भाग – 8
“आराध्या,” त्याने हलक्याच आवाजात म्हटलं, “आपण जिथे त्या तळ्यावर बसतो, तिथे उद्या तुला काही दाखवायचंय…”
तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं… “काय?”
तो फक्त हसला.
“तुझ्यासारख्या एखाद्या लढवय्याला काय दिलं जाऊ शकतं, ते सांगणं अवघड आहे… पण प्रयत्न करतो.”
…आता ही कहाणी एका नवीन दिशा घेणार होती. नातं, जे दया किंवा सवयीवर नव्हे, तर समजुतीवर उभं राहत होतं.
सकाळी आराध्या जरा लवकरच उठली होती. तिने झोपेतून उठताच अंगावर स्वच्छ शाल चढवली आणि आजूबाजूला नजर टाकली. झाडांमधून येणारा धुरकट सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज आणि थोडक्याच अंतरावरून ऐकू येणाऱ्या पाण्याच्या सळसळीत एक वेगळीच ओढ होती. आज काही वेगळं घडणार आहे, हे तिला आतून जाणवत होतं…
शिवा त्याच्या नेहमीच्या जागी नव्हता. आराध्या त्याला शोधत थोडी पुढे आली, तर एका मोठ्या झाडाखाली तळ्याच्या काठावर तो तिला वाट बघत बसलेला दिसला. त्याने हलकंसं हसत हात हलवून तिला बोलावलं.
ती हळूहळू त्याच्याजवळ आली.
“सकाळीच बोलावणं म्हणजे काहीतरी खास आहे वाटतं?” ती मिश्कील हसत म्हणाली.
“हो… खासच आहे,” तो गंभीर स्वरात म्हणाला, “पण हे खास तू बनवलंस.”
तिने भुवया उंचावल्या. तो उठून उभा राहिला आणि तिला तळ्याकडे घेऊन गेला… शिवा तिच्या अगदी जवळ आला. तळ्याकाठच्या निर्मळ पाण्याकडे पाहून त्याने हलक्या आवाजात म्हटलं —
“बघ… बघ जरा इथे.”
आराध्या गोंधळून खाली वाकून तळ्यात पाहू लागली. पाण्यात सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी आरसा निर्माण केला होता. त्यात तिचं प्रतिबिंब स्पष्ट उमटलं… केस वाऱ्यामुळे थोडे अस्ताव्यस्त, डोळ्यात थोडासा गहिवर… पण तरीही चेहऱ्यावर एक विचित्र शांत आत्मविश्वास.
शिवा तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवून म्हणाला, “ही मुलगी… तू… बघ कशी खंबीर आहे! लहानपणापासून सतत ऐकून, सहन करत, ज्या वेदनांनी कुणीही मोडून गेले असते, त्या सहन करून… एकटीच इथे आली आहेस तू.”
आराध्या काही क्षण मग्न होऊन त्याचं ऐकत राहिली.
“म्हणजे?” तिने सहज विचारले.
“म्हणजे, तू ज्या गोष्टींपासून पळालीस, त्या तुला मागे नाही, पुढे घेऊन आल्या आहेत… हे बघ इथे… या जंगलात, झाडांमध्ये, पक्ष्यांच्या आवाजात, तू मिसळलीस… कुणी असं सहज वावरू शकतं का? तुला भीती असती तर तू इथे एक दिवसही टिकली नसतीस! म्हणून मी म्हणतो…ही मुलगी खंबीर आहे, लढवय्या आहे… आणि सगळ्यात खास आहे.”
हेही वाचा – आराध्याने सांगितली, आपल्या आईवडिलांची कहाणी
आराध्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण या वेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते… ते होते समजून घेतल्याचे… स्वीकारले गेल्याचे… आणि पहिल्यांदाच स्वतःचं सौंदर्य कुणाच्या नजरेतून समजल्याचे!
शिवा म्हणाला, “तू इथे जंगलात आली नाहीस म्हणून खास नाहीस… तर तू इथे आलीस, कारण तू स्वतःला शोधायला, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलीस… आणि म्हणून तू खास आहेस.”
आराध्याने एक खोल श्वास घेतला… तिने पुन्हा पाण्यात पाहिलं… तेच प्रतिबिंब… पण आता वेगळं वाटत होतं. आतून काहीतरी बदललं होतं… शांत, पण ठाम.
तिच्या ओठांवर हलकं हसू उमटलं… शिवाच्या समजूतदारपणावर आणि त्या पाण्यातल्या मुलीवर… जी पहिल्यांदाच तिला सुंदर वाटत होती.
“शिवा…” ती नकळत बोलली.
“तू मला माझंच प्रतिबिंब नवीन नजरेतून दाखवलंस… मी आता परत लपणार नाही.”
तो फक्त स्मित करतो…कारण त्याला माहीत असतं, ही मुलगी आता आपल्या आयुष्याच्या प्रवासाला नव्याने सुरुवात केली…
वाऱ्याची झुळूक आली आमि तळ्याच्या पाण्यावर हलकेसे तरंग उठले, पण आराध्याच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. शिवाचे शब्द थेट तिच्या हृदयात घुसत होते.
“जा लढ… आणि काढ त्या आईबाबांना त्या जाचातून बाहेर!”
त्याच्या आवाजात रोष नव्हता, पण तीव्रता होती… एक वेदनेचा सूर, एक सच्चा खणखणीत मुद्दा होता.
आराध्या सुन्न झाली होती. तिचं शरीर तसंच ताठ, डोळे स्थिर, ओठ हलकेसे थरथरत होते. पण आतून काहीतरी मोडत होतं… आणि एक नवं काही तयार होतं होतं!
तिने नजर खाली वळवली. हलक्या आवाजात ती कुजबुजली – “माझ्यात हिंमत होती… पण स्वतःसाठी.”
शिवा अजूनही तिच्यासमोर उभा. त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले…
ती बोलू लागली, एकदम धीम्या पण खोल स्वरात… “माझ्या आईसाठी मी खूप वेळा उभी राहिले, तिच्यासाठी भांडले, काकींशी, आत्याशी… पण तीच आई म्हणायची, ‘शांत राहा, भांडणं नको… लोक काय म्हणतील?’ मी तिच्या डोळ्यात किती वेळा प्रश्न पाहिले, पण तोंडातून नेहमीच ‘ठीक आहे’च आलं! तिने चुकूनही कधी ‘मला इथून बाहेर पडायचंय’ असं म्हटलं नाही.”
तिच्या आवाजात आता थोडी खळखळ जाणवत होती, “शिवा, मी पळून आले नाही, मी गुदमरत होते, कुस्करले जातं होते… जेव्हा कोणीच ओरडत नाही, फक्त सहन करतं… तेव्हा मीच स्वतःसाठी ओरडले.”
शिवा तसाच शांतपणे ऐकत होता.
आराध्या पुढे म्हणाली, “माझ्या आईला मी हलवू शकले नाही, कारण तिने स्वतःचं दुःख गिळून जगायचं ठरवलं होतं. पण आता तू सांगतोस ना, लढ म्हणतोस ना, तर मी फक्त स्वतःसाठी नाही, तिच्यासाठीही लढेन.”
ती पाण्याकडे वळली…. त्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत म्हणाली, “एक वेळ होती, मी माझ्या सावळ्या चेहऱ्याला लपवत होते… आज मी त्याच सावळ्या चेहऱ्याला घेऊन उभी राहीन… आईला न्याय द्यायला… बाबांना मन:शांती द्यायला आणि स्वतःला पुन्हा एकदा सावरायला!”
शिवा हसला… आराध्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली… “तू विचारलं… का नाही लढले मी? आता उत्तर देते, आता लढणार आहे.”
तो तिच्या हातात हात घेत म्हणाला, “मग तयार राहा. कारण तुझी पुढची लढाई तुला तुझी ओळख देईल… एक उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे.”
“यापुढे कधीही हार मानू नकोस, एका वीरासारखी लढ… स्वतःच जग स्वतः बनव.”
त्या तळ्याच्या शांत पाण्यात एक लाट उठली… जणूकाही तिच्या मनातल्या भावना होत्या… एक नवी सुरुवात होण्याचे संकेत होते… आज आपण काहीतरी बदल घडवून आणणार आहोत, ही भावना त्या शांत तळ्याकाठच्या वाऱ्यासारख्या आराध्याच्या मनात घोंघावू लागली होती. ती आजपर्यंत अनेकदा विचार करत होती, “काय करावं?” पण आज पहिल्यांदाच तिच्या मनात एक धीराचा विचार ठाम उभा राहत होता, “करायलाच पाहिजे.”
शिवाने आणलेल्या केळ्याच्या घडामधील एक केळं तिने खाल्लं, पण चेहऱ्यावरचा थकवा लपवता येत नव्हता. त्याला ते जाणवलं.
“आराध्या… डोक्यात विचार खूप सुरू आहेत ना?” शिवा हळूच म्हणाला.
तिने फक्त मान हलवली. नजरेत विचार, चिंता आणि आशा… सर्वकाही होतं.
शिवा पुढे आला, “आपण आज इथूनच सुरुवात करू. तुझ्या आई-बाबांना बाहेर काढायचं आहे ना? मग मी तुझ्यासोबत आहे.”
आराध्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, “कधी कधी वाटायचं, की मीच चुकीची आहे. माझ्यामुळे सगळं गडबडतंय… पण आता वाटतं, मी बोलली असती, उभी राहिले असते तर कदाचित आईला थोडा आधार मिळाला असता.”
शिवा म्हणाला, “ते आता करायचं आहे. मागचं काहीच नाही बदलता येत… पण पुढचं मात्र आपल्या हातात असतं.”
आराध्याने गूढ नजरेने त्याच्याकडे पाहिलं. निखाऱ्यावर फुंकर घालावी, तसं तिचं मन उजळत होतं…
“शिवा, एक गोष्ट सांगू?”
“बोल.”
“जेव्हा मी घरातून निघाले, तेव्हा वाटलं होतं की, हा शेवट आहे. पण तू भेटलास आणि आता वाटतं, ही एक नवी सुरुवात आहे.”
शिवा गालात हसला आणि म्हणाला, “तुझ्या या नव्या प्रकरणाचं नाव आहे — आरंभ.”
तळ्याकाठी ती दोघं तशीच बसून राहिली. मौनातही संवाद होता आणि त्या शांततेतच आराध्याच्या मनाने एक नवी शपथ घेतली होती… ‘आईसाठी, वडिलांसाठी आणि स्वतःसाठी मी परतेन. पण यावेळी एकटी नाही…
“आज आपण मचाणावर राहू…” शिवा म्हणाला.
तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले… त्याने हाताने चल अशी तिला खूण केली, त्या सरशी जमिनीवर फतकल मारून बसलेली ती उठून त्याच्या पाठी जाऊ लागली…
हेही वाचा – सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि….
तिथून पुढे काही अंतरावर चार-पाच वडाच्या झाडांचा समूह होता… ती बरीच मोठी आणि उंच वाढलेली होती… त्या झाडांच्या ढोलीतून त्यांनी काही छोटी लाकडं काही बांबू आणले आजूबाजूला वाढलेल्या वेलींच्या साह्याने आराध्यला हाताशी धरून बऱ्यापैकी उंचीवर एक मस्त मचाण बांधून तयार झाले…
एक एक लाकूड असं बसवलं होतं की, त्यावर पाय ठेवून चढणं शक्य होतं. झाडावर चढत असताना त्याने तिला वर ये अशी खूण केली… शहरात वाढलेल्या आराध्याला हे सगळं नवीनच होतं शिवाच्या पावलावर पाऊल टाकत, ती वर चढली. हे सर्व पाहून तिला आश्चर्यच वाटलं. शिवाने मचाण पण सुंदर बनवलं होतं…
“आज इथेच राहायचं का…? ” तिने विचारलं.
“हो…” उत्तर देताना त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच असल्याचं तिच्या लक्षात आलं.
याचं कारण काय असेल?
क्रमशः


