दिवाळी, दसरा, होळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या सणावारांना हमखास आईची आठवण येते. कोणालाच ऐकू न येणारी ही अज्ञात स्पंदनं हृदयात कुठेतरी जाणीव करून देत असतात… कधीच न विझणारी तिच्या विचारांची ज्योत मनात असते अन् ती जीवनातील अनेक चढ-उताराच्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करत असते… जणू तुम्हाला सांगत असते की, “घाबरू नकोस! तू एकटी नाहीस… कारण माझा अंश तुझ्यात आहे! मी तुझ्यामध्येच आहे!”
आई प्रत्येक क्षणाला आठवते… विशेषतः सणावारांच्या दिवसांत तर जास्तच! जीवनात रंग भरायला तीच शिकवते! तिने दिलेली एकूण एक शिकवण लहानपणापासून मनात अधोरेखित होते… रूचकर स्वयंपाक कसा करायचा? कोणता पदार्थ कुठल्या सणाला करायचा? घरातील सर्वांच्या आवडी-निवडी कशा लक्षात ठेवायच्या? कुळाचारांचे पूजाविधी कसे करायचे? कोणती पूजा केव्हा करायची? का करायची? व्रत-वैकल्यांचे महत्त्व कसे जपायचे? या बरोबरच, रोज देवाजवळ सांजवात व्हायला हवी, तुळशीला रोज पाणी घालून तिचीही पूजा करून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावावा, त्याचेही महत्त्व आईने पटवून दिल्यामुळे ते कायम मनावर प्रतिबिंबीत झालेले दिसते.
या सर्व गोष्टींची आता इतकी सवय झाली आहे की, हातावरच्या रेषांवर सुद्धा तिनेच दिलेली शिकवण कोरल्यासारखी भासते. सणवार आले की, असं वाटतं प्रत्येक घरातील आईच तिथे आपले अनोखे अस्तित्व घेऊन अवतरली आहे! तिच्या रूचकर पदार्थांचा सुगंध घराघरातील स्वयंपाकगृहातून दरवळतो… तिच्या परंपरेच्या दिव्यातील ज्योत प्रकाशमय होत मंदपणे तेवत असते आणि तिचा देवाला आळवताना लागलेला धीरगंभीर, परंतु भावविभोर सूर ती नसतानाही आरत्यांमधून जाणवतो… तो सूर मनाला इतका भिडतो की, मुलीसुद्धा आरती म्हणताना तितक्याच आनंदाने आणि भावपूर्णतेने देवाकडे सर्वांच्या सकुशलतेची प्रार्थना करते.
हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी
मुली जेव्हा आपले स्वतःचे घर सजवतात, तेव्हा त्या सजावटींमध्ये, त्या वस्तूंच्या नीटनेटकेपणामध्ये आपल्या आईच्या असंख्य आठवणी, इच्छा पाहात असतात आणि तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्या आपल्या घरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात… तिच्या कुटुंबातील प्रत्येक विधीकार्य, हरेक रीतिरीवाज हा आईच्या उपस्थितीचा किंवा तिच्या अस्तित्वाचा पुनर्जन्म असतो, जो तिच्या मुलींच्या कर्तृत्वातून सिद्ध होतो. हे गृहकर्तव्य नित्यनेमाने निभावत असताना मुलगी नेहमी हाच विचार करत असते की, आपली आई हे काम असं करत होती, अमुक तमुक सणाला असा स्वयंपाक करत होती, कुळाचाराचे तिचे पदार्थ ठरलेले होते… रोजच्या गृहोपयोगी वस्तू नेमक्या जागी ठेवण्याची तिची सवय, सगळ्यांचे आरोग्य जपण्याकरिता तिची चाललेली धडपड, तिच्या रोजच्या कामाचे नियोजन… हे सर्व मुली संस्मरणात ठेवतात आणि त्यांच्याही नकळत त्या स्वतः आपल्या मनातील भावसुलभतेने, कर्माने, आशीर्वादाने आपल्या आईच्या भूमिकेत कधी शिरतात, हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही. त्या मग मामी, आत्या, काकू, नणंद, वहिनी, सासू अशा अनेक प्रकारच्या नात्यांमधून आपले स्त्रित्वाच्या नात्यांची सुंदर वीण विणतात आणि आपल्या कुटुंबाच्या हिताकरिता तसेच, प्रथा, परंपरा, संस्कृती जपण्याकरिता सिद्ध होतात. कधी कधी ओवाळणीच्या ताटातील किंवा देव्हऱ्यातील दिव्याच्या वातीकडे पाहून मनातल्या मनात आईला आठवून म्हणतात, “आई बघ, तू जे संस्कार मला दिलेस… जे रीतीरिवाज, परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर केलेस ते जसेच्या तसे पूर्णत्वाकडे नेण्याचा मी प्रयत्न करते आहे. संध्याकाळी देवाजवळ समईतील वाती उजळताना, तुळशीजवळ रोज दिवा लावावा, रामरक्षा म्हणावी हे मी माझ्या मुलांना शिकवले आहे…
हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…
देवाजवळ सांजवात लावण्याआधी मनपण शांत करा, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा किंवा कंटाळा, असंख्य विचारांचा कोलाहल मनात ठेवून ते करू नका… कारण कुठलीही कृती करताना त्या कामाप्रति आपले संपूर्ण समर्पण असायला हवे! मन शांत असेल तरच ते काम पूर्णत्वास जाते, त्याचे परिणाम निश्चितच फलदायी आणि आनंददायी असतात.” हा भाव मनामध्ये ठेवून जेव्हा त्या मुली आपल्या आईला आठवतात, तेव्हा देव्हाऱ्यातील समईची किंवा पूजेच्या थाळीतील त्या निरांजनाची ज्योत त्या मुलींना शांत आणि स्थिर दिसते… त्या ज्योतीकडे पाहून आईने तिचा हात आपल्या मस्तकावर ठेवून आशीर्वाद दिल्याची भावना त्या मुलींच्या मनात जागृत होते अन् आपसूकच आईच्या अस्तित्वाची जाणीव ती पुन्हा पुन्हा अनुभवते… आपल्या मनाशीच म्हणते की, आई कुठेच गेली नाही किंवा जात नाही, ती तिच्या मुलींच्या मनामध्ये आपल्या संस्कारासह, तिच्या प्रेमासह, कुटुंबवत्सल भावनेने कायम राहात असते आणि आपल्या आईपणाच्या तसेच स्त्रित्वाच्या अनेक रुपांची, तिच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना सतत करून देत असते…


