दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 फेब्रुवारी 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 04 फाल्गुन शके 1947; तिथि : षष्ठी 09:09, सप्तमी 31:02; नक्षत्र : भरणी 16:33
- योग : ब्रह्मा 10:18; करण : गरज 20:06
- सूर्य : कुंभ; चंद्र : मेष 22:12; सूर्योदय : 07:03; सूर्यास्त : 18:41
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज मन थोडे विचलित होऊ शकते. परिणामी, कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे घाई न करता, काम हळूहळू पूर्ण करा. अनपेक्षित खर्च होऊ शकतो, म्हणून पैसा जपून वापरा. घरातील कोणीतरी नाराज असेल, पण ते मनावर घेऊ नका. कौटुंबिक जीवनात समोरच्याचे काळजीपूर्वक ऐकल्याने भांडण टाळता येईल. आज आरोग्य उत्तम राहील, फक्त पुरेशी झोप घ्या.
वृषभ – नोकरीच्या ठिकाणी कामे सामान्यपणे होत राहतील. वरिष्ठांकडून दबाव कमी होईल. अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो, पण हाती पैसा टिकणार नाही. म्हणूनच बचतीवर भर द्या, तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने गुंतवणूक करा. मित्र किंवा नातेवाईक जे सांगतात त्यावर लगेच विश्वास ठेवू नका; आधी सत्य जाणून घ्या. अत्यंत गरजेचे नसल्यास लांबचा प्रवास पुढे ढकला.
मिथुन – आज तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. झोपेच्या अभावामुळे चिडचिडेपणा वाढेल. घरातील व्यक्तींशी वाद होऊ शकतात, म्हणून बोलताना काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात गैरसमज वाढू शकतात, म्हणून स्पष्टपणे बोला. तुमच्या सध्याच्या कामावर किंवा नोकरीवर लक्ष केंद्रित करा. आत्ताच नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा. आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या.
कर्क – आज तुमचा मूड थोडा हलकाफुलका असेल. नोकरीच्या ठिकाणी सर्व काही ठीक राहील, परंतु वरिष्ठांशी बोलताना काळजी घ्या. आज भूतकाळातील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला आपलेपणाची भावना जाणवेल. आरोग्य सामान्य राहील, फक्त खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्या.
सिंह – आज दिवसभर सुस्ती किंवा थकवा जाणवेल. बाहेर जाताना काळजी घ्या; घसरण्याचा किंवा किरकोळ दुखापत होण्याचा धोका आहे. कामाचे निर्णय तुमच्या बाजूने असतील. घरातील वातावरण चांगले राहील. कौटुंबिक जीवन चांगले जाईल; एकत्र बसून बोलल्याने जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी हलके जेवण घ्या.
कन्या – संतती किंवा कुटुंबाशी संबंधित एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल. घरातील वातावरण थोडे गंभीर राहील. एखादे काम अडून राहू शकते. मालमत्ता किंवा कारशी संबंधित बाबी पुढे सरकतील, मात्र त्यासाठी वेळ लागेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. स्वतःला शांत ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी मेडिटेशन करावे.
तुळ – तुमचे बोलणे कठोर होऊ शकते, यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, त्यामुळे बचतीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा मोह होऊ शकतो, मात्र तूर्तास थांबणे चांगले. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. आरोग्याबाबत, उच्च रक्तदाब किंवा तोंडाच्या समस्या चिंतेचा विषय बनतील.
हेही वाचा – कानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!
वृश्चिक – कामात फारसा बदल होणार नाही. मात्र कामे लवकर उरकण्यावर भर द्या. तुम्हाला घसा, नाक किंवा कानाच्या समस्या जाणवू शकतात. हवामानातील बदल लक्षात घेऊन सावधगिरी बाळगा. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि संततीबद्दल तुम्हाला काहीतरी सकारात्मक ऐकायला मिळेल. भावनांच्या आधारे कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका.
धनु – गैरसमजांमुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अनावश्यक संशय टाळा. कामाच्या ठिकाणी तुमचे मत गांभीर्याने विचारात घेतले जाऊ शकते. सार्वजनिक जीवन किंवा राजकारणात सहभागी असलेल्यांना दिवस अनुकूल असेल. संवाद साधताना योग्य त्या मर्यादा पाळा. शारीरिक आरोग्य चांगले असेल मात्र तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो.
मकर – आज तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. कामात रस नसल्यासारखे वाटू शकते, त्यामुळे दिवस कसा तरी ढकलाल. अनावश्यक खर्च होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. पैसे उधार देणे किंवा जोखीम असलेल्या उपक्रमात गु़ंतवणूक करणे टाळा. तुमच्या कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल. शांत राहण्याचा प्रयत्न करा; गोष्टी हळूहळू सुधारतील.
कुंभ – व्यवसायात एखादा मोठा निर्णय घ्यावासा वाटेल, परंतु आज तो पुढे ढकलणे चांगले. फार भावनिक होऊ नका. त्याचा निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. आज रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. पाय दुखू शकतात किंवा पायाला दुखापत होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे; परिश्रमपूर्वक अभ्यास करणे फायदेशीर ठरेल.
मीन – व्यावसायात हुशारीने निर्णय घ्या., कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी कामचा ताण असेल, पण परिस्थिती हळूहळू सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ असा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे; छोट्याशा गोष्टीला मोठे करू नका.
दिनविशेष
संत आणि समाजसुधारक गाडगे महाराज
टीम अवांतर
आधुनिक मराठी संत आणि समाजसुधारक अशी ओळख असलेल्या गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे खरे नाव होते डेबूजी जाणोरकर. आजोळी डेबूजी गुरे राखीत असे आणि भजने करीत असे. या वयातच त्यांनी मुलांची भजनी मंडळे तयार केली होती. लहानपणापासूनच ते जातीभेद, हिंसात्मक कुळधर्म, चालीरीती मानीत नसे. 1905 पासून डेबूजीबाबांनी स्वत:ला लोकसेवेसाठी वाहून घेतले. संसारत्याग करून ते साधकावस्थेत तीर्थयात्रा करीत फिरत होते.
समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती आणि अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे तसेच लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. डेबूजी पुढे गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे आणि एक काठी (सोटा) असा त्यांचा वेश असे. त्यामुळे ते गाडगेबाबा, गोधडे महाराज या नावांनीही प्रसिद्ध होते. त्यांशिवाय प्रदेशपरत्वे ते चिंधेबुवा, लोटके महाराज, चापरेबुवा, वट्टीसाधू या नावांनीही परिचित होते.
हेही वाचा – गाडी थांबवून शिवने आरूचे तोंड दाबून धरलं…
समाजसुधारण आणि लोकशिक्षण यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले तरी, त्यांची भाषा सुबोध आणि सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांत तसेच महाराष्ट्रात त्यांनी कीर्तने करून लोकजागृती केली. श्रोत्यांचा सहभाग हे त्यांच्या कीर्तनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय. भजन-कीर्तनांतून प्रश्नोत्तररूपी संवाद होत असे. ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ असा गजर ते शेवटी करत आणि त्यात श्रोत्यांनाही सहभागी करून घेत.
समाजात निर्माण झालेली घाण साफ करतानाच समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न गाडगेबाबांनी केला. माणसाचे मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन म्हणजेच समाजपरिवर्तन हा त्यांचा दृढ विश्वास होता. अध्यात्माच्या जंजाळात न शिरता, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी आणि सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली.
“संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत आणि माझा कोणीही शिष्य नाही” असे ते म्हणत.
लोकजागृतीसाठी प्रवास करीत असतानाच अमरावतीजवळ त्यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. वांद्रे (मुंबई) येथील पोलीस केंद्रात 8 नोव्हेंबर 1956 रोजी झालेले त्यांचे कीर्तन अखेरचे ठरले. 2005 साली अमरावती विद्यापीठाचे नाव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.


