Friday, February 6, 2026

banner 468x60

Homeललितसंगीत मजूर नव्हे, कलावंत!

संगीत मजूर नव्हे, कलावंत!

राजू पाटील लच्छनकर

नमस्कार मी आनंदयात्री…

नुकत्याच झालेल्या विधानसभा तसेच नांदेड लोकसभा निवडणुकीत मी अगदी मी मग्न होतो. राजकीय क्षेत्रात काम करत असताना इतकी मोठी जबाबदारी पक्षानं तसेच आमचे खासदारकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण साहेबांनी टाकली. पण या धावपळीत, या गडबडीत, कुठेतरी एक मन साहित्यात रमत होतं. खरंच जीवन जगत असताना, जग ओळखता ओळखता आपण कोण आहोत, हेच कळत नाही. मलाही असा प्रश्न पडतो की, मी शेतकरी आहे, राजकारणी की, एक चिंतन करणारा? की मग मी एक साहित्यिक? इतक्या मोठ्या शब्दांत मी अडकणार नाही. माझ्या मनातील भावना मी आज व्यक्त करणार आहे.

शेतशिवारात गेलो की, मी माझ्या भावविश्वात जातो. एकदा का मी माझ्या भावविश्वात गेलो की, मग मी जग विसरतो. इतक्या धावपळीतही तसेच झालं आणि नेमकं मला कलावंत या विषयावर लिहावंस वाटू लागलं. मानवी संवेदना, चेतना, भावना,  भावबंध, सुखदुःख आणि एखादा विचार या सर्वांची अभिव्यक्ती होते, ती कलेद्वारे. ती कधी लिखाणातून होते किंवा मूर्तीतून किंवा संगीतातून! 72 कला आहेत, या सर्व मानवांच्या अभिव्यक्तीसाठी बनल्या आहेत.

शेतशिवारात काम करताना मला आता बरीच वर्षे झाली आहेत. माझ्या अनेक मित्रांमध्ये आणखी दोन नवे मित्र जोडले गेले. या दोघांचीही नावं सायलू होती. गरीब परिस्थिती होती, ते शेतमजूर होते. पण गावातील बँड पथकाचे ते सदस्य होते. त्यांची माझी चांगली ओळख होती अन् जिव्हाळाही होता.

हेही वाचा – जीव लावणारा संभाजी अन् नवसाची कंदुरी…

माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मुलाचं लग्न होतं. मला मांडव घालण्यासाठी त्यांनी बोलावलं. भारतीय संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी मांडव घालण्यात आला आणि मग बँड पथकाला सांगण्यात आलं की, काहीतरी मंगल संगीत वाजवा…

मी थोड्याशा उत्सुकतेने ते संगीत ऐकू लागलो आणि त्या बँड पथकात माझे दोन्ही मित्र होते. सायलू सनई वाजवत होता आणि दुसरा सायलू किरीट वाजवत होता. त्यांची जुगलबंदी रंगली होती. ते आपल्याच संगीताच्या धुंदीत वाजवत होते आणि त्यांचे संगीत माझ्या मनाला आणि माझ्या भावनेला साद घालत होते… त्याचे बोल होते, ‘दर्शन देरे, देरे भगवंता…’! मनात विचार येऊन गेला, या माणसांच्या जीवनात ईश्वराने काहीच दिलं नाही, ना संपत्ती, ना नाव… काही काही दिलं नाही, पण तीच लोक नाराज न होता ईश्वराकडे फक्त आणि फक्त दर्शन मागत होती! हे भाव माझ्या मनाला शिवून गेले. अक्षरशः माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ज्या ज्या वेळेस सत्याचा सामना होतो, त्यावेळेस मानवी भावना त्यांना साद घालतात. तसं काहीतरी घडलं होतं.

ही आमची मैत्री अशीच चालू राहिली. मग एकेदिवशी पुन्हा हे दोन सायलू एका साखरपुड्यात मला भेटले. एका गरीब बापाच्या मुलीचा तो साखरपुडा होता. जेव्हा मुलगी आणि मुलगा एकमेकांना अंगठी घालत होते, त्यावेळी जमलेल्या समुदायापैकी कोणाचंही लक्ष त्या बँड पथकाकडं नव्हतं. माझं सहज लक्ष गेलं आणि त्याच वेळी माझे मित्र दोन्ही सायलू यांचीं जुगलबंदी रंगली होती. यावेळी मात्र शब्द होते, ‘सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला…’ खरंच हे शब्द किती महत्त्वपूर्ण आहेत, त्या नववधू आणि वराच्या पुढील आयुष्यात! हे त्यावेळेस उपस्थितांच्या तसेच नववधू किंवा वर यांच्याही लक्षात आले नसेल. नेमक्या क्षणी, नेमक्या शब्दांत, नेमक्या भावना संगीतात व्यक्त केल्या गेल्या. त्या कलावंताच्या भावना मला कळल्या, माझ्या मनापर्यंत पोहोचल्या आणि त्यांच्या विषयीचा आदर वाढत गेला.

गरीब परिस्थितीत राहणारी ही मंडळी. पुढे चालून त्यांना एक संधी मिळाली आणि ते हैदराबादला एका बँड पथकात काम करण्यासाठी जाण्यास तयार झाले. मला भेटून गेले, मलाही बरं वाटलं. चांगली मोठी रक्कम त्यांना मिळणार होती.

उन्हाळ्याचे दिवस होते. शेतशिवारात फिरत असताना दिवसभराचा उकाडा जाऊन रात्रीच्या हवेतील गारवा अंगाला शिवत होता. आकाशात चांदण्या चमकत होत्या, कोपऱ्यात चंद्र हसत होता. त्या चांदण्यात  शेतशिवारात रात्र घालवण्याचा एक वेगळाच आनंद मी घेतो. माझी माणसं माझ्यासोबत होती. दुरून कोणीतरी माझ्याजवळ येत होतं, असं माझ्या लक्षात आलं. बघतो तर काय, हे दोन्ही सायलू! त्यांना सहज विचारलं, “मोठ्या शहरात काम सोडून इतक्या लवकर तुम्ही कसा काय वापस आलात?” मला वाटलं, काही दिवसांची सुट्टी घेऊन आले असतील… पण त्यांनी आम्हाला सांगितले की, “आम्ही कायमची परत आलो.”

मला थोडीशी चिंता वाटली. मी त्यांना विचारायला चालू केलं… “काय कारण होतं काम सोडून यायचं?” तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, “मोठ्या शहरात काम करणारा बँड पथकाचा मालक आम्हाला ‘संगीत मजूर’ समजू लागला. आम्ही संगीत मजूर नाही तर, आम्ही कलावंत आहोत… गरीब असलो तर काय झालं, आम्हालाही भावना आहेत… आणि कदाचित आमच्या कलेचा बाजार मांडलेला आम्हाला आवडला नाही.”

त्यांचे ते शब्द माझ्या कानावर येत होते आणि मग मनात विचार , ‘खरंच ज्यांना प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, ते खरंच कलावंत आहेत का? ज्यांनी आपली कला विकली या बाजारात किंवा मग आपली कला विकण्याची ज्यांच्याजवळ कला आहे, ते कलावंत आहेत का? की मग असे सामान्य कलावंत जे आपल्या कलेचा आनंद घेतात, हे खरे कलावंत आहेत?’ मनात अनेक प्रश्न होते. आज ‘कलेसाठी कला की, जीवनासाठी कला, की समाजाच्या ज्ञानासाठी कला…’ याद्वारे सर्व प्रश्नांची उकल होत होती आणि कलावंतांच्या आनंदासाठी कला, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो!

हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

माझी भावविश्वातली तंद्री तोडून दोन्ही माझे मित्र मला म्हणू लागले, “दादा झाले गेले विसरून जाऊदे, आम्ही कलावंत आहोत आणि आमच्या कलेचा आनंद आम्ही घेतो. तुमच्यासारखे श्रोते असले की, मग आमचा आनंद द्विगुणीत होतो. या आनंदाला कुठल्याही पैशाच्या बंधनात आम्ही मोजू शकत नाही.”

मला खूप आनंद झाला होता! खरंच मी खऱ्या कलावंतांसोबत होतो. मग मी त्यांना एक विनंती केली की, “होऊन जाऊदे तुमची जुगलबंदी.” माझी माणसं होती आणि ती दोन कलावंत… मला उत्सुकता होती की, यावेळेला हे कलावंत कोणतं गाणं वाजतील…? आणि माझा विश्वास खरा ठरवत त्यांनी गाण्याची निवड केली ते गाणं नव्हतं तो एक अभंग होता…

लागली समाधी ज्ञानेशाची

इंद्रायणी काठी…

जेव्हा ज्ञानेशाची समाधी लागली तर, जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी त्यांनी निर्माण केली. खरंच, हे सामान्य कलावंत असतील, पण हे कलावंत जेव्हा त्यांच्या जुगलबंदीमुळे रमतात, तेव्हा त्यांची खरंच समाधी लागते आणि याच समाधीपुढे मी नतमस्तक होतो. याच क्षणांचा आनंद मी घेतो. त्यांच्या त्या जुगलबंदीचा मी आनंद घेण्यात रमून गेलो.

मी एक आनंदयात्री…


मोबाइल –  6304873724

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!