाची आठवण, तिच्या शरीराची वेगळी रचना… आणि आता हे दृश्य.

“आराध्या… तू कोण आहेस? आणि तुझं अस्तित्व इतकं वेगळं का आहे?”

…त्या रात्री झोपलेल्या आराध्याकडे पाहत, शिवा जागाच होता. रक्षण करायला… आणि उत्तरं शोधायला.

त्या गूढ रात्रीची छाया अजूनही हवेत होती. शिवाच्या मनात सतत ती दृश्यं पुन्हा पुन्हा उमटत होती, ते सर्प, त्यांचा नृत्यवत भासणारा संवाद, आणि त्या मणीतून झळकणारं तेज… काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. पण काय? हे स्पष्ट होत नव्हतं. तो शांतपणे एका जागी ध्यानस्थ बसला. डोळे मिटले… श्वास संथ… आणि मन पूर्णतः आत वळलेलं. त्याच्या शरीराभोवती नजरेने न दिसणारं, पण जाणवणारं असं एक तरंगतं वलय तयार झालं होतं. त्या वलयातून जणू भूतकाळ आणि भविष्यकाळाचे धागे एकत्र गुंफले जात होते.

“आराध्या… तुझ्या अस्तित्वाचं गूढ  काही विशेष आहे.” त्याच्या मनात विचार उमटला… “हे सर्प, हा मणि… निसर्ग अशा सहजतेने काही दाखवत नाही… त्यामागे काहीतरी संकेत असतो.”

जसा उजाडायला सुरुवात झाली, झाडांच्या पानांतून सोनेरी किरणे जमिनीवर पडू लागली. जंगलात पक्ष्यांचे आवाज गुंजू लागले, आणि त्याच्या मनात सुद्धा एका नव्या उत्तराच्या शोधाची धूसर दिशा सापडू लागली.

शिवा उठला. हलक्याच पावलांनी तो खाली उतरला आणि कोणतीही आवाज न करता, सरळ जंगलाच्या दिशेने निघून गेला. काहीतरी शोधायचं होतं त्याला… कदाचित उत्तर, कदाचित मागोवा… किंवा कदाचित एक सुरुवात.

आराध्या अजूनही झोपेत होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या भीतीचा कुठेही लवलेश नव्हता. शांत, कोमल, निष्पाप…

शिवा परतला तोवर सकाळ उजाडून थोडा वेळ झाला होता. त्याने मचाणावर नजर टाकली. आराध्या झोपलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं.

“चांगलंय… अजून थोडा वेळ शांत झोपू दे. आजपासून तिच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे…”

तो शेजारच्या वेलीच्या सावलीत बसला. मनात विचार होता, “हे सगळं कशाचे संकेत आहे? आणि… तिच्या जन्माबद्दल मला जे वाटतंय, ते खरं ठरणार का?” तो काहीसा शांत होता… पण पूर्णपणे नाही. कारण, आज काही तरी ‘खरं’ उघड झालं होतं.

हेही वाचा – आराध्याचा संघर्षाचा निर्णय… सोबत आहे शिवा!

शिवाचं मन त्या दिवशी कमालीचं गंभीर झालं होतं. सर्पांच्या दर्शनाने, त्या तेजस्वी मणीनं काहीतरी संकेत दिला होता… केवळ आराध्याच्या भवितव्याचाच नाही, तर तिच्या मुळाशी असलेल्या गोष्टींचा… पण त्यासाठी आधी तिला तिच्या जागी पोहोचवणं, तिच्या माणसांजवळ पोचवणं गरजेचं होतं.

दिवस चढत चालला होता. आराध्या उठली, शिवा समोर आला. तो थोडासा शांत, पण नजर गंभीर.

“आपण आज परत जायचं,” तो म्हणाला.

“कुठे?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तुझ्या घरी. तुझ्या आई-बाबांकडे. तुझी लढाई अजून संपलेली नाही आराध्या… ती आता सुरू होणार आहे.”

तिला काही बोलायचं होतं, पण त्याच्या डोळ्यांतल्या तीव्रतेनं ती थांबली. शिवाने तिच्यासमोर एक व्यक्ती उभी केली, साधा पोशाख, मजबूत शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर विश्वासार्हता.

“हा दत्ता….  माझा जुना मित्र. याला मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. याचं काम आहे — लोकांना योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे पोहोचवायचं. याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतेस.”

आराध्याने दत्ताकडे पाहिलं. त्याचं हास्य मूक, पण समजूतदार होतं.

“बघ, आराध्या… तुझ्या घरी परतणं म्हणजे माघार घेणं नाही. ही तयारी आहे — त्यांच्यासाठी, आणि तुझ्यासाठीही. तुझ्या आईला, बाबांना त्या घरातून काढायचं आहे ना तुला? मग आधी तिथं जावंच लागेल.”

ती काही क्षण गप्प राहिली… डोळ्यांत पाणी होतं. नकाराचा क्षीण प्रयास तिच्या डोळ्यांतून जाणवत होता… पण मग, नकळत मान हलवली.

“ठीक आहे…”

थोड्याच वेळात, दत्ताच्या मोटारसायकलवर बसून ती घराकडे रवाना झाली. शिवा त्या दोघांना पाहत राहिला… तोंडून एकच वाक्य निघालं, “लढ आराध्या… आता तू थांबू नकोस.”

दिवस सरला, संध्याकाळ झाली. शिवा एका उंच दगडावर बसून दूर डोंगराच्या मागे मावळणाऱ्या सूर्याला पाहत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला — “पोहोचली. सारं ठीक आहे.”

त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं.

“चला, एक युद्ध संपलं… आता पुढचं शस्त्र उचलायला हवं.”

घराचं अंगण तसंच होतं… पण आराध्या तशी राहिली नव्हती. पायऱ्यांवर पाय ठेवताच आजूबाजूचं वातावरण तिच्या अस्तित्वाची जाणीव घेत होतं. आईने दार उघडलं आणि क्षणभर तिची नजरच सगळं बोलून गेली — काळजी, आनंद, थोडंसं अपराधी भाव आणि एक खोल न सुटणारी भीती! पण त्याहीपेक्षा जास्त, एक आश्चर्य — कारण जी मुलगी एक दिवस डोळे पाणावून घरातून गेली, तीच आज परत आली होती… पण नजरेत वेगळीच तेज, चालण्यात निश्चय आणि शांत चेहऱ्यावर आत्मविश्वास होता.

काकीने नेहमीप्रमाणे टोमणा मारला, “काय ग, आता परत आलीस?  बाहेरच्या जगात कोणी उभ केलं नाही वाटतं?”

आत्याही त्यात हसून सहभागी झाली, “वा… आता नटीसुद्धा झाली की, हो आमची आराध्या!”

पण आराध्या मात्र शांत. तिने गोड हसून उत्तर दिलं, “हो ना काकी,  तुमच्यासारखं नाही मिळालं, त्यामुळे परत आले.”

त्या उत्तराने त्यांची चुळबुळ सुरू झाली, पण आराध्या मात्र स्थिर उभी होती. आई तिच्याकडे पाहत होती, एक अशा नजरेनं की, जणू तिने मुलीला नव्यानं ओळखायला सुरुवात केली होती.

“कुठे होतीस गं इतके दिवस?” आईचा आवाज हळू, पण भरलेला होता. आराध्या तिच्याजवळ गेली, तिचा हात हातात घेत म्हणाली, “जिथं स्वतःला शोधता आलं… आणि जिथून तुला, बाबांना या घरातून बाहेर काढायची ताकद मिळाली.”

आईचं मन भरून आलं. डोळे पाणावले. पण आता ती कधीच रडणार नव्हती — कारण तिला समजलं होतं, तिची मुलगी आता कोलमडणारी नाही.

मनातून आराध्याने डोळे मिटून विचार केला — “शिवा… हे तूच केलंस. माझ्या आत मी होती, पण तू मला स्वतःला दाखवलंस. आता मी लढेन… आणि जिंकून दाखवेन.”

आराध्याचं नवं रूप सगळ्यांसमोर आलं… तिच्या भविष्याला एक नवं वळण मिळालं… आयुष्यात काय आणि कसं घडणार, हे येणारा काळ दाखवेलच…

क्रमशः

प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!