मानसी देशपांडे
गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले अप्रतिम गीत म्हणजे ‘या सुखांनो या…’! गीतकाराचं, कवीचं वैशिष्ट्यच हे असतं की, अशा पद्धतीने लिखाण करणं, जे वाचताना, ऐकताना समोरच्या व्यक्तीला फक्त आणि फक्त सुखाची अनुभूती प्राप्त व्हावी… नेमकं हेच गदिमांनी या गीतातून मांडलं आहे. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी मला प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा हा विचार मनात येतो, “आनंदाच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण, परत परत भरण्याचे वरदान त्यांना मिळालेले असते…” आपल्या आयुष्यात दु:ख कितीही असले तरी सुखाला निमंत्रण हे प्रत्येकजण देतच असतं. म्हणून गदिमांनी ओळ लिहिली आहे,
या सुखांनो या…
सुख हे वाटलं की, जास्त आनंद मनाला मिळतो. हे सुख कधी आपण आईसोबत, वडिलांसोबत वाटतो; पण जोडीदाराच्या सोबत जेव्हा भावी आयुष्य काढायचे असते, तेव्हा ते एकत्रितपणे अनुभवण्याचा आनंद काही निराळाच… कारण, जी व्यक्ती विरह अनुभवते, तिला जेव्हा समंजस जोडीदार मिळतो, तेव्हा तो अंधारात केलेला प्रवास, तिथल्या कटू आठवणी यांचा क्षणार्धात विसर पडतो. म्हणून इथे ओळ अशी आहे,
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या…
हेही वाचा – बाळा होऊ कशी उतराई…
म्हणून जोडीदाराचं महत्त्व पटवताना मी अजून एक विचार व.पुं.चा इथे मांडते, “अंधारातील प्रवासासाठी आपण कायम कोणाचा ना कोणाचा हात शोधत असतो, तसंच आपलाही हात कोणाला तरी हवा असतो…” खरं आहे हो… विरहाची चव घेतल्यानंतर जेव्हा आयुष्यात सुखाची चाहूल लागते, तेव्हा ते नाते विरहातून मिलनाकडे जाताना आता एकांत संपला आहे, तेव्हा सुखांनो माझ्या आयुष्यात येऊन मला साथ द्या, असं नायिका सांगत आहे.
एखाद्या स्त्रीला काय हवे असते? तर जोडीदाराचे भरभरून मिळणारे प्रेम आणि साथ… या प्रेमातून जे नवीन रोप जन्माला येते, तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने कृतार्थ झाल्यासारखे वाटते. कारण, पुढची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी, हात न सोडणारा साथीदार आणि चिमुकली पावलं ती वाट चालायला बळ देतात. हे व.पुं.नी विचारांतून तर, गदिमांनी नायिकेच्या मनातली ती भावना व्यक्त केली आहे. व. पु. म्हणतात, “आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की, धकाधकीची वाट पण सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं होऊन जातं…” सहजीवन देखील सुखाने भरून जावे आणि जाई-जुईच्या फुलांप्रमाणे त्यात सुगंध दरवळून चिमुकल्या पावलांनी अंगण देखील नांदते व्हावे, ही इच्छा गदिमांनी काव्याच्या रूपात फार सुंदर रीतीने मांडली आहे,
जोडप्याचे गुज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे…
हेही वाचा – वेगवान मुंबईचा लागतो लळा!
वैवाहिक सुखाची अभिलाषा ही प्रत्येक स्त्रीला असतेच. संसार म्हटला की, अनेक कटू-गोड आठवणी या आल्याच. परंतु, दोन मनांचं एक होणं म्हणजे देखील सुखच, नाही का!! गदिमा जेव्हा थकले, त्यावेळी सुचलेलं हे सकारात्मक गीत. लेखणी शेवटपर्यंत थांबली नाही… सुमधुर गीतांचा मधुघट हा तमाम श्रोत्यांना सुपूर्द करून केवळ सुखाला आमंत्रण करणारे गदिमा, संगीत दिलेले बाबुजी अर्थात सुधीर फडके आणि स्वरसाज ज्यांनी चढवला त्या आशा भोसले म्हणजे खरंच अलौकिक प्रतिभा!!!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


