सतीश बर्वे
भाग – 3
माझा मित्र सुबोधने त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली. जोशी काकूंच्या डायरी वाचत असताना त्यांच्या मनाचे हिंदोळे समजले…
अरविंदचं जाणं अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी होतं. मी पुण्याला जायला नको म्हणत असताना देखील हट्टाने गेला तो आणि शेवटी परत आला, तो शांतपणे झोपलेल्या चिरनिद्रा अवस्थेत! सुबोधच्या एका फोनवर सारे मित्र आमच्या घरी जमा झाले होते. त्यांनी आपापसात कामं वाटून घेतली आणि शक्य तितक्या लवकर ते अरविंदचा देह घेऊन आमच्या घरी परतले.
अरविंदला बघून अजूनही वाटत होतं की, तो नकळत डोळे उघडेल आणि म्हणेल मला की, ‘आई तुझं ऐकून घरीच थांबलो असतो तर, आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. आई मला माफ कर आणि न रडता निरोप दे.’ सुबोधच्या मित्रांच्या मदतीने अरविंदचा पुढचा प्रवास सुरळीत सुरू झाला.
सुचित्रा धीराची निघाली आणि लवकर सावरलं तिनं स्वतःला. पण मुलांचं काय? त्या कोवळ्या जीवांचं काय दोष होता की, इतकं लहान असताना त्यांच्या नशिबी हे भोग सोसायला यावेत! त्या जीवांना हृदयाला कवटाळून मी पुढे कितीतरी दिवस टिपं गाळली. पण त्याच जीवांनी मला सावरायला देखील मदत केली. दोन्ही मुलं आईच्या मदतीने परत नव्याने आयुष्य जगायला उत्सुक होती. त्यांच्या बाबांचं नसणं त्यांनी नाईलाजाने स्वीकारले होते. काळ कोणासाठी थांबत नाही. आमचं घर देखील अरविंदच्या धक्क्यातून हळूहळू सावरत होते.
अमेरिकेहून मी परत आल्यावर चाफ्याच्या झाडात झालेला बदल मला प्रकर्षाने जाणवला होता. पुढे तर लक्षात आलं होतं की, कोयत्याने त्याचं खोड कोणीतरी वक्राकार अर्धवट कापलं होते. ते बघून मला वाटलेली भीती शेवटी अरविंदच्या अकस्मात जाण्याने खरी ठरली होती. पूर्वी मी कितीदा तरी माझ्या मनीचे गूज त्या चाफ्याच्या झाडाला सांगायची. माझ्या खिडकीतून ते झाड मला बरोबर दिसत असे…
हेही वाचा – चाफा बोलेना… अरविंदच्या मृत्यूची आईला चाहूल
हल्ली माझा खूपसा वेळ अरविंदच्या मुलांना सांभाळण्यात जायचा, कारण सुचित्राचं ऑफिस परत सुरू झाले होते. मी तिला मुलांची काळजी न करण्याचे सांगून वेळ पडली तर, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबायला सांगितले होते. आजकाल चाफ्याशी बोलायला खरंच वेळ मिळत नव्हता एवढं खरं. पण मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. आता वेळ काढून मी चाफ्याच्या झाडाला अरविंदच्या जाण्याने झालेली पोकळी मी हळूहळू कशी भरून काढली, ते सांगणार होते. त्या इमारतीच्या आवारात असंख्य बांबू आणून ठेवले होते. शिवाय, पाण्याची एक टाकी बरोबर माझ्या खोलीच्या खिडकीसमोर ठेवलेली दिसली मला. आता चाफ्याच्या झाडाशी कसं हितगुज करायचं, हा मला प्रश्न पडला होता.
आजकाल खूप एकटं वाटायला लागलं होतं. कारण शोधलं तरी सापडत नव्हतं. मन दिवसेंदिवस उदास आणि कासावीस होत चाललं होतं. कदाचित, चाफ्याच्या झाडाशी हितगुज करता येत नसेल म्हणूनही असेल! कसं असेल झाड ते? नेहमीप्रमाणे पाण्यात अर्घ्य देणाऱ्या एखाद्या ऋषी प्रमाणे शांत अविचल असेल ना! का कापलेल्या खोडाच्या वेदनेने कण्हत असेल. मुलांच्या दिनक्रमात आजकाल मी इतकी व्यग्र असते की, थोडा वेळ काढून त्या चाफ्याच्या झाडाला भेटायला जायला देखील वेळ मिळत नव्हता.
हे गेल्यानंतर मी स्वतःला सावरलं कारण तीन मुले पदरात होती. प्रतिकूल परिस्थिती असूनही जगण्याची लढाई एकटीने लढली. पण अरविंदला असं धक्कादायकपणे गमावल्यानंतर जगण्यातील मजा निघून गेली आहे. आयुष्य नुसतं यंत्रवत झालंय. कधी कधी वाटतं की, बसं झालं आता सगळं. सुबोध सगळ्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे. मी आणखी किती दिवस पुरणार आहे. शेवटी वेळ आली की, जो तो आपली लढाई जिंकण्यासाठी जगत असतो. दोन-चार वर्षांत अरविंदची मुलं देखील मोठी होतील आणि आईला सांभाळतील.
हल्ली झोप येईनाशी झाली आहे. छातीत जळजळ वाढली आहे. सुबोधला मुद्दामच बोलले नाहीये, कारण चटकन मला सगळ्या तपासण्या करायला लावेल तो. त्यातून चुकूनमाकून काही अघटीत निघालं तर, नुकतंच स्थिरस्थावर झालेले घर पुन्हा विस्कळीत होईल. त्यापेक्षा जे होतंय ते सोसायचं ठरवलं आहे मी, कारण तेच सोपं आहे सगळ्यांच्या दृष्टीने.
चाफा देखील दिसत नाहीये. मनातील साचलेले दुःख त्याच्यापाशी बोलून मन थोडं हलकं करीन, पण ते देखील होत नाहीये. म्हणून उगाचच अनामिक भीती मनात येते आहे आणि त्या भीतीने मन आणखी घाबरून जायला लागलं आहे. राहून राहून वाटतंय की, एकदा वेळ काढून घराबाहेर पडावे आणि सरळ त्या चाफ्याच्या झाडाखाली जाऊन उभं राहावं. ती संधी एकदिवस अचानकपणे काही मिनिटांसाठी मिळाली. पायात चपला अडकवून मी घराबाहेर पडले. नेहमीच्या जागी झाड दिसेना. मी चुकून दुसऱ्या सोसायटीच्या आवारात तर, आले नाही ना, याची खात्री करून घेतली. पण नाही जागा तर तीच होती. मग ते झाड गेलं कुठे?
मला तिथे घुटमळताना बघून तिथला वॉचमन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “पत्ता शोधताय का?” मी म्हणाले, “पत्ता शोधतेय पण इथे असणाऱ्या चाफ्याच्या झाडाचा.”
“ते पार सुकून गेलं होतं आणि निष्पर्ण झालं होतं. त्यामुळे सोसायटीने ते तोडून त्या जागी पारिजातकाचं रोपटं लावलं आहे.” वॉचमनचे हे बोलणं ऐकून माझ्या काळजात चर्र झालं. मी निराश मनाने घरी परतले. आता उरलीसुरली आशा संपुष्टात आली होती, चाफ्याच्या झाडाशी हितगुज करण्याची.
हेही वाचा – चाफा बोलेना… आईचा एकटेपणा वाढतच गेला!
देवा, अरे काय वाढून ठेवले आहेस तू माझ्या आयुष्यात ते एकदा स्पष्टपणे सांगून का नाही टाकत. थोड्या थोड्या अंतराने असे धक्के का मला पचवायला लागत आहेत. नाही रे ताकद आता सहन करायची. सहनशीलता संपली आहे माझी. आणखी किती कठोर परीक्षा घेणार आहेस माझी तू. सोडव बाबा आता या सगळ्या यातनामय आयुष्यातून.
चाफा कुठे दिसेना
चाफा काही बोलेना
एकच इच्छा उरली
तुझ्या घरी मला ने ना
माझं मनोगत
माझ्या मित्राकडून म्हणजे सुबोधकडून मला मिळालेल्या हस्ताक्षरातील मजकूर आणि काकूंना मी आजवर जसं पाहिलं होतं, त्या आधारे जोशीकाकू आणि त्यांची मानसिकता, आजवर जगण्यासाठी त्यांनी केलेली लढाई आणि शेवटी शेवटी जाण्याची आत्यंतिक तळमळ मी जमेल तशी शब्दबद्ध केली आहे. चाफ्याच्या झाडाबरोबर त्यांच्या असलेल्या अनामिक नात्यासंबंधी वाचताना मला थोडं वेगळंच वाटलं. पण नंतर सुबोधने आईच्या मनात असलेलं चाफ्याच्या झाडाचं स्थान विस्ताराने सांगितले, तेव्हा खरोखरच जोशीकाकू़ंचं कौतुक वाटलं. त्या झाडाला आपलं हक्काचं कोणीतरी मानून त्याचा आधार घेऊन जगण्याची त्यांची कल्पना खरोखरच वाखाणण्याजोगी होती. काकूंना बघून खरंच कधीच वाटलं नाही की त्या आतून खचत चालल्या आहेत. पण दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं.
आम्हा सगळ्यांना फसवून जोशीकाकू आमच्यातून निघून गेल्या आहेत हे अजूनही मनाला पटत नाहीये. काकूंची आठवण कायम स्वरुपी रहावी म्हणून सोसायटीच्या आवारात आम्ही मित्रांनी चाफ्याची झाडं लावायचं ठरवलं आहे. काकूंच्या आठवणींचा चाफा सदैव बहरत राहण्यासाठी आम्ही मित्रमंडळ येवढं नक्कीच करू शकतो… पण आम्ही लावलेला चाफा बहरत नाही, तोपर्यंत तरी काकूंचे शब्द आमच्या मनाला टोचत राहतील, ‘चाफा बोलेना…’
काकूंवर लिहिताना खूप वेळा भावनिक झालो. डोळे भरून आले. मला लिखाण अर्धवट ठेवावे लागत होते. त्याच परिस्थितीत मी लिखाण कसंबसं पूर्ण केले.
समाप्त


