पराग गोडबोले
साडेपाचचा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणे तो दहा मिनिटं snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. पाच चाळीसला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखेपिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून… नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, ‘किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.’ पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं, पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता… चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना…
तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन… हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते, थोडं टेकायला मिळतं बूड चौथ्या सीटवर तरी!
प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत… आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला. सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती! एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली.
चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला! उसासा टाकून उठले, घड्याळाचा काटा आज जरा जास्तच वेगात फिरतोय, असा भास झाला मला. भाजी फोडणीस टाकली आणि पीठ भिजवायला सुरुवात केली एकीकडे… मनात आजच्या ऑडिटची उजळणी सुरू होती. खडूस ऑडिटर येणार होता, त्याची सरबराई करायची होती. वेळेत पोहोचायलाच हवं होतं आज.
तवा तापत टाकला आणि लेकाला हाका मारायला सुरुवात केली… रात्रीचा दिवस करणारा हा भिडू, सकाळी उठायला जीव काढत असे माझा. पन्नास हाका झाल्यावर जरा कुठे हालचाल दिसू लागायची त्याची. कधीतरी तर वाटायचं, लोटी भरून गार पाणी ओतावं डोसक्यावर त्याच्या, म्हणजे तरी लवकर उठेल बाब्या! तो वेळेत कॉलेजला पोहोचावा म्हणून माझाच कोण आटापिटा… दोन हात, दोन पाय आणि एक डोकं यांच्या बळावर किती लढाया लढायच्या?
हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?
पोळ्या झाल्या, भाजी झाली आणि आबा आले चहा मागायला तेवढ्यात. चहा गरम करून दिला त्यांना आणि आंघोळीला पळाले… गरम पाण्याच्या धारा अंगावरून ओघळल्यावर अगदी बरं वाटत गेलं. जास्त रेंगाळण्याइतका वेळ नव्हताच. ती चैन फक्त रविवारी… कपडे बदलून डबे भरले तिघांचे, माझा उचलून पर्समध्ये कोंबला आणि नवी लढाई लढण्यासाठी घराबाहेर पडले…
आता बस नाहीतर रिक्षा, मग स्टेशन आणि तिथे गाडीत लोटून द्यायचं होतं स्वतःला! गेली पंचवीस वर्षे अव्याहत सुरू होती ही लढाई, पण गरजेची होती संसाराला हातभार लावायला… मुलाचं शिक्षण, सासुबाईंचं आजारपण, घराचे हप्ते सगळं या नोकरीच्या टेकूमुळे निभावलं. दोघांच्या नोकरीमुळे परिस्थिति बदलली आमची, पण मन आणि शरीर मात्र होरपळून गेलं.
आता विसाव्याची… थोडं स्वतःकडे बघायची… स्वतःला वेळ द्यायची निकड वाटायला लागली होती. रोज विचार यायचे मनात आणि एकदा कामात बुडाले की, ते विचारही रसातळाला जायचे आपोआप! परत दुसऱ्या दिवशी उचंबळून येण्यासाठी.
गेले काही महिने हे अव्याहत सुरू होतं चक्र… थांबायला हवं असं वाटत होतं आता, पण धीर होत नव्हता. नवऱ्याला काय, ना सोयर ना सुतक! तो त्याच्या जगात रममाण. निर्णय मलाच घ्यायला हवा होता. एक मैत्रीण आहे माझी शाळेपासूनची… ती समुपदेशन करते बरीच वर्षं. तिला फोन केला आणि मनाची व्यथा व्यक्त केली तिच्यासमोर! ये म्हणाली भेटायला जमेल तेव्हा, पण लवकरात लवकर!!
दुसऱ्याच दिवशी जरा लवकर निघून पोहोचले तिच्याकडे. आधीच फोन झाला होता, त्यामुळे वाट न बघायला लागता लगोलग पाचारण करण्यात आलं मला. जरा स्थिरस्थावर झाल्यावर, इकडची तिकडची चौकशी झाल्यावर तिने हळूहळू गाडी मुख्य विषयाकडे वळवली आणि मी भडाभडा बोलायला लागले… सगळंच सांगितलं तिला, आडपडदा न ठेवता… नवऱ्याशी असलेल्या आणि नसलेल्या शारीरिक संबंधांबद्दल पण व्यक्त झाले मी!
खूप बरं वाटलं. मोकळं अगदी! योग्य तिथे प्रश्न विचारत, ती पार मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली माझ्या. मला म्हणाली, “बऱ्याच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना येतो हा अनुभव. आम्ही ‘Burnout Syndrome’ म्हणतो त्याला! बरेच पुरुष पण जातात, या आवर्तनामधून. आजच्या युगाची ही भेट आहे आपल्याला!”
“तुला आर्थिक गरज नसेल, जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असतील… काम आणि घर सांभाळताना कुतरओढ होत असेल, तर स्वेच्छानिवृत्ती घेऊन मनासारखी जगू शकतेस तू! त्यात अपराधी वाटण्याचं काही एक कारण नाही. पेन्शन मिळेलच की तुला, का एवढी काळजी करतेयस?”
अगदी माझ्या मनातलं बोलली ती… शिक्कामोर्तब जणू माझ्या निर्णयावर!
आर्थिक नुकसान किती होईल यापेक्षा, स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देता येईल, मनासारखं जगता येईल, हिंडता फिरता येईल… ही फार मोठी जमेची बाजू वाटली मला. निर्णय पक्का झाला माझा आणि घरी जाऊन नवऱ्याकडे आणि आबांकडे सुतोवाच केलं. आबांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. नवरा पण, हो नाही करत एकदाचा तयार झाला. अर्थात, मी परवानगी नव्हती विचारली त्याला, पण सांगण्याचं कर्तव्य होतं माझं, ते पार पाडलं मी!
जवळपास आठ वर्षं आधी मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. कसं असेल ते आयुष्य, याचा विचार करतच, बऱ्याच उशिरा मला झोप लागली.
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
आज निवृत्त होऊन सहा महीने झालेत, काय गमावलं आणि काय कमावलं याचा ताळेबंद मांडताना, कमाईचं पारडं अंमळ जास्तच झुकलेलं भासतंय मला! घर जरा जास्तच हसरं वाटू लागलंय, विकत घेऊन कपाटाचे धन झालेल्या पुस्तकांना न्याय मिळतोय, डोळ्याखालची काळी वर्तुळं जराशी फिकट झाल्यासारखी वाटतायत आणि हलकंहलकं वाटतंय खूप… थोडंसं लिहायला लागले आहे. अनुभवांच्या पोतडीतून बाहेर पडणारे शब्द, समाजमाध्यमावरील मित्र-मैत्रिणींना आपलेसे वाटायला लागले आहे. अडगळीत पडलेली पेटी आलीये दुरुस्त होऊन आणि स्वर उमटू लागलेत तिच्यातून… मुग्ध करणारे… जणूकाही नवी दृष्टी, नवी दिशा लाभलीये जगण्याला!
घराजवळ असणाऱ्या एका वृद्धाश्रमाशी जोडून घेतलंय मी स्वतःला. तिथल्या आजी, आजोबांना पेपर, पुस्तकं वाचून दाखवणं, त्यांना हवं नको बघणं, त्यांच्याशी हितगुज करणं, यात वेळ सत्कारणी लागतोय माझा. सुरवंटाचं फुलपाखरूच झालंय जणू…
परवाच ऑफिसमधल्या एका मैत्रिणाचा फोन आला होता, पश्चात्ताप झालाय का विचारत होती नोकरी सोडल्याचा अन् मी हसले खुदकन्, मला नकळत!
तिला म्हणाले, “पंचवीस वर्षं जे नव्हतं जमलं, ते मनसोक्त उपभोगतेय मी.”
तिचं म्हणणं पडलं, ‘उगाच सोडलीस नोकरी तू. या संघर्षात जी मजा आहे, काहीतरी मिळवण्याची जी ईर्षा आहे ती गमावलीस. आर्थिक स्वातंत्र्य गमावलंस आणि नको त्या निरर्थक गोष्टीत गुंतून पडलीस उगाचच.’
विचारात पाडलं तिने मला पण, खरंच मला नाही वाटलं तसं कधी! तुम्हाला काय वाटतंय, चुकले मी, की योग्य केलं?


