माधवी जोशी माहुलकर
हिंदी अन् मराठी चित्रपटातील काही कलाकार असे आहेत की, जे कायम त्यांच्या अभिनयामुळे किंवा त्यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे मनात घर करून राहतात. याच हीरोंच्या यादीमध्ये अमोल पालेकर येतो. दिसायला जरा बरा हो! बराच म्हणावा लागेल! कारण अगदी चॅाकलेट हीरो वगैरे मटेरिअल तो कधीच वाटला नाही, तरीपण तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांमुळे लक्षात राहतो. अमोल पालेकर हा प्रेक्षकांना पडद्यावर नेहमी “Boy to next door” म्हणजेच अगदी आपल्या शेजारचा ओळखीचा मुलगा वाटला. अमोल पालेकरच्या बहुतेक भूमिका नेहमी मध्यमवर्गीय काटकसरी आणि टिपिकल मुंबईकर राहणीमान असलेल्या तरुणाच्या आहेत. रजनीगंधा, घरौंदा, गोलमाल, अपने पराये, छोटी सी बात, नरम गरम, चितचोर, दो लडके दोनो कडके इत्यादी सिनेमांत त्याने केलेले शामळू मध्यमवर्गीय तरुणाचे रोल्स नेहमीच छान वाटले किंवा तो केवळ मध्यमवर्गीय तरुणाच्या भूमिकांसाठीच सिने इंडस्ट्रीत आला असावा असं वाटतं.
घरौंदा या चित्रपटात तर त्याने इतकं अप्रतिम काम केलं आहे की, या कथेमध्ये एका दृश्यात झरीना वहाब जेव्हा त्याच्याकडे परत येण्यास नकार देते, खरंतर तिथे अमोल पालेकरची चूक असताना देखील डॉक्टर श्रीराम लागूंचा राग येतो आणि झरीना वहाबसारखी बाई लालची वाटते. तिथे त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो आणि त्यामुळे प्रेमभंगामुळे तो पूर्णपणे कोलमडलेला दिसतो. प्रेमात विफल झालेल्या हीरोची वैफल्यग्रस्त अवस्थेतील भूमिका अमोल पालेकरने त्या सिनेमात इतकी अप्रतिम वठवली आहे की, त्याला तसं पाहून वाईट वाटतं. त्या हताश परिस्थितीत तो पालेकर जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर ‘एक अकेला इस शहर में…’ हे गाणं म्हणत फिरतो, तेव्हा तो सीन पडद्यावर पाहताना आपलंच ‘दिल खाली खाली बर्तन…’ आहे की, काय असं वाटतं… इतका त्याचा अभिनय जबरदस्त आहे.
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
अमोल पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी प्रायोगिक रंगभूमीवरून केली. सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटके केली. चित्रपटसृष्टीत त्यांचे पदार्पण 1971मध्ये ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटातून झाले. तर, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना खरी ओळख बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ (1974) या चित्रपटाने मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले.
‘रजनीगंधा’मध्ये विद्या सिन्हासोबत त्याची जोडी परफेक्ट मॅच वाटते. विद्या सिन्हापण त्याला साजेशी हीरोईन! रजनीगंधा या सिनेमात सिम्पल जॅार्जेट नाही तर, शिफॅानच्या कलरफुल प्रिन्टेड साड्या नेसलेली साधीच परंतु अवखळ विद्या… दिसायला विशेष आकर्षक नसलेला, परंतु फक्त टपोरे डोळे असलेल्या त्याच्या साध्या व्यक्तिमत्वाने भारलेली आणि कदाचित त्याच्यासारखाच मनमीत शोधणारी त्याची प्रेमिका म्हणून अमोल पालेकरसोबत विद्या नेहमीच छान वाटली.
‘छोटी सी बात’ या सिनेमात आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन…’ हे गाणे म्हणत अमोल पालेकर जेव्हा विद्या सिन्हाच्या मागे मागे फिरतो, तेव्हा त्याचा सहज सुंदर अभिनय मस्त वाटतो. त्या सिनेमात विद्या सिन्हा ॲाफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करणारी अगदी साधी टिपिकल मुलगी वाटत असूनही ती तिच्या साध्या राहणीमानात देखील चंचल वाटते… तितकाच अमोल पालेकर साधा भोळा आणि कॅामन मॅन असूनही भाव खाऊन जातो! आता ही त्या गीतकाराच्या शब्दाची जादू म्हणा किंवा संगीताचा परिणाम म्हटला तरी, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांच्यामुळे ते गाणे अजरामर झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
बरं, त्याचा प्रत्येक सिनेमातील अवतार एकदम साधा सिम्पलच बरं का! एलिफंटा स्टाईलचा बेलबॅाटम, त्यावर चेक्सचा किंवा पांढरा लायनिंगचा शर्ट, पायात बूट, तेल लावून चापून चोपून पाडलेला भांग, डोळ्यावर कधीकधी मोठ्या फ्रेमचा चष्मा असायचा तरी, तो त्यामध्ये भारी वाटायचा.
‘बातों बातों में’ या सिनेमात टिना मुनीम सोबत फ्रेन्च कट दाढीमधला ख्रिश्चन अमोल पालेकर अगदी मुंबईतला मध्यमवर्गीय अपटुडेट यंग मॅन वाटला. झरीना वहाब सोबत चितचोरमध्ये ‘जब दीप जले आना…’ म्हणता म्हणता हा प्रेक्षकांचे मन कधी चोरून नेतो, ते त्यांनाही कळत नाही! इथे येसुदासने त्याच्या स्वरसाजाने पालेकरला रोमॅन्टिक हीरो बनवले आहे! त्याचा दुहेरी भूमिका असलेला, उत्पल दत्तसोबतचा कॉमेडी थीम असलेला ‘गोलमाल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्या सिनेमातील किशोर कुमारने गायलेले ‘आने वाला पल जाने वाला है…’ हे गाणं आजही सुपरडुपर हिट गाणे म्हणून ओळखले जाते. अमोल पालेकरला ‘गोलमाल’ चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
केवळ अभिनयावर न थांबता त्याने दिग्दर्शनातही आपली मोहोर उमटवली. सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर चित्रपट हाताळले :
- आक्रीत (मराठी) : मानवी स्वभावाचा गडद पैलू मांडणारा चित्रपट.
- थोडासा रूमानी हो जाये : कविता आणि कल्पनाशक्तीवर आधारित एक वेगळा प्रयोग.
- बनगरवाडी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे!
- पहेली (हिंदी) : शाहरुख खान अभिनीत या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका मिळाली होती.
- धूसर (मराठी) : ज्याला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले.
थोडक्यात काय तर, 70 आणि 80च्या दशकात जेव्हा पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ची लाट होती, तेव्हा अमोल पालेकर याने चित्रपटात मध्यमवर्गीय माणसाच्या साध्या, सरळ आणि विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे, अतिशय नैसर्गिक आणि सहज वावर. तो कधीही ‘स्टार’ वाटला नाही, तर आपल्याच ओळखीचा कोणीतरी माणूस पडद्यावर वावरतोय, असे प्रेक्षकांना वाटायचे. ‘साधी राहणी आणि उच्च अभिनय’ हे त्याचे सूत्र होते.
अभिनयाव्यतिरिक्त ते एक उत्तम चित्रकार देखील आहेत. त्यांच्या वैयक्तिक राजकीय किंवा सामाजिक विचारधारेच्या गोष्टी वगळता अमोल पालेकर हे नेहमीच एक ग्रेट ॲक्टर म्हणूनच जास्त ओळखले जातात. विविध चित्रपटांतील भूमिकांमधून त्यांनी सामान्य मनुष्याच्या अंतरंग उलगडणाऱ्या ज्या छटा आपल्या अभिनयातून व्यक्त केल्या आहेत, त्या लाजवाब आहेत. अगदी अँग्री यंग मॅनसारखे चित्रपट किंवा त्यासारखे व्यक्तिमत्व नसतानाही अमोल पालेकर नावाच्या या हीरोने आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाने रसिकांना एक वेगळा आनंद दिला आहे, हे मात्र शंभर टक्के खरं आहे!


