पराग गोडबोले
दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली, पण तेव्हाचं पुणं आणि काल परवा पाहिलेलं पुणं यात काहीच साम्य नाही आढळलं. दुपारी जेवायला बाहेर पडल्यावर ऊन, रखरखाट आणि शुष्कपणा यांनी जीव अगदी नकोसा केला आणि हेच का ते आल्हाददायक पुणं हा प्रश्न पडून गेला.
रात्री स्टेशनजवळच्या एका हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. हॉटेलचं नाव सांगणं अप्रस्तुत… पण छान, सुंदर आणि सुबक हॉटेल. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये अस्तित्व असलेल्या एका साखळीचा भाग! आठव्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. खिडकीतून खाली दिव्यांची आरास फार छान दिसत होती. रस्ता अगदी वाहता होता. आंघोळ करून, आवरून, साधारण नऊ वाजता आम्ही जेवायला हॉटेलच्याच उपहारगृहात पोहोचलो. रुची भोजन, म्हणजे buffet प्रकारचं जेवण होतं. त्यात असंख्य प्रकार, live counter, सामिष भोजनाची स्वतंत्र सोय. किती खाऊ आणि काय खाऊ, या प्रकारात मोडत असलेलं हे जेवण!
हल्ली कुठल्याही शहरातल्या अशा हॉटेलात गेलं की, साधारण असेच प्रकार दृष्टीस पडतात. सुरुवातीला नावीन्य वाटतं, पण नंतर या प्रकाराचा आणि ठराविक अशा साचेबद्ध पद्धतीच्या मांडणीचा हळूहळू कंटाळा येऊ लागतो. मी आणि माझे सहकारी सुद्धा याच पठडीतले. हे असं जेवण नकोसं वाटणारे…
दुसऱ्या दिवशी परत काम करायचं होतं, त्यामुळे पोटावर अत्याचार होणार नाही, याची काळजी घेत, गप्पा मारत, थोडेसेच पदार्थ ताटात घेऊन, अगदी आरामात आमचं जेवण सुरू होतं. गर्दी फारशी नव्हती, त्यामुळे शांतपणे आम्ही वेळ घालवत होतो…
आमच्या गप्पा आणि भोजन सुरू असतानाच, शेजारच्या टेबलावर एक दाक्षिणात्य, मध्यमवयीन जोडपं येऊन बसलं. ही दाक्षिणात्य माणसं, त्यांच्या ठराविक चेहेरेपट्टीमुळे आणि पेहेरावामुळे अगदी सहज ओळखू येतात… कुठेही गेली तरी! एकंदरीत त्यांच्याकडे बघून त्यांच्या उच्च राहणीमानाची आणि सुशिक्षितपणाची खात्री पटत होती. दोघांच्याही चेहेऱ्यावरून तृप्ती ओसंडत असलेली जाणवत होती.
हेही वाचा – अब्रह्मण्यम्… गुळचट ते झणझणीत!
या हॉटेलमध्ये प्रथमच आले असावेत बहुतेक… बसल्यावर, पाणी वगैरे पिऊन झाल्यावर, दोघेही उठले आणि जेवणाचे पदार्थ निरखीत फिरू लागले… सगळं बघून झाल्यावर, काहीच न घेता परत आपल्या जागेवर येऊन बसले आणि त्यांनी हॉटेलच्या एका माणसाला हाक मारली…
कोट वगैरे घातलेला, चेहेऱ्यावर कृत्रिम हसू वागवत असलेला, हॉटेलचा वेटर येऊन कमरेत वाकून आदबशीर उभा राहिला. त्या बाई विचारत्या झाल्या, “हे जे मांडलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही जेवायला मिळू शकेल का इथे, वेगळं असं?”
“हो, आहेत ना बरेच पदार्थ,” म्हणत त्याने त्यांच्यासमोर मेन्यूकार्ड आणून ठेवलं.
मला काही मागवायचं नव्हतं, पण कुतूहल म्हणून मी पण एक मेन्यूकार्ड मागवून घेतलं. म्हंटलं, बघूया तरी काय पदार्थ आहेत ते!!
“Can we get some authentic Maharashtrian food?” शेजारच्या टेबलावरून विचारणा झाली..
मी मेन्यूकार्डवर नजर फिरवली… चायनीज, मोगलाई, पंजाबी, थाई, दाक्षिणात्य यांच्या भाऊगर्दीत आपले पदार्थ दिसतच नव्हते कुठे! नाही म्हणायला, गोड पदार्थांच्या यादीत श्रीखंड आणि आम्रखंड दिसत होतं.
मेन्यूकार्ड आणून देणारा ओशाळ्या स्वरात म्हणाला, “Sorry madam, we only serve what is available on the menu card.”
“आम्हाला मराठी पदार्थ खायची खूप इच्छा होती. अपेक्षाभंग झाला आमचा.”
हे संभाषण ऐकत असलेला मी, जागच्या जागी चुळबुळ करायला लागलो. काहीतरी करायला हवं होतं, नाहीतर ही माणसं पुण्यात येऊनही आपले पदार्थ न चाखता गेली असती, तर काय प्रतिमा सोबत नेली असती त्यांनी पुण्याची?
मी सहकाऱ्यांना म्हणालो, “काहीतरी करायला हवं.”
त्यांचं मत होतं, “जाऊ दे ना, कशाला उगाच आगावूपणा करायचा आपण?”
तरीही, मी त्या दक्षिणात्य पुरुषाला विचारलं, “मी काही मदत करू का?” आणि त्यांच्या टेबलापाशी गेलो. म्हणालो, पुण्यात येऊन आमचे खास मराठी पदार्थ न चाखता तुम्ही गेलात, तर फार मोठ्या आनंदाला तुम्ही मुकाल हे मला जाणवलं, म्हणून तुमच्याशी थोडं बोलवंसं वाटतंय.”
त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मी मोजक्या शब्दांत, आपल्या काही खास पदार्थांबद्दल त्यांना माहिती दिली.
बाई म्हणल्या, “लिहून द्याल का काही पदार्थांची नावं?”
मी कागद पेन मागवलं आणि झुणका भाकरी, मिसळ, पुरणपोळी, मोदक, अळूवडी, आंबोळी, आम्रखंड, कांदेपोहे, अळूची पातळ भाजी, थालिपीठ, साबुदाणा वडा, कांदा भजी, मसाले भात, कढी-खिचडी, मस्तानी, खरवस, डाळिंबी उसळ असे आठवतील तसे पदार्थ लिहून त्यांच्याकडे सोपवले. हे पदार्थ मिळतील, अशी पुण्यातली काही चांगली ठिकाणं पण सांगितली त्यांना.
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
“आम्ही आणखी दोन दिवस आहोत पुण्यात. तुम्ही सुचवलेले पदार्थ नक्की खाऊन बघू,” असं ते म्हणाल्यावर कोण बरं वाटलं मला! माझ्या नकळत मी मराठी पदार्थांचा प्रचारक झालो होतो.
तो विषय तिथे संपला, पण पुण्यासारख्या शहरात, तारांकित हॉटेलात मराठमोळे पदार्थ मिळू नयेत, याचं वैषम्य वाटतच राहिलं मला. अर्थात, सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती नसेल, काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण इथे जे अनुभवलं, ते मात्र मनाला यातना देऊन गेलं. एवढे सुंदर, साजूक आणि चविष्ट आपले पदार्थ, पण ते करायला लागणाऱ्या खटाटोपांमुळे आणि आपल्या थोड्याश्या करंटेपणामुळे फक्त आपल्याच घरांपुरते मर्यादित राहिले… उडुपी आणि पंजाबी पदार्थांसारखे घराच्या, राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून, लोकप्रिय होण्याचा मान नाही मिळाला त्यांना, हे आपलं दुर्दैव, खचितच.
जेवण संपवून आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये गेलो… पण, कधी बदलेल परिस्थिती, याचा विचार करत नंतर खूप वेळ ठसठसत राहिली ही जखम!


