Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितकोर्टकचेरी करण्यापेक्षा…, वकिलांनी प्रशांतला दिला मोलाचा सल्ला

कोर्टकचेरी करण्यापेक्षा…, वकिलांनी प्रशांतला दिला मोलाचा सल्ला

ॲड. कृष्णा पाटील

भाग – 2

डॉ. प्रशांतने नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मूळ विषयाला हात घातलाच. “सर, आता आम्ही नाशिकला कायमचे शिफ्ट झालो आहोत. म्हणून इथली जमीन विकायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता ती जमीन करीतच आहात. तुम्हीच ती जमीन घ्यावी, अशी आमची विनंती आहे.”

क्षणभरच घार्गे सर गोंधळून गेले. त्यांना काही बोलावे सुचत नव्हते. परंतु ते सावध झाले आणि म्हणाले, “डॉक्टर, मला ती जमीन परवडणारी नाही. तुम्ही ती कुणालाही विका.”

प्रशांत म्हणाला, “ठीक आहे. समजा मी जमीन कुणाला विकली तरी तुमच्या बागेचे पीक जाईपर्यंत त्या जमिनीचा विकत घेणाऱ्या नवीन मालकाला ताबा घेऊ देणार नाही. शिवाय, तुमचे जे पण काही पुढील एका वर्षाचे नुकसान झाले असेल, ते पण मी द्यायला तयार आहे.”

घार्गे सर म्हणाले, “ठीक आहे. मी माझ्या बायका, मुलांना विचारतो आणि तुम्हाला दोन दिवसांत भेटायला येतो.”

पाच-सहा दिवस झाले. रविवार होता. वेळ सकाळची होती. डॉक्टर प्रशांत आपल्या केबिनमध्ये बसला होता. एवढ्यातच त्याला घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले येताना दिसली. घार्गे सर नेहमीप्रमाणे आनंदाने आणि समाधानाच्या वृत्तीने आलेले दिसत नव्हते. त्यांचा चेहरा तणावग्रस्त झाला होता. डोळे पण तांबरलेले होते. त्यांनी केबिनमध्ये प्रवेश करताच घार्गे सरांचा थोरला मुलगा डॉक्टर प्रशांतला म्हणाला, “डॉक्टर तुम्ही आमच्याशी अशी दगाबाजी करायला नको होती. आम्हाला धोका देऊन तुम्ही काय मिळवले?”

हेही वाचा – डॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

डॉक्टर अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाले, “प्रमोद, अरे तुला नेमकं झालंय काय? मी कसली तुमच्याशी दगाबाजी केली?”

एवढ्यातच धाकला मुलगा, प्रसाद म्हणाला, “तुम्ही तुमची जमीन अशी मधेच विकणार होता तर, आम्हाला ड्रॅगन बाग वगैरे लावत असतानाच तुम्ही सांगायला पाहिजे होतं. त्या जमिनीचा कोपरान् कोपरा आम्ही पिकवला आहे. ती संपूर्ण जमीन बागायत केली आहे. त्यामध्ये आम्ही कष्ट ओतले आहेत. त्यामध्ये पाइपलाइन केली आहे आणि आता तुम्ही ती जमीन विकायला लागला आहात.”

डॉक्टर प्रशांत म्हणाला, “अरे, परंतु आपला करारच मुळात पाच वर्षाचा होता. ती पाच वर्षे सुद्धा आता संपत आली आहेत. शिवाय तुम्ही एकाही वर्षाचं भाडं दिलेलं नाही. त्यामुळे मी दगाबाजी करण्याचा प्रश्न येतो कुठे? तुझे वडील आणि मी एका ताटात जेवलो आहे… असे शब्द तुझ्या तोंडात शोभतात का तरी?”

थोरला मुलगा खुर्चीवर बसला आणि कागदाचे भेंडोळे डॉक्टरांच्या पुढे पसरले. म्हणाला, ‍”हा घ्या हिशोब. एवढे पैसे द्या आणि तुम्ही कुणालाही जमीन विका. आमची काहीही हरकत नाही. पण आमचा हिशोब भागवत नाही, तोपर्यंत तुम्ही कुणी त्या जमीनीत पाऊल ठेवायचं नाही.”

डॉक्टर प्रशांतने हिशेबाचा तो कागद बघितला आणि त्याला भोवळच आली. थोडा वेळ त्याला काहीच समजत नव्हते. त्या कागदावरचा हिशेब आणि ते आकडे पाहिले अन् प्रशांतला घाम फुटला. रुमालाने त्याने कपाळावरचा घाम पुसला. संतापाने तो म्हणाले, “तोंडी ठरल्याप्रमाणे तुम्ही पाच वर्षे जमीन करणार होता. आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. एक वर्ष राहिले आहे… आता तुम्ही माझ्याकडे ऐंशी लाख रुपयांची मागणी करायला लागलेला आहात! हा कोणत्या प्रकारचा हिशोब आहे? मला काही समजत नाही. एक काम करा. तुम्ही अजून एक वर्ष जमीन करा. मी पुढच्या वर्षी जमीन विकीन.”

एवढ्यातच घार्गे सर म्हणाले, “डॉक्टर, आता एकदा आपल्या दोघांच्या नात्यांमध्ये मिठाचा खडा पडला तो पडला. आता काही झालं तरी तो भरून निघणार नाही. तुम्ही जमीन आज विका किंवा पुढच्या वर्षी विका. आमची मुलं म्हणतायेत, त्या पद्धतीने पासष्ट लाख रुपये द्या आणि आम्हाला मोकळे करा.” 

शब्दाला शब्द वाढत गेला. डॉक्टर प्रशांतचा बीपी पण वाढत गेला. एका ताटात जेवणारा माणूस असा बदलू शकतो? ज्याच्यासाठी एवढे केले तो इतका स्वार्थी होऊ शकतो? डॉक्टर प्रशांतचं डोके गरम झाले. तळपायाची आग मस्तकाला गेली. परंतु आता बोलूनही काही उपयोग नव्हता. तो खाली मान घालून विचार करीत होता. त्याचं संपूर्ण शरीर कंप पावत होतं. पुन्हा एकदा घार्गे सर निर्दयपणे म्हणाले, “तुम्ही विचार करा आणि आम्हाला काय ते लवकरात लवकर कळवा.”

घार्गे सरांनी धाडकन् केबिनचे दार उघडलं आणि तिघेही ताडताड चालत केबिनच्या बाहेर निघून गेले.

प्रशांतने टेबलवरची पाण्याची बाटली घेतली. त्यांनी शांतपणे तीन चार घोट पाणी घेतले. दोन मोठे दीर्घ श्वास घेतले आणि पत्नीला हाक मारली. आवाजातला बदल जाणून पत्नी धावत पळत आली. डॉक्टर प्रशांत म्हणाला, “आताच घार्गे सर येऊन गेले…” आणि त्यांनी पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यावर ती बिचारी सर्द झाली. तिला आश्चर्य वाटले… तिला ही गोष्ट पटेनासी झाली.

तिने तिच्या भावाला फोन केला. तिचा भाऊ म्हणजे काशिनाथ आण्णा. नागपाडा या परिसरात आण्णांचा चांगला वट होता. आण्णा म्हणजे गरिबांच्या बाजूने कायम न्याय देणारा माणूस अशी त्यांची ख्याती होती.  डॉक्टरची पत्नी तिच्या भावाला म्हणाली, “एक तातडीचे काम आहे. असशील त्या परिस्थितीमध्ये निघून ये.”

दुसऱ्या दिवशी काशिनाथ आण्णा डॉक्टरकडे आले. प्रशांतने त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. आण्णांनी लगेचच आपल्या वकील मित्राला फोन लावला आणि घरी बोलावून घेतले.

खरं म्हणजे डॉक्टर प्रशांत अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता. आपण ज्या माणसाला अठ्ठावीस वर्षे जीव लावला, तो हाच का माणूस, असा प्रश्न त्याला पडला होता. पैशासाठी, जमीन-जुमल्यासाठी माणूस कोणत्या थराला जातो, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. घार्गे सरांचं सोडा, निदान ते जमीनजपमल्याला भूलले… परंतु ज्या प्रसादला परदेशात नेऊन सेटल केला, त्याच्यासाठी इतका पैसा ओतला, पोटच्या मुलासारखा ज्याला जीव लावला, त्याने सुद्धा या थराला जावे? सेटल होईपर्यंत तो मला गुरू मानत होता, पण प्रॉपर्टीच्या मोहाने तोही पूर्ण बदलला…

हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

प्रशांत असा विचार करीत होता, इतक्यात वकील साहेब घरी आले. डॉक्टरांच्या केबिमध्ये सर्वजण बसले. वकिलाला आण्णांनी सर्व हकीकत सांगितली. वकील म्हणाले, “घार्गे सरांचा आणि तुमचा तोंडी करार झाला आहे. त्याला कायद्यामध्ये कुठेही स्थान नाही. वास्तविक तुमची जमीन त्यांनी बेकायदेशीररित्या त्यांच्या ताब्यात ठेवली आहे. तोंडी करारपत्रानुसार जमीन त्यांच्या ताब्यात आहे, असे मानून आपण कोर्टात गेलो तर, ती जमीन परत मिळवण्यासाठी तुमची दहा-पंधरा वर्षे कुठे जातील समजणारही नाही. आपणास कोर्ट-कचेरीची पायरी न चढता वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. मला असं वाटतंय तुम्ही सरळ काशिनाथ आण्णांना ती जमीन कसण्यासाठी दिली आहे असे एक करारपत्र करून द्या.”

काशिनाथ आण्णाकडे बोट करून वकील म्हणाले, “…आणि आण्णा, तुम्ही सरळ ती जमीन मी करायला घेतली आहे. त्यामुळे येथे कोणी यायचे नाही असा पवित्रा घ्या. तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तोंडी करार असल्यामुळे घार्गे सर कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही.”

दोन दिवसांनी करारपत्र तयार करण्यात आले. देणार घेणाऱ्यांच्या सह्या झाल्या. सोमवारी सकाळी काशिनाथ आण्णांनी ते करार पत्र बॅगेत टाकले. बॅग काखेला अडकवून ते सरळ शेतात गेले. त्यांच्या पाठोपाठ दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन आले. बघता बघता कामाला सुरुवात झाली.

इतक्यात घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले तिथे आली. त्यांनी काशिनाथ आण्णांना विचारले, “तुम्ही कुणाला विचारून येथे ट्रॅक्टर घातला आहे. याचे परिणाम वाईट होतील.”

काशिनाथ आण्णा शांत होते. त्यांनी बॅगेतून करार पत्राची झेरॉक्स काढली. ती घार्गे सरांच्या हातात दिली. घार्गे सरांनी ती वाचली आणि परत देत म्हणाले, “असले करारपत्र कुणालाही करता येईल. मी तुमच्या अगोदर ही जमीन घेतली आहे.”

काशिनाथ आण्णा म्हणाले, “घार्गे सर, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज आला तेवढे बस्. उद्यापासून या जमिनीमध्ये पाऊल ठेवाल तर तुम्ही घराकडे परत जाऊ शकणार नाही. तुम्हाला पुन्हा यायचे असेल तर तुमच्या पत्नीला सांगून या.”

आण्णांच्या रागाचा अवतार बघून घार्गे सरांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी जमिनीतून काढता पाय घेतला. ते थोड्या अंतरावर गेले असतील. काशिनाथ आण्णांनी त्यांना परत बोलवून घेतले आणि एकदा सांगितले, “कुठे पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेला तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी तुम्ही शिक्षक आहात. परंतु तसा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचे परिणाम वाईट होतील, हेही ध्यानात ठेवा. आणखी एक गोष्ट. डॉक्टर प्रशांत हे माझे मेव्हणे आहेत. आता ऐंशी लाख काय त्यांच्याकडे ऐंशी रुपये जरी मागितले तरीसुद्धा व्हायचा तोच परिणाम होईल. त्यामुळे झालं गेलं विसरून आता या जमिनीचा आणि डॉक्टरकडून पैसे उकळण्याचा नाद सोडून द्या.”

घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले पाठीमागे न पाहता त्यांच्या घराच्या रस्त्याला लागली.

काशिनाथ आण्णांनी शेतातूनच डॉक्टरला फोन केला. वकिलांनाही फोन केला. त्यांना शेतात बोलवून घेतले. एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्यावर जे समाधान मिळते, त्या समाधानाने डॉक्टर प्रशांत शेतात आला. शेतात चाललेल्या मशागतीकडे शांतपणे पाहू लागला. प्रशांत वकिलांना म्हणाला, “वकील साहेब, माझे ठीक आहे. माझ्या पाठीमागे आण्णा तरी होते. परंतु गरीबावर असा प्रसंगा आला तर त्याने काय करायचे?”

वकील साहेब म्हणाले, “डॉक्टर खरं सांगू का? आजकाल गरिबांनी कुणावर आंधळा विश्वास ठेवावा, असे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टकचेरी करण्यापेक्षा कुणावर आंधळा विश्वास न ठेवलेला बरा.”

समाप्त


मोबाइल – 9372241368

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!