डॉ. सारिका जोगळेकर
(होमिओपॅथिक तज्ज्ञ)
गर्भधारणा झाल्यापासून मुलांची वाढ सुरू होते. गर्भामध्ये बाळाचा शारीरिक आणि मानसिक पाया तयार होतो. जन्मानंतर मुलांच्या आयुष्यातील पहिली तीन वर्षे ही सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची असतात. या काळात त्यांचे शरीर पूर्णपणे विकसित होत असते. प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) निर्माण होत असल्यामुळे बदलत्या ऋतुचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. ऋतू किंवा वातावरणातील तापमान बदलले की, वारंवार सर्दी, खोकला, ताप हे मुलांमध्ये दिसून येते.
हा पहिला टप्पा पार पडेपर्यंत मुलं शाळेत जाऊ लागतात, तेव्हा ते पहिल्यांदाच घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतात. या वेळी त्यांचा नवीन लोक, मित्रमैत्रिणी, शिक्षक तसेच हवामान आणि बाहेरील परिस्थिती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क येतो. मग त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. घरापासून जास्तवेळ दूर राहण्याची सवय नसल्याने नवीन लोक, शिस्त आणि नियम या सगळ्यांमुळे मुलांचे विचार तसेच त्यांची भावनिक वाढ होते. वाढीसोबत कधी कधी मुलांना त्याचा ताण सुद्धा होऊ शकतो. प्रत्येक मुलाची ताण हाताळण्याची क्षमता वेगवेगळी असते.
मुलांचा दहा वर्षांपर्यंतचा काळ हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मुलांचे शरीर झपाट्याने वाढते, मेंदूची कार्यक्षमता वेगाने विकसित होते. तसेच, सामाजिक कौशल्य सुद्धा रुजायला सुरुवात होते. परंतु या काळात वाढीदरम्यान अनेक लहान मोठ्या समस्या उद्भवतात. योग्य वेळी त्यांची दखल घेतली गेली तर पुढील संभाव्य अडथळा आपण टाळू शकतो.
मुलांची वाढीदरम्यानची अपेक्षित प्रगती आणि तक्रारी –
शारीरिक प्रगती
- जन्मापासूनच मुलांची उंची, वजन, स्नायू आणि हाडे वाढत जातात.
- चालणे, धावणे, वस्तू पकडणे, लिहायला शिकणे हे शारीरिक विकासाचे भाग आहेत.
शारीरिक वाढीशी संबंधित समस्या
- वजन आणि उंची कमी-जास्त होणे – काही मुले खूप बारीक राहतात तर, काहींमध्ये स्थूलतेची समस्या वाढते.
- पोषणाची कमतरता – लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यांची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायूंचा विकास नीट होत नाही.
- सतत आजारी पडणे – रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर वारंवार सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार होतात.
- दातांचे विकार – दुधाचे दात वेळेवर न येणे, दातांमध्ये किड होणे.
- त्वचारोग आणि एलर्जी – हवामानातील बदल आणि धुळीमुळे त्वचेवर पुरळ, खाज, श्वसनाचा त्रास होणे.
मानसिक आणि बौद्धिक विकास
- विचार करण्याची क्षमता, भाषा शिकणे, समस्या सोडवणे, स्मरणशक्ती वाढणे.
- शाळेत शिकताना मुलांची एकाग्रता आणि समज वाढते.
मानसिक आणि बौद्धिक समस्या
- बोलताना उशीर होणे किंवा उच्चारात दोष.
- शिकण्यात अडचणी – वाचन, लेखन, आकलन किंवा गणित शिकण्यात समस्या.
- एकाग्रतेचा अभाव – लक्ष विचलित होणे, अभ्यासात मन न लागणे.
- भीती आणि तणाव – शाळा, परीक्षा किंवा नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची अडचण.
भावनिक विकास
- आनंद, राग, भीती, लाज अशा भावना ओळखून त्या व्यक्त करणे.
- आई-वडील, मित्र, शिक्षक यांच्याशी नाते तयार करताना भावनिक स्थैर्य मिळते.
- भावना या आपल्या वर्तनातून दिसतात.
वर्तनाशी संबंधित समस्या
- राग येणे, हट्टीपणा, ऐकून न घेणे.
- लाजाळूपणा किंवा एकटे राहण्याची सवय, आत्मविश्वास कमी असणे, व्यक्त होता न येणे, असुरक्षितता वाटणे.
- Hyperactivity – अति उर्जा आणि त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता.
- मोबाईल, टीव्हीवर जास्त वेळ घालवल्याने खेळ-मैदानी उपक्रम कमी होणे.
सामाजिक विकास
- इतर मुलांसोबत खेळणे, वाटून घेणे, गटात काम करणे.
- शिस्त पाळणे, नियम समजून घेणे, जबाबदारी स्वीकारणे.
- भावनिक विकासावरती सामाजिक विकास अवलंबून असतो.
नैतिक आणि मूल्यात्मक विकास
- योग्य-अयोग्य ओळखणे.
- प्रामाणिकपणा, मदतची वृत्ती, आदर यासारखी मूल्ये अंगी बाणणे.
पालकांनी घ्यायची काळजी
प्रत्येक आई-वडील पालक म्हणून बेस्ट होण्याचा प्रयत्न सतत करत असतात. कित्येक वेळेला मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी ते स्वतःला दोष देतात. सर्वप्रथम स्वतःला दोष देणे थांबवलं पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवलात तरच, तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवू शकाल.
प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याच्या गरजासुद्धा वेगळ्या असतात. मुलांच्या तुलनेत नाही तर, त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये सौंदर्य शोधा; कारण प्रत्येक मूल आपल्या मार्गाने अद्वितीय असतं.
आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये या बेसिक गोष्टी सामावल्या तर, मुलांची वाढ सोपी होऊ शकते.
- मुलांना संतुलित व पौष्टिक आहार द्यावा.
- लसीकरण वेळेवर पूर्ण करावे.
- खेळ, व्यायाम आणि मैदानी उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे.
- मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आई, वडील किंवा घरी असलेले आजी, आजोबा या सर्वांनी संवाद साधावा.
- स्क्रीनटाइम वरती नियंत्रण.
- कोणतीही समस्या वारंवार जाणवली तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मुलांच्या वाढीदरम्यान आढळणाऱ्या समस्यांवरती होमिओपॅथी ही एक अत्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित जादूची छडी आहे, त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. पालक म्हणून तुम्ही होमिओपॅथीची निवड केली तर, मुलांचा मूलभूत पाया मजबूत होतो.
- होमिओपॅथिक औषधे गोड असल्याने मुले ती आनंदाने घेतात. अगदी सूक्ष्म पातळीवरती असल्याने त्याचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट होत नाहीत.
- मुलांची भूक, तहान, शांत झोप सगळं नियंत्रणात येतं आणि ते नियंत्रणात आलं की, वाढ सुद्धा सुलभ होते.
- मुलांचे मन शांत राहते, त्यामुळे वर्तणुकीतील समस्या दूर होतात.
- वारंवार होणाऱ्या तक्रारी पूर्णपणे बऱ्या होतात. (उदा. सर्दी खोकला, एलर्जी constipation, दात येतानाच्या समस्या, टॉन्सिल्स)
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मुलांची वाढ ही केवळ निसर्गाची देणगी नाही तर, पालक, शिक्षक आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आकार घेतलेली एक सुंदर प्रक्रिया आहे. योग्य काळजी, पोषण आणि प्रेम दिल्यास प्रत्येक मूल आपल्या क्षमतेनुसार उंच भरारी घेऊ शकते.
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941
FB – https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr
Insta – https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr