ॲड. कृष्णा पाटील
रविवार होता. सकाळची वेळ होती. आठचा सुमार असावा… कोर्टाला सुट्टी असल्याने निवांत होतो. चहा घेता घेता वर्तमानपत्र वाचत होतो. नेहमीच्याच बटबटीत बातम्या. राजकारणी नेत्यांच्या एकमेकांना शिव्या, झोपडपट्टी परिसरातील खून, कुठे मारामारी, कुठे चोरी… रविवार असूनही वाचण्यासारखं वेगळं काही नव्हतं.
एवढ्यात बाहेर कडकलक्ष्मीच्या ढोलक्याचा घाईंSS घुईंSS घाईंSS घुईंSS असा आवाज येऊ लागला. मी दरवाजा उघडला. गेटसमोर कडकलक्ष्मी घेऊन फिरणारी एक महिला उभी होती. मी पुढे गेलो. पत्नी आतल्या खोलीत काहीतरी झाडलोट करीत होती. मी पत्नीला हाक मारली. कडक लक्ष्मीच्या बाईला काहीतरी देण्यासाठी आण म्हणालो.
मी त्या बाईला निरखून पाहिले. डोक्यावर देवी ठेवलेली वेताच्या काड्यांची नक्षीदार बुट्टी होती. हळद कुंकू आणि खणानारळांनी बुट्टी भरून गेली होती. अंगावर पूर्ण विटलेली रया गेलेली जुनाट साडी होती. हातात एकच साधी बांगडी होती… अनवाणी होती. चेहऱ्यावर कमालीचे दारिद्र्य पसरलेले होते.
पत्नी येईपर्यंत मी तिची विचारपूस केली. तिला विचारलं, “तुझं नाव काय?”
ती म्हणाली, “सरस्वती देशमुख. पण गावभर मला वळखतात ते लक्ष्मीवाली बाई म्हणून!”
“कोणत्या गावची?”
“आमी पार तिकडचं बेळंकीचं. पण आता इकडं गांधीनगरला राहतूय.”
“मुलं किती?”
“तीन मुली आणि दोन मुलगे हाईत.”
“मुलं मोठी आहेत का?”
“सगळीच साळंला जात्यात.”
“नवरा काय करतो?”
“एका पायानं लंगडा हाय. रोज दारू पितू. रोज माझ्याकडून दारूसाठी पैसं घीतू. दुसरं कायच करत न्हाय.”
मनाला चरका बसला. खूप वाईट वाटलं. तरणीताठी पण म्हातारी दिसणारी अनवाणी चालणारी बाई, पाच मुलं आणि दारुड्या नवऱ्याची जबाबदारी सांभाळणारी बाई, कसले कसले भोग तिच्या वाट्याला आले आहेत!
हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?
मी म्हटलं, “बसून खातोय म्हटल्यानंतर पैसेच द्यायचे नाहीत. पोटाला घालते तोच उपकार समज असं म्हणायचं.”
“तसं पण करून बघिटलं. दिवसभर रुसून बसतंय. रात्री-अपरात्री उठून दांडक्यानं मारतंय. एकदा तर रात्री कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने सपासप मारलं. हातावर वळ उठलं. अजून गेलं न्हाईत.”
तिच्या हातावर माझी नजर गेली. दोन उभे काळसर खरबरीत पट्टे दिसत होते. ते पाहून माझं काळीज पिळवटून गेलं. पण ती मात्र निर्विकार चेहऱ्याने मला सांगत होती. कदाचित, दुःख पचवण्याची तिची ताकद आता निबार झाली असावी.
ती पुढं म्हणाली, “मग रोज सकाळी आठ वाजल्या की, पन्नास रुपय द्याचं. तेवढ्या पैशात दीशी दारूची बारकी बाटली यीतीया. मग दिवसभर त्याच तंद्रित पडून राहतंय.”
मी विषय बदलायचा म्हणून विचारले, “तुला लक्ष्मीची बाई म्हणून का ओळखतात?”
“कारण काय तर, घराघरांत फिरत मी कडकलक्ष्मी घीऊन जाती. तिच्या नावानं लक्ष्मीपूजन करती. उद्यापन मांडती. नवस-साखरपूजा घडवती.”
मी विचारले, “हे काम तू कधीपासून निवडलं?”
“निवडतिया कशाला ओ? आविष्यानं माझ्या हातात दिलं. त्याला मी तर काय करणार? नवरा असा लुळापांगळा भेटल्यावर पोराबाळांचा संसार कसा चालवायचा? ना घर, ना दार, ना शेतीवाडी, पैसं कुठनं आणायचं? सुरवातीला तर भिकच मागत हुती. पण नंतर माझी कर्नाटकातली मावशी आली. म्हणाली “बाई, कडकलक्ष्मी घीऊन फिर. सरदा तरी हाय ना लोकांत. मिळतील चार पैसं.!”
ती पुढे सांगू लागली, “पैल्यापैल्यांदा कडकलक्ष्मी डोस्क्यावर घीऊन गावभर फिरताना छातीत गोळा उठायचा. लोकं पाहतील का? हसतील का? वात्रट बुलतील का? पण मी मनात म्हणायची, “ही माझी लाज न्हाय, ही माझी जगण्याची झुंज हाय!” आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला.”
“दर गुरुवारी पाटचं उठती. लक्ष्मीची मखर सजवती. फुलं लावती. तीळ-चमचमीत-साखर खोबऱ्याची पुरचुंडी भरती. नंतर बाहेर पडती… “कडकलक्ष्मी आली हो… उद्यापन करायचंय का?”
“कधी कुणी हसतं. कुणी स्वागत करतं. कधी एकांदी नवी नवरी डोळं पुसत लक्ष्मीपुढं बसती. कधी एखादी बाई कुजबुजती, “हिच्या हातचं पूजन केलं की, पैशाची चणचण कमी हुती!” पण मला म्हायती हाय, मी काय चमत्कार करत न्हाय. मी नुसता धीर दीती. आधाराचं बुलती. एकदा तर गळाभर दागिनं घालून एक गुरीपान बाई दीवीपुढं बसली. अंगावर लय म्हागडी साडी हुती. हातात सोन्याच्या बांगड्या हुत्या. लई श्रीमंत घराण्यातली हुती. म्हणाली, ‘देवीला नवस लाव. माझ्या नवऱ्यात काहीच दम नाही. त्याला रोज फॅक्टरी आणि पैसा एवढंच दिसतंय. आमच्या मावस सासऱ्याचा एक मुलगा आहे. तो लांबच्या गावात राहतोय. पैलवान गडी आहे. माझा त्याच्यावर जीव आहे. तुला काय पण देते. पण मला तेवढा गडी मिळू दे.’ तिनं दागिना काढण्यासाठी गळ्यात हात घाटला. पण मी म्हणाली, ‘तायडे, आज दीवीला अडचण हाय. दोन दिवसांनी यीती. चांगला कौल लावूया. मी तिथून काढता पाय घेटला. पुन्हा त्या घराकडं फिरकली पण न्हाय.”
तिचं ऐकून सर्द झालो. कसले कसले विचित्र अनुभव हिला आले असतील… पण तरीही ती ताठ उभा आहे… कुठल्याही फालतू मोहाला बळी न पडता… स्वतःचा स्वाभिमान न विकता… संकटांनी घेरलेलं असलं तरी न डगमगता… मला तर वाटलं, ती लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी नेत नाही. ती त्यांच्या मनातली आशा नेत आहे. त्यांच्या कडवट जगण्याला कडकलक्ष्मीचं गोड रूप देत आहे. खरं म्हणजे ती लुळ्यापांगळ्या नवऱ्याची अबला बायको नाही. स्वतःच्या पायावर उभे राहून कष्टाने जगणारी स्त्री आहे. श्रद्धेला श्रमाशी जोडून कष्ट करणारी लक्ष्मी आहे. आज लोक तिला म्हणतात, “लक्ष्मीवाली बाई आली!” पण ती मनात हसते. कारण, ती कडकलक्ष्मी नाही. ती संघर्षातून घडलेली खरीखुरी लक्ष्मी आहे.
मग तिने माझ्याकडे मोर्चा वळवला. लाजत लाजत विचारले, “तुम्ही काय करता?
मी गेटवरच्या पाटीकडे बोट करून दाखवलं. म्हणालो, “मी वकील आहे. कोर्टात जातो.”
“मजी नुकरीला हाय म्हणा की.”
“नोकरी वेगळी. मी कोर्टात जाऊन न्यायदान देण्यासाठी मदत करतो.”
“म्हंजे काय असतं?”
“म्हणजे कोर्टात येणाऱ्या लोकांना न्याय मिळतो.”
“न्याय मिळाल्यावर काय हुतं?”
मी म्हणालो, “न्याय मिळाल्यावर माणसाला सुख, समाधान मिळतं. माणूस आनंदाने राहतो.”
“मी कोर्टात आली तर मला न्याय मिळंल का? किती पैसं लागत्यात कोर्टात याला? तेवढं मी जमवीन कुठनं तरी.”
तोंडात मारल्यासारखं झालं राव. माझी बोलतीच बंद झाली. ज्या व्यवस्थेत मी काम करतो ती व्यवस्था खरंच हिला न्याय देऊ शकेल का? मी कोणासाठी काम करत आहे? हिच्यासारख्या असंख्य पिचलेल्या बायांसाठी मी काम करत असलेली व्यवस्था काय करते? माझ्यासमोर असंख्य प्रश्न उभे राहिले.
हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!
ज्या समाजात ती जन्माला आली, तो समाजच अन्यायग्रस्त आहे. देशाच्या स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली, तरी सुद्धा दारोदारी भीक मागायला लागावी, ही व्यवस्था आपण बदलली नाही. या व्यवस्थेने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांनी कोणत्या कोर्टात दाद मागायची? त्यांच्या वाट्याला जे दुःख आणि भोग आले त्याला कोण कारणीभूत आहे? त्यांनी कोणत्या व्यवस्थेला जाब विचारायचा? भोळ्या समजुतीने आपण असेही म्हणू शकतो की, त्यांच्या नशिबाने त्यांच्या वाट्याला हे सर्व आले आहे. परंतु लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये लोकांचे नशीब बदलण्याचे काम संसद करत असते. संसदेमध्ये एखादा कायदा मंजूर झाला तर, कोटी कोटी लोकांचे जीवनमान बदलून जाते. परंतु सामान्य माणसाच्या, गोरगरीब जनतेच्या बाजूने कायदे करण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना यायला हवी. त्यांची तशी इच्छाशक्ती असायला हवी!
मी विचारात हरवलो होतो. एवढ्यात पत्नी आली. तिने आणलेली वीस रुपयची नोट सरस्वती बाईला दिली. तिने उजव्या हाताने घेतली. वर बुट्टीत टाकून दिली. पाठमोरी होऊन ती चालू लागली.
स्वातंत्र्यानंतरच्या कुठल्याच अर्थव्यवस्थेने दखल न घेतलेल्या समाजातील एका पाठमोऱ्या अभागिनीकडे मी असहाय्यपणे पहात राहिलो!!!


