Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    May 26, 2026

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कुंडलीयोग अन् विधिलिखित!
    ललित

    कुंडलीयोग अन् विधिलिखित!

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 22, 2025No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, ज्योतिषी, चंदू गुरुजी, ज्योतिष आणि कर्म, कर्मवाद, भविष्यवेत्ता, भविष्याचा अंदाज,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    ‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये 10-12 जण बसले होते. त्यातल्या एकाला मी “गुरुजी आहेत का?” असं विचारलं. त्यानं होकारार्थी मान हलवली. आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. दीडएक वर्षापूर्वी एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर, मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे, असं मानणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार? असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा! पण दीड वर्षापूर्वी बी.ई. पास झाल्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. कॉल येत नव्हते, असं नाही… पण इंटरव्ह्यू चांगला होऊनही माझी निवड होत नव्हती. “तुझं नशीब मार खातंय,” असं आईवडील म्हणत होते. मला ते पटत नव्हतं. “आपलं भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं,” असं माझं मत होतं. पण इतर मित्र भराभर नोकरीला लागत असताना मी मात्र बेरोजगारीचे चटके सहन करत होतो. गेल्या सहा महिन्यांपासून तर मी चक्क डीप्रेशनमध्ये गेलो होतो. मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. ते पाहून आईवडिलांनी मला आज जबरदस्ती इथे पाठवलं होतं.

    मी समोरच्या लोकांकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्याची काळजी दिसत होती. कुणाला मुलाच्या लग्नाची काळजी, कुणाची कोर्ट केस, तर कुणाचं धंद्यात नुकसान झालेलं… प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रश्न होतेच. प्रयत्न करूनही यशस्वी न झालेली, दुःखात पोळलेली माणसं शेवटी ज्योतिषाचा आणि देवाचा आधार घेतात, असं मी ऐकलं होतं. ते आज मी स्वतःच अनुभवत होतो.

    एक तासाने माझा नंबर लागला. मी गुरुजींसमोर जाऊन बसलो. गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने हसले.

    “बोला काय म्हणताय?” त्यांनी विचारलं. मी माझी पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली.

    “गुरुजी बी.ई. चांगल्या मार्कांनी पास होऊन दीड वर्ष उलटलंय. प्रयत्न करूनही साधी पाच-दहा हजारांचीही नोकरी लागली नाही. सध्या खूप निराशा वाटतेय. कशात मन लागत नाही. काय करावं समजत नाही…”

    “साहजिकच आहे. बेरोजगारांची मानसिक अवस्था अतिशय वाईट असते.”

    “गुरुजी बघा बरं माझ्या नोकरीचा योग कधी आहे ते! आणि नोकरी कुठं मिळेल, तेही सांगा.”

    गुरुजींनी पत्रिकेवर नजर टाकली… खालची मान वर न करता म्हणाले,

    “तुम्ही हुशार आहात. मेहनती आहात. पण पत्रिकेतल्या नोकरी, व्यवसायाच्या स्थानात अशुभ ग्रहांची युती आहे, त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येताहेत…”

    मग त्यांनी पंचांग उघडलं. मनाशी काही आकडेमोड केली. मग माझ्याकडे पहात म्हणाले,

    “वर्षापूर्वी नोकरीचा बऱ्यापैकी योग होता, तेव्हा काही झालं नव्हतं का?”

    ते म्हणत होते, ते खरंच होतं.

    “हो, एका कॉलेजमध्ये नोकरीची ऑफर होती. पण पगार कमी होता आणि तोही चार-चार महिने मिळत नाही, असं ऐकण्यात होतं. शिवाय, ते परमनंट करत नाहीत, असं माहीत पडल्यामुळे मी गेलो नाही…”

    हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

    “अच्छा. सगळ्या शिक्षणक्षेत्रात आजकाल अशीच पिळवणूक सुरू आहे. नशीब त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले नाहीत. नाहीतर परमनंट करण्याच्या बोलीवर ते 25-30 लाखांची मागणी करतात. वरून दोन-तीन वर्षं फुकटात काम करायला लावतात, असं ऐकण्यात आहे. ठीक आहे, आता 21 ऑगस्टनंतर चांगले योग आहेत. ऑगस्ट महिन्यात राहूची महादशा संपून गुरुची महादशा सुरू होतेय. शिवाय, गोचरीचे ग्रहही शुभस्थानात येताहेत. नोकरी शंभर टक्के मिळणार. मात्र, ती दक्षिण दिशेला मिळेल. पण तुम्ही फार काळ नोकरी नाही करणार. स्वतःचा व्यवसाय सुरू कराल. त्यातही तुम्ही चांगली प्रगती कराल…”

    “बापरे, म्हणजे अजून सहा महिने वाट पाहायची?” मी थोडं नाराजीने आणि अविश्वासाने म्हंटलं. एकतर सहा महिने असं ऐतखाऊ बनून घरी बसून काढायचे माझ्या जीवावर आलं होतं आणि माझ्या हातात मुंबईच्या तीन चार कंपन्यांचे कॉल्स होते. त्यातल्या एकात तरी माझी निवड होईल, असं मला वाटत होतं. अर्थात, आजपर्यंतच्या अनुभवावरुन त्याचीही खात्री वाटत नव्हती. शिवाय, आईवडिलांना सोडून साऊथमध्ये जायची माझी अजिबात इच्छा नव्हती.

    गुरुजींनी खांदे उडवले… म्हणाले, “ग्रह तरी तेच सांगताहेत.”

    “नोकरी लवकर लागावी यासाठी काही उपाय नाही का?”

    “करूनही फायदा नाही. उपायाच्या नावावर लोकांकडून पैसे उकळण्यातला मी नाही. तसंही विधीलिखित टळत नाही. दीड वर्ष वाट पाहिलीत, सहा महिने अजून पाहा!” मी निरुत्तर झालो.

    “गुरुजी, तुमची दक्षिणा किती द्यायची?”

    गुरुजी हसले… “मी बेरोजगारांकडून दक्षिणा घेत नाही. हे माझं एक समाजकार्य आहे, असं समजा. नोकरी लागली, भविष्य खरं ठरलं की, तुमची जेवढी इच्छा होईल तितकी दक्षिणा द्या. ओके?”

    मला आनंद झाला. मी त्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो.

    उत्सुकतेपोटी मी गुरुजींची माहिती काढली. गुरुजींचं खरं नाव होतं ‘चंद्रकांत’ पण त्यांना सगळे चंदू गुरुजीच म्हणायचे. गोरा रंग, देखणा चेहरा, सहा फूट उंची, कपाळावर गंध, मजबूत शरीरयष्टी… गुरुजी मेकॅनिकल इंजीनियर आहेत, असं चुकूनही वाटायचं नाही. वय असावं पस्तीस-छत्तीस. ‘माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाही,’ असं ते सर्वांना सांगायचे. पण त्यांच्या आईनं त्यांना जळगावबाहेर नोकरीला जाऊ दिलं नाही, हे खरं सत्य आहे, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं. एकुलता एक मुलगा लग्नानंतर सात वर्षांनी नवसाने झालेला. त्यामुळे त्याला दूर पाठवायला ती माऊली तयार नव्हती. गुरुजी दहावीत असतानाच त्यांचे वडील गेलेले. त्यामुळे जे काही करायचं ते जळगावातच कर, असं तिचं म्हणणं होतं. जळगावात इंडस्ट्रीज नव्हत्या. गुरुजींना सुरुवातीला मुंबई, पुण्याला बऱ्याच नोकऱ्या मिळण्याची संधी चालून आली होती; पण आईमुळे ते जाऊ शकले नाहीत. स्वतःच्या भविष्याचा अभ्यास करता करता भविष्य सांगणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. मनमानी दक्षिणा त्यांनी कधीही मागितली नाही… तरीही त्यांना चांगली कमाई व्हायची. चांगला अनुभव आलेले लोक त्यांना बराच दानधर्म करायचे.

    हेही वाचा – निरोप समारंभ… स्मृतीपटलावर कोरलेला!

    गुरुजींचं लग्न झालं नव्हतं. ‘माझ्या कुंडलीत विवाहयोग नाही,’ असंही ते म्हणायचे. त्यांच्या लग्नाचे अनेक प्रयत्न झाले. पण केवळ लोकांचं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणाऱ्याला आपली मुलगी द्यायला कोणीही तयार झालं नाही, ही खरी वस्तुस्थिती होती किंवा मला तशी ती वाटत होती.

    त्या सहा महिन्यांत मी बऱ्याच ठिकाणी मुलाखतींना गेलो. गुरुजींचं भविष्य खोटं ठरवण्याच्या हेतूने मी इंटरव्ह्यूला जोरदार तयारी करून जायचो. पण मुलाखती चांगल्या होऊन देखील माझी कुठेच निवड झाली नाही. 16 ऑगस्टला मला बंगलोरच्या एका कंपनीचा मेसेज आला. 22 ऑगस्टला मुलाखतीला बोलावलं होतं. इच्छा नसतानाही मी गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिलेक्टही झालो. सुरुवातीलाच सहा लाखांचं पॅकेज मिळालं. मला खूप आनंद झाला. चंदू गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. दोन महिन्यांनी मी जळगावला आलो. गुरुजींना मी हजार रुपये दक्षिणा आणि पेढे तर दिलेच, पण एका हॉटेलमध्ये पार्टीही दिली.

    त्यानंतर मी अनेक गोष्टीत गुरुजींचा सल्ला घ्यायला लागलो. ज्योतिषाला थोतांड समजणारा मी गुरुजींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करेनासा झालो. त्याचे फायदेही होऊ लागले. त्यांच्या सल्ल्यावरून मी माझ्या बहिणीचं लग्नं एका हॉटेल व्यावसायिकाशी लावून दिलं. वर्षभरातच त्यांची भरभराट झाली. दुसरं शानदार हॉटेल सुरू झालं. आता घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली. एका मुलीचं स्थळ सांगून आलं. मुलगी सुंदर होती, उच्चशिक्षित होती. माझ्यासह सर्वांनाच आवडली. मी तिची कुंडली चंदू गुरुजींना जाऊन दाखवली. ‘मुलीचं बाहेर अफेअर आहे. शक्यतो लग्न करू नका…’ गुरुजींनी सल्ला दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मुलीला नकार दिला. आश्चर्य म्हणजे, एका महिन्यातच ती मुलगी एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी आली. मी गुरुजींना लक्ष लक्ष धन्यवाद दिले. नंतर मी गुरुजींच्या सल्ल्यानेच लग्न केलं. माझा संसार सुरळीत सुरू झाला.

    लग्नानंतर तीन वर्षांनी मला पुण्यात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची संधी मिळाली. बंगलोरची नोकरी सोडून मी पुण्यात स्थायिक झालो. गुरुजींचं हेही भविष्य खरं ठरलं. दोनच वर्षांत माझी खूप भरभराट झाली. बंगला झाला. दोनतीन चारचाकीही झाल्या. परदेशी वाऱ्या होऊ लागल्या… सगळं चांगलं सुरू असताना अचानक दोन वाईट बातम्या कानावर आल्या. पुण्यातल्या माझ्या मावसबहिणीचा नवरा अपघातात गेला. फक्त 35 वर्षांची बहीण आणि तिची 10 वर्षांची मुलगी अशा दोघींचाही एका झटक्यात आधार गेला. दुसरी वाईट बातमी चंदू गुरुजींच्या आईच्या निधनाची होती. गुरुजीही अनाथ झाले होते.

    मी गुरुजींना जळगावला भेटायला गेलो, तेव्हा गुरुजी विमनस्क अवस्थेत बसले होते. सध्या गावात मिठास बोलून लोकांना लुबाडणाऱ्या अनेक खऱ्याखोट्या ज्योतिषांनी ज्योतिषाची, वास्तूशास्त्राची दुकानं उघडून ठेवली होती. त्यामुळे ज्योतिषाचा धंदा न करणाऱ्या, आपणहून लोकांकडे दक्षिणा न मागणाऱ्या, गरज नसताना ग्रहांची रत्नं न विकणाऱ्या चंदू गुरुजींच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला होता. त्यांचा ज्योतिषाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता, असं ऐकण्यात आलं होतं.

    सगळी विचारपूस झाल्यावर मी गुरुजींना विचारलं, “आता यापुढे काय गुरुजी? तुम्ही काही ठरवलंय का?”

    गुरुजी मंद हसले. म्हणाले, “तुम्हाला तर माहीत आहे, माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाहीये. त्यामुळे जसं चाललंय तसं चालू द्यायचं…”

    “असे एकटे आयुष्य कसं काढणार? लग्न करून घ्या…”

    “मी आता 42 वर्षांचा आहे. लग्नाच्या वयात लग्न झालं नाही. आता ते काय होणार? आजकाल तुम्ही बघताय ना मुलींच्या अपेक्षा किती वाढल्यात. लाखो रुपयांचे पगार असणाऱ्या मुलांची लग्न जुळणं कठीण होऊन बसलंय. मग माझ्यासारख्या सामान्य ज्योतिषाला मुलगी तरी कोण देणार? असाही माझ्या कुंडलीत लग्नाचा योगच नाहीये!”

    माझ्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. मी त्यांना म्हणालो, “मी तुमचे हे दोन्ही योग जुळवून आणले तर?”

    गुरुजी चमकले. माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

    “म्हणजे?”

    “म्हणजे नोकरी आणि लग्न… दोन्हीही?”

    “ते कसे?”

    “सांगतो. तुम्ही फक्त मी सांगेन ते करायचं…” मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो. मग मी त्यांना सविस्तर सगळं समजावून सांगितलं. ते अगोदर तयार झाले नाहीत. मी सांगितलेला प्लॅन यशस्वी होणार नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. पण ‘जमलं तर ठीकच नाहीतर सोडून द्या,’ असं मी म्हटल्यावर ते तयार झाले.

    आज या घटनेला सहा महिने होऊन गेले. मधला काळ खूप धावपळीचा गेला. गुरुजींना मी माझ्याच कंपनीत, ते इंजीनियर असल्यामुळे सुपरवायझर म्हणून लावून दिलं. त्यानंतर मावसबहिणीला लग्नाला तयार केलं. तिला मुलीची काळजी वाटत होती. पण गुरुजींनी मनाचा मोठेपणा दाखवत तिला मुलीसकट स्वीकारलं.

    लग्नानंतर एक महिन्याने मी त्यांच्या घरी गेलो. दोघंही सुखी आणि आनंदी दिसत होते. बहिणीची मुलगी गुरुजींना चिकटून बसली होती. याचा अर्थ नवीन वडिलांना तिनं फक्त स्वीकारलंच नव्हतं तर, ते तिला आवडू लागले होते. तीन निराधार जीवांना एकमेकांचा आधार मिळाल्यामुळे तिघांच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि समाधान झळकत होतं. माझ्या एका निर्णयाने तिघांचं आयुष्य सुरळीत झालं, याचा मलाही आनंद झाला. मी गुरुजींना म्हटलं, “गुरुजी तुमचा ज्योतिषाचा व्यवसाय परत सुरू करायला हरकत नाही. इथं पुण्यात खूप चालेल…”

    गुरुजी हसले. म्हणाले, “तो व्यवसाय, ज्योतिषाची पुस्तकं, पंचांग मी जळगावलाच सोडून आलोय. त्या विधात्याच्या मनात काय आहे, हे कोणताही मोठ्यातला मोठा ज्योतिषीही काही सांगू शकत नाही. कुंडलीत कोणतेही योग नसताना माझ्या बाबतीत जे घडलं, ते पाहून मी ज्योतिष सोडून द्यायचा निर्णय घेतलाय. बघा ना तुमच्या बहिणीच्याही कुंडलीत वैधव्याचा तर योग होता, पण पुनर्विवाहाचा काही योग नाहीये. विधिलिखित टळत नाही, असं आपण म्हणतो… मग भविष्य बघायचंच कशाला? हा मला प्रश्न पडलाय. कदाचित, कुंडलीत योग नसतानाही आम्हाला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करून घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेतच, पण काही कर्म ही आपल्यालाच करावी लागतात, असं माझं आता ठाम मत झालंय. त्यामुळे आता तुम्ही जसा दिला तसा कर्मावर मी भर देणार आहे…”

    ते म्हणत होते, ते पटत होतं. स्वतःच्या कुंडलीतले लग्नाचे आणि नोकरीचे योग गुरुजींना चांगले ज्योतिषी असूनही का कळले नाहीत? हे मला समजलं नाही. पण या घटनेमुळे एक चांगला ज्योतिषी कर्मवादावर उतरलाय याचा आनंद मानायचा की, एका चांगल्या ज्योतिषाला लोक मुकले, याचं दुःख करायचं हेच मला समजेनासं झालं…


    (ही कथा ‘कथा माणुसकीच्या’ पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    May 26, 2026 ललित

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026 ललित

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    By दिलीप कजगांवकरMay 26, 2026

    संध्याकाळचा फेरफटका मारून गोपाळराव घरी परतले. ते घरात शिरताच सावित्रीबाईंची तुफान एक्सप्रेस सुरू झाली… आजचा…

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    May 26, 2026

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 309
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 432
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 214
    • मैत्रीण 19
    • ललित 654
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    May 26, 2026

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.