Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeललितकृष्णसर्प… उदय सरांचं खरं रूप ऐकून राजेंद्र आणि सविता हादरलेच!

कृष्णसर्प… उदय सरांचं खरं रूप ऐकून राजेंद्र आणि सविता हादरलेच!

भाग – 2

सहा महिन्यांपूर्वी उदय सरांचा मृत्यू झाला त्यावेळी तुम्ही दोघं आला होतात… त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही होतात… पण सरांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता…!’ वसुमती ताईंनी शांतपणे सांगितलं.

राजेंद्र चित्कारला, ‘काय? म्हणजे?’

‘म्हणजे, सरांना नैसर्गिक मृत्यू आला नाही. यासाठीच मी तुम्हाला बोलावले. तुम्हाला सर्व मागचा इतिहास सांगायचा आहे.’ वसुमती ताईंनी राजेंद्र आणि सविताला खास यासाठीच बोलावून घेतलं होतं.

माझा जन्म बेळगावचा. मी ज्या कॉलेजात शिकत होते, त्याच कॉलेजात सर फिजिक्स शिकवायला आले. तरुण, हँडसम. थोड्याच दिवसात समस्त मुली त्यांच्यावर फिदा झाल्या. त्यांना पण मुलींमध्ये मिसळायला आवडायचे. मी ज्या बेळगावच्या गल्लीत राहत होते, त्याच गल्लीत ममता राहायची. दिसायला एकदम सुंदर. आम्ही दोघी एकत्र सायकलवरून कॉलेजला जायचो. सरांच्या रुबाबाची भूल तिच्यावर होती आणि माझ्यावर पण होती. तिने सरांचा  ध्यास घेतला होता. मग काही दिवसांनी ती कॉलेजला लवकर जायला लागली. काही मैत्रिणी ती सरांबरोबर कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये पाहिल्याचे सांगत होत्या, पण मी मात्र स्वत: कधी पाहिले नाही. काही महिन्यांनी ममता कॉलेजला यायची बंद झाली. मी तिच्या घरी जाऊन तिची चौकशी पण केली, पण तिच्या वडिलांनी ती मुंबईत कॉलेजसाठी गेली म्हणून सांगितल. ममता नंतर अनेक वर्षांनी कोल्हापुरात एका लग्नात भेटली. तो विषय पुढे येईलच… कॉलेजच्या नाटकात मी भाग घेतला. सर नाटक बसवत होते. या नाटकात आणखी एक मुलगी काम करत होती, ती सरांसाठी पागल झाली होती. सर पण तिला खेळवत होते, हे दिसत होते. या नाटकामुळे माझी सरांशी ओळख झाली. अचानक एक दिवस सर माझ्या घरी आले. त्यांनी माझ्या वडिलांकडे माझ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माझे आई-वडील खूश झाले. एवढे देखणे, हुशार स्थळ आपणहून आल्याने ते फारच आनंदीत झाले. आमचा साखरपुडा झाला ही बातमी सर्वत्र पसरली तशी माझ्याबरोबर नाटकात काम करणारी दुसरी मुलगी घाबरीघुबरी झाली. मला एकदा भेटायला आली. ‘वसुमती, सरांबद्दल तुझा साखरपुडा झाला ही बातमी खरी का?’

‘हो गं… रविवारी झाला साखरपुडा.’

ती नर्व्हस होत गप्प राहिली. डोळ्यात अश्रू आले होते. तशाच रडवल्या स्वरात म्हणाली, ‘सरांनी मला लग्नाचा शब्द दिला होता पण…’

‘हे तू आधी नाही का सांगायचंस?’

‘काय सांगू, कप्पाळ माझं. मी फसले गं…’ असं म्हणत रडत रडत ती निघून गेली. हे तिचं फसणं नंतर माझ्या लक्षात आलं, त्यावेळी मी सरांबरोबर लग्न या जगात मश्गुल होते. त्याचवर्षी मेमध्ये माझं सरांबरोबर लग्न झालं. मी ग्रॅज्युएशननंतर बी.एड् करायचं ठरवलं. आम्ही किर्लोस्कर रोडवर बिऱ्हाड केलं. सर त्यांच्या स्कूटरवरून मला कॉलेजमध्ये सोडायचे आणि मग कॉलेजला जायचे. माझं बी.एड् झालं आणि सरांनी रत्नागिरीच्या कॉलेजात नोकरी पकडली. सर तसे मूळ लांजा तालुक्यातील. मी पण रत्नागिरीस आल्यावर इथल्या शाळेत नोकरीला लागले. लग्नापासून रत्नागिरीत येईपर्यंत माझे आयुष्य आनंदात गेले. त्यावेळी रत्नागिरी फार मोठं शहर नव्हतं. सरांनी आल्या आल्या एक प्लॉट विकत घेतला आणि घर बांधायला सुरुवात केली. माझी शाळा थोडीशी लांब म्हणून सर मला सोडायला यायला  लागले. शाळा सुटल्यावर मी एसटीने यायची. माझी शाळा कन्याशाळा होती. त्यामुळे सर्वच मुली आणि सर्व शिक्षिका. सर मला सोडायला यायचे, तेव्हा इतर शिक्षिका पाहायच्या. बहुतेकजणी सरांच्या पर्सनॅलिटीने भारावल्या होत्या. त्यातील कुमुद ही सरांची जास्त चौकशी करायची. कुमुद दापोलीची. लग्न  झालेली. नवरा दापोलीत आणि ही रत्नागिरीत. याचदरम्याने मी प्रेग्नंट राहीले आणि सहाव्या महिन्यापासून रजेवर गेले आणि पहिले बाळंतपण म्हणून माहेरी बेळगावला गेले. या दरम्यान मला शाळेतील एका सहशिक्षिकेचे पत्र आले की, तुझा नवरा आणि या कुमुदचे प्रेमप्रकरण जोरात सुरू आहे. मी आठ महिन्यांची गरोदर त्यामुळे रत्नागिरीला येऊ शकत नव्हते, म्हणून माझ्या धाकट्या भावाला रत्नागिरीस पाठविले. तेव्हा त्याला कळले, सर रत्नागिरीत नव्हते. त्याने कॉलेजात, मित्रमंडळीत चौकशी केली, पण कुणाला माहीत नव्हते. कंटाळून तो बेळगावला येण्यासाठी एसटी स्टॅण्डवर आला एवढ्यात त्याच्या समोर महाबळेश्वर-रत्नागिरी एसटी उभी राहिली. त्याचं सहज लक्ष गेलं तर त्या गाडीतून सर आणि एक बाई खिदळत उतरत होती. त्याने पुढे जाऊन सरांना कुठे गेला होतात, असे विचारले. तर सर त्याच्यावरच डाफरले, ‘यापुढे कळविल्याशिवाय येत जाऊ नकोस,’ असे म्हणून रिक्षात बसून निघून गेले. बेळगावात आल्यावर माझ्या भावाने मला सर्व परिस्थिती सांगितली. अवघडलेल्या परिस्थितीत मी काही करू शकत नव्हते, पण मी माझ्या शाळेतील मैत्रिणीच्या संपर्कात होते. तिच्या म्हणण्यानुसार कुमुदचा नवरा शाळेत आला होता आणि शाळेत सर्वांसमोर त्याने बायकोच्या दोन-तीन थोबाडीत मारल्या आणि तिला तिच्या माहेरी पाठविले. मला फार दु:ख झाले. मी त्यांना दोन पत्रे पाठविली, पण त्यांनी उत्तर पाठविले नाही. बेळगावला विभाचा जन्म झाला. माझ्या वडिलांनी तार करून सरांना ही बातमी कळविली, पण कन्येचे तोंड पहायला ते आले नाहीत.

हेही वाचा – कृष्णसर्प… वसुमतींनी रत्नागिरीला बोलावून दिली धक्कादायक माहिती!

तीन महिन्यांनंतर मीच विभाला घेऊन रत्नागिरीला आले. ‘महाबळेश्वरमध्ये कोण होतं बरोबर?’ असा मी जाब विचारला, त्यावर, ‘हे काही खरं नाही. माझ्या वैयक्तिक बाबीत लक्ष घालू नकोस,’ एवढं बोलून हा गृहस्थ घोरू लागला. त्या दिवसापासून मी त्यांच्यासोबतचे नवरा-बायकोचे नाते संपवले. नाईलाजाने एका घरात राहात होतो, लहान मुलगी होती, तिला वाढवायची होती. नोकरी करत होते. जेवण करत होते. रात्री विभाला जवळ घेऊन रडत होते…

मधेच ताई राजेंद्रला म्हणाल्या, ‘राजेंद्र तू केव्हा आलास रत्नागिरीत नोकरीला?’

‘1995 जूनमध्ये ताई’

‘बरोबर, 96 साली तुमच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये लांजाजवळची एक मुलगी डेमॉस्ट्रेटर म्हणून नोकरीला आली होती तुला आठवत असेल…‘

‘हो ताई, पण ती दोनच महिने इथे राहिली. मग त्यानंतर कुठे नाहीशी झाली कोण जाणे. मी सरांना विचारले तेव्हा त्यांनी खांदे उडविले.’

‘सरांना खांदे उडवायला काय? सरांमुळे ती कंटाळली. चांगल्या घरातली मुलगी ती नोकरी सोडून गेली.’

‘काय म्हणता? मला म्हणालेली ती इथे मला त्रास होतो म्हणून.’

‘त्रास कोणामुळे? फिजिक्स डिपार्टमेंटच्या हेडमुळे. हे तिला छळत होते. प्रॅक्टिकलच्या वेळी अंगचटीला येत होते. घाणेरडे जोक्स ऐकवत होते. ती चांगल्या घरातली मुलगी हैराण झाली. ती मला भेटायला आली. रडून रडून सर्व सांगत होती. मी तिला म्हटलं, ‘माझा नवरा असला तरी तो मला ऐकणारा नाही, तू प्रिन्सिपलकडे तक्रार कर.’ ती रडत रडत गेली आणि मग तिने नोकरीच सोडली. कुठेतरी गावाकडे गेली ती.

मी फक्त विभासाठी घरात राहात होते. तिला मोठ करायचं होतं. शिक्षण द्यायचं होतं. हा एवढा शिक्षण घेतलेला माणूस मुलीकडे किंवा मुलीच्या अभ्यासाकडे ढुंकून बघत नव्हता. सतत स्वत:मध्ये मश्गुल. नवीन नवीन फॅशनेबल कपडे, केसांच्या स्टाईल्स, सेंटस्‌, बुट आणि नवीन मॉडेलच्या गाड्या…

मी कोल्हापुरला नात्यातल्या लग्नाला गेले तेव्हा बेळगावच्या आमच्या गल्लीतील ममता खूप वर्षांनी भेटली. कॉलेज काळात आम्ही दोघी नेहमी बरोबर असायचो. मला बाजूला घेऊन माझ्या गळयात पडून खूप रडली. तिच्या म्हणण्यानुसार सर तिला घेऊन हॉटेलात जात होते. लग्नाचे वचन देत होते. त्याचवेळी कॉलेजमधील देसाई मॅडम बरोबर फिरत होते, त्यांना लग्नाचे वचन देत होते. ममताच्या हे लक्षात आले, तेव्हा ती खूप रडली आणि आत्महत्या  करायला गेली, पण तिच्या मोठ्या बहिणीने तिला सावरले. ती तिला मुंबईत घेऊन गेली आणि तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. माझ्या मनात आले ममता आधी मला बोलली असती तर, मी सावध झाले असते आणि माझे आयुष्य वेगळ्या मार्गाने गेले असते.

राजेंद्र तुला सांगते, अजून कितीतरी स्त्रियांना तुझ्या सरांनी खेळवले असेल कोण जाणे? एका खेळण्याबरोबर खेळायचे, खेळून झाले की फेकून द्यायचे की, मग दुसरे खेळणे… आणि त्यांचं नशीब त्यांना खेळणी भेटायची. हे सर्व असह्य होत होतं म्हणून मी झोपेच्या गोळ्या घ्यायला लागले. डोक शांत ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत होते मी. जगासमोर नवरा-बायकोचं नाटक करायला लागायचं. यात एकच समाधान, माझी विभा हुशार निघाली! सतत उत्तम मार्क्स मिळवून इंजिनीअर झाली. एम.टेक झाली, नोकरीला लागली. तिला विघ्नेश  भेटला. माझ्य संमतीने त्यांनी लग्न केलं आणि दोघं ऑस्ट्रेलियाला गेली.

राजेंद्र, सविता तुम्हाला ही माझी कर्मकहाणी सांगत सुटले, कदाचित हे सर्व असेच चालले असते आणि माझं तोंड बंदच राहिलं असतं, पण अशी एक घटना घडली की, मी गप्प राहू शकत नव्हते. 

‘कुठली घटना?’ सविताने विचारले. 

‘रिटायरमेंट नंतर सर त्यांच्या गावी लांजाजवळ जाऊ लागले होते. तेथे माझे दीर, जाऊ आणि त्यांचा मुलगा असतो. माझे दीर रेशनिंग दुकानात मापारी आहेत आणि थोडीशी आंब्याची झाडे आहेत. तशी गरिबीच आहे. मी माझ्या पगारातून माझ्या दीरांना, जावेला मदत करत असे. सर गावी जाऊन बागेत आपले मन रमवायला लागले म्हणून मी खूश होते. इथले रत्नागिरीतील प्रताप थोडे कमी होतील म्हणून पण! नंतर माझ्या लक्षात आले हल्ली बरेच दिवस ते गावीच मश्गुल असतात. खरंतर, एका ठिकाणी चिकटून राहणारे ते नाहीत… आणि एक दिवस माझ्यावर बॉम्ब पडला. कोणीतरी एका पाकिटातून काही फोटो पाठविले. या फोटोत माझी जाऊ सरांच्या मिठीत दिसत होती. नकोत्या अवस्थेत दोघांचे फोटो होते. मी आयुष्यात कधी हादरले नव्हते एवढी हादरले. प्रत्यक्ष आमच्या कुटुंबाला वाळवी लागली होती आणि या वाळवीने सारं कुटुंब बेचिराख होणार होतं. या कृष्णसर्पाने आमच्या कुटुंबाला  वेटाळा घातला होता. या कृष्णसर्पाला ठेचायलाच हव होतं.’ 

आजपर्यंतचे सारे प्रताप मी सहन केले, पण हे अशक्य होते. काहीतरी करायलाच हवे होते. याचा शेवट करायलाच हवा होता आणि मी निर्णय घेतला मन घट्ट केलं… एकदा माझा नवरा घरी आलेला असताना रात्री झोपल्यानंतर सकाळी जिवंत उठणार नाही, अशी तजवीज केली. 

‘काय?’ राजेंद्र, सविता हादरलेच.

होय राजेंद्र. मीच सरांना मारलं. कृष्णसर्पाला ठेचलं मी.

खोलीत स्मशान शांतता पसरली. ताई गप्प झाल्या. फक्त वर फिरणाऱ्या पंख्याचा तेवढा  आवाज ऐकू येत होता. दोन मिनिटांनंतर ती शांतता भंग करीत ताई म्हणाल्या, ‘राजेंद्र, तुला मी मुद्दाम बोलावले आहे. कारण हे सर्व कुणाला तरी सांगायच होतं, जायच्या आधी.’

‘ताई, तुम्ही कुठे जाताय?’ सविताने काळजीने विचारले. 

‘मी आता सुटणार आहे सर्वातून!’

‘ताई, जीवाचे काही बरे वाईट…’

नाही. सविता जीवाचे बरे वाईट का करू मी? माझ्या आईने नऊ महिने मला वाढवले. ते शरीर आत्महत्या करून नाहीसं करू?

‘मग ताई तुम्ही आमच्याकडे या. आमचं मोठ्ठ घर आहे कोल्हापुरात.’

‘नाही. मी कुणाकडेच जाणार नाही.’

‘मग?’

माझी व्यवस्था मी केली आहे. गेली सहा-सात महिने मी याच कामात आहे. मी आता थोडेच दिवस या रत्नागिरीत राहीन. विभाला पत्र लिहून मी सर्व कळविल आहे. माझ्या नावावरील सर्व संपत्ती मी दान केली आहे. सरांची संपत्ती त्यांच्या भावास दिली आहे. गावची जमीन, घर त्यांच्या भावाच्या नावे करून दिलंय. फक्त हे घर शिल्लक आहे. त्याची एक किल्ली तुमच्याकडे राहू द्या. एक किल्ली विभाला मी पाठवून दिली आहे. तुम्ही कधीतरी रत्नागिरीत याल तेव्हा या घरात राहा. विभा वर्षातून एकदा येते भारतात तेव्हा ती हे घर उघडेल आणि ती राहील इथे.

‘ताई, तुम्ही सर्व नीरवानीरव करताय?’

होय. सविता, राजेंद्र ही तुमची माझी शेवटची भेट. चला झोपा आता. मला पण आता झोप येतेय. सकाळी बोलू.

वसुमती ताई उठून आपल्या बेडरुममध्ये गेल्या आणि त्यांनी बेडरुमचे दार आतून बंद केले. राजेंद्र, सविता पण उठले आणि आपल्या बेडरुममध्ये गेले. दोघ बेडवर पडले, पण झोप येईना. मघापासून वसुमती ताई सांगत होत्या ते सत्य की, भास हेच त्यांना कळत नव्हते. सरांचं हे दुसरं रुप ऐकून राजेंद्र व्यथित झाला. ताईंनी नेमका काय निर्णय घेतला, हेही त्यांना कळले नाही. खूप वेळ ती दोघं ताईंचा विषय बोलत राहिली. पहाटे केव्हा तरी त्यांना झोप लागली. 

हेही वाचा – एका संपाची कहाणी

सकाळी थोडं उशिराच त्यांना जाग आली. सविता बेडरुमच्या बाहेर पडून ताईंच्या खोलीकडे गेली तर, दार बंद होते. बाहेरुन नुसती कडी लावलेली होती. तिने दार उघडले तर आत कोणी नव्हते. ती किचनमध्ये आली. किचनमध्ये शांतता होती. तिने नवऱ्याला उठविले. तो पण बाहेर आला. बंगल्याच्या आजूबाजूला पाहिले. ताई कुठेच नव्हत्या. बागेत, गच्चीत, गेटकडे, रस्त्यावर ताई कुठेच नव्हत्या. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन करून पाहिला… फोन बंद करून त्यांच्या बेडवर ठेवला होता. राजेंद्रच्या लक्षात आले. काल रात्री ताईंनी ही आपली शेवटची भेट म्हणून सांगितले, ते खरे केले होते. 

दुपारपर्यंत वाट पाहून राजेंद्रने घराला कुलूप लावले आणि गेटमधून गाडी बाहेर काढली…

समाप्त


मोबाइल – 9307521152 / 9422381299

प्रदीप केळुस्कर
प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!