भाग – 35
पावसाच्या सरी अजूनही खिडकीवर हलक्या थेंबांनी वाजत होत्या. खोलीच्या कुशीमध्ये मंद पिवळसर प्रकाश होत होता — ना फार उजळ, ना फार गडद. त्या प्रकाशात आराध्या शर्वायसाठी कपडे उघडून ठेवत होती, आणि बाजूला ठेवलेला टॉवेल उचलून ती त्याचं डोकं हलक्याने पुसत होती…
शर्वाय काही बोलत नव्हता. त्याचे डोळे तिच्याकडे स्थिर होते… आराध्याचं मन मात्र क्षणाक्षणाला धडधडत होतं… तरीही तिचे हात कोमलतेने काम करत होते.
“इतकं भिजून का आलात?” ती पुटपुटली.
शर्वायने मंद स्मित केलं आणि म्हणाला… “तू समोर होतीस… आणि पाऊस होता. दुसरं काही सुचलंच नाही.”
त्याच्या त्या एका वाक्यानं आराध्याचा श्वास अडखळला… त्या दोघांच्या नजरा एकमेकांना विचारत होत्या, पण त्या क्षणी कोणतं उत्तर नव्हतं… फक्त एकमेकांचा स्पर्श, एकमेकाची साथ पुरेशी होती.
आराध्या श्वास रोखून त्याचा हात हलक्याने थोपटत होती, आणि शर्वाय तिच्या ओठांकडे पाहून थांबला… ती ओढ दोघांना ही जाणवतं होती… दोघे हलकेच एकमेकांच्या जवळ आले. गुंतल्या होत्या नजरा एकमेकांत… ही अनामिक ओढ… किती काळाची प्रतीक्षा जणू …. गरम श्वासाच्या स्पर्शाने उत्तेजना जागृत झाली… न शब्द, न घाई… फक्त स्वीकार होता. आज प्रथमच दोघे स्पर्शाने एकमेकांत गुंतले होते. आयुष्यातल्या पहिलावहिलाच अनुभव होता… पोटात भावनांची असंख्य कारंजी फुलू लागली… नकळत तिच्या हातांनी त्याच्या मानेभोवती वेढा दिला.
शर्वाय परदेशात शिकला असला तरी, मुलींच्या बाबत त्याने संरक्षणात्मक पवित्रा घेतला होता. एखाद्या सुंदर फुलाभोवती मधमाशा, फुलपाखरू बागडावीत त्याप्रमाणे मुली त्याच्याभोवती बागडत, पण मैत्रीशिवाय त्याने कोणात रसही घेतला नाही… शर्वायसारख्या स्थिर आणि निश्चल व्यक्तिमत्व असणाऱ्याचं हृदय लोकांना सामान्य वाटणाऱ्या मुलीने चोरलं होतं!
हेही वाचा – आराध्याची नवी मैत्रीण नंदिनी कोण होती?
शर्वायने तोही क्षण इतक्या सुंदर तऱ्हेने हाताळला कुठेही आराध्याला त्याबाबत विचित्रपणा, अवघडलेपणा येणार नाही, याची काळजी घेतली त्याने… त्यांचे ओठ अलगद एकत्र आले, एक अशी कबुली म्हणून, जी आतापर्यंत शब्दांत उमटली नव्हती. हा किस उत्कट नव्हता, पण त्याच्या प्रत्येक क्षणात तीव्रतेचा ओलावा होता. एक पहिलीच, शुद्ध, गहिर्या प्रेमाची साक्ष देणारी भेट होती ती.
जेव्हा ते विलग झाले, तेव्हा श्वास थरथरलेला — पण मन पूर्ण शांत झालेलं. त्या एका क्षणात त्यांनी एकमेकांना स्वीकारलं होतं. त्या एक चुंबनात त्यांनी सगळ्या धडपडीला, भीतीला, मागे सोडलं होतं — जणू त्या पावसात फक्त दोन जीव, एक हृदय आणि त्यांचं प्रेम भिजत होतं.
त्या क्षणानंतर, वेळ जणू निवांत झाली होती…
आराध्या अजूनही त्याच्या कुशीत विसावलेली होती. तिचं कपाळ त्याच्या छातीवर टेकलेलं, आणि त्याच्या हातांनी तिला अलगद कवेत घेतलं होतं… पावसाचे थेंब अजूनही खिडकीवर टपटप करत होते, पण आतल्या शांततेवर त्यांचा काहीही परिणाम नव्हता. त्या खोलीत फक्त श्वासांचं संगीत होतं — तिचं आणि त्याचं एक लयबद्ध गुंफलेलं गीत!
शर्वाय तिच्या केसांतून बोटं फिरवत बोलला, “आराध्या, हे सगळं फार आधी सांगायचं होतं… पण तुला सुरक्षित ठेवणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं.”
ते हास्य… ते काहीसं ओळखीचं होतं. आराध्या क्षणभर थांबली. तिच्या हृदयाची गती थांबावी इतकं गूंजत राहिलं ते हास्य… तिनं शर्वायकडे पाहिलं — त्याचं ते वळणाचं हसू, डोळ्यांतून झळकणारा गूढ आत्मविश्वास…
तो क्षण… काहीतरी छळत होतं तिला. तिच्या मनात एखादी जुनी, धूसर आठवण विजेसारखी चमकली… एक चेहरा… तेच हास्य…
ती एकदम स्तब्ध झाली. तिचा श्वास अडकला, आणि अनाहूतपणे तिच्या ओठांतून बाहेर पडला तो शब्द :
“…शिवा?”
शर्वायचा चेहरा क्षणभर गोठल्यासारखा झाला. त्याने हलकासा चेहरा वळवला, पण काही न बोलता तसाच थांबला.
आराध्या पुढे काही बोलूच शकली नाही. तिला वाटलं, तिच्या मनाच्या खोल कप्प्यात जपलेलं एक जुना, विसरलेला अधुरा संबंध अचानक समोर उभा राहिला…
त्या एका शब्दाने जणू काळाची दारे उघडली गेली होती…
“शिवा?”
शर्वायने तिच्याकडे पाहिलं. नजर झुकवली. मग हलक्या आवाजात विचारलं, “कुठून आलं हे नाव तुझ्या ओठांवर, आराध्या? शिवा…”
आराध्या अजूनही स्तब्धच होती. शर्वाय की आता ‘शिवा’ तिच्या समोर उभा होता? पण आता तो एक वेगळा चेहरा घेऊन… आठवणींच्या पायवाटेवरून तिचं मन मागे धावत होतं…
आराध्या काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या मनात एवढा मोठा रहस्याचा गुंता उलगडत होता की, भावना शब्दांत बांधता येत नव्हत्या.
“तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं?” तिने विचारलं.
“कारण, तुझ्या आयुष्यात मला माझं स्थान हक्काने मिळवायचं होतं, ओळखीच्या सावलीतून नव्हे… प्रेमाच्या प्रकाशातून.”
तेव्हा अचानक बाहेर परत पावसाच्या टपोऱ्या थेंबांची सर आली… शांत, गहिरी… एका छताखाली असलेलं त्यांचं प्रेम, विश्वास पाहायला…
त्याच क्षणी — शिवा पुन्हा शर्वाय झाला… आणि आराध्या… ती त्याच्या मनाच्या सर्वात जवळच्या कप्प्यात कायमची विसावली.
ती थोडी मागे झाली, त्याच्याकडे पाहत म्हणाली,
“तुम्ही ‘शिवा’ होता, हे माहीत असतं तर, कदाचित मी अजून आधी तुमच्यावर विश्वास टाकला असता…”
शर्वायला हसू आलं, “माझी ओळख तू विसरली होतीस, पण माझा विश्वास — तो कधीही कमी झाला नाही.”
आराध्याच्या डोळ्यांत एक थेंब जमा झाला.
“मी खूप लढले, शर्वाय… अनेक प्रश्न, अनेक गोंधळ. पण शिवाने शांतपणा, स्वतःची सोबत करणं आणि त्यातून सावरणं शिकवलं… मग सगळं काही सोपं झालं जणू…”
“आज म्हणू शकते शिवा म्हणून तुम्ही सोबत केली आणि सोबत करायचं वचन शर्वाय म्हणूनही दिलंत…”
शर्वाय ने तिचा हात हातात घेतला.
“आता कोणताही प्रश्न राहिलेला नाही, आराध्या. कारण त्याचं उत्तर तू आहेस.”
खोलीत एक हलकं संगीत घुमायला लागलेलं — फक्त त्यांच्या नजरेतलं, त्यांच्या हृदयातलं.
“शर्वाय…” ती हलक्या स्वरात म्हणाली, “कधी वाटलं नव्हतं की, इतकं कोणीतरी माझं होईल… आणि तेही अशा सगळ्या वादळांनंतर.”
त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले — एक शपथ म्हणून.
“तू आता एकटी नाहीस, आराध्या. आपण एकत्र आहोत — वादळांपलीकडे, सावल्यांच्या पार, या नात्याच्या उजेडात.”
त्या रात्री त्या दोघांनी नुसती स्वप्नं नाही पाहिली… तर त्या स्वप्नांना स्वतःच्या मिठीत घेतलं — प्रेम, विश्रांती आणि जाणीव या तिघांचं एकत्र अस्तित्व.
शर्वायने त्या शांत सकाळी, आराध्याशी मनातल्या भावना शेअर केल्यानंतर पहिल्यांदाच एक मोठा निर्णय घेतला — “हे नातं लपवायचं नाही, तर स्वीकारून त्याचा अभिमान बाळगायचा.”
त्याच दिवशी संध्याकाळी, तो घरी गेला दिवाकर आणि सुमित्रा आजींना भेटायला…
आजींच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा शांत, पण सगळं जाणून घेणारा भाव होता. दिवाकर पेपर वाचत होते. शर्वाय समोर बसला आणि काही क्षण गप्प राहून म्हणाला…
“मी एक निर्णय घेतलाय आणि तो तुमच्याशी शेअर करणं माझं कर्तव्य वाटतं…” तो ठामपणे म्हणाला.
हेही वाचा – आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…
दिवाकर यांनी पेपर खाली ठेवला. आजीची नजर त्याच्यावर स्थिर झाली…
“आराध्या… तिच्याबद्दल तुम्हा दोघांनाही आदर आहे, हे मला ठाऊक आहे. पण आता मला सांगायच आहे की, माझं तिच्यावर प्रेम आहे. मी तिला माझ्या आयुष्यात कायमचं पाहू इच्छितो.”
क्षणभर शांतता.
सुमित्रा आजींनी एक खोल श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित फुललं…
“आम्हाला आधीच जाणवू लागलं होतं, शर्वाय. पण तू हे स्वतःहून सांगितल्यामुळे समाधान वाटतं.”
दिवाकर उठून त्याच्या शेजारी येऊन बसले. त्यांनी शर्वायच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं —
“आराध्या तयार आहे का? आणि या निर्णयाच्या परिणामांची कल्पना आहे ना तुम्हाला?”
शर्वाय ठामपणे म्हणाला, “तिला मी कधीच जबरदस्तीने काहीच सांगितलं नाही. तिचं मत, तिचा आदर — हे माझं पहिलं कर्तव्य आहे… आणि परिणाम… तो स्वीकारायला मी तयार आहे. तिच्यासोबत असल्यास काहीही कठीण वाटणार नाही.”
दिवाकर आणि आजींचा नजरेचा एक छोटासा संवाद झाला — जणू काळजाच्या एका कोपऱ्यात आधीच त्यांनी हे नातं मान्य केलं होतं, फक्त वेळेची वाट पाहत होते.
“मग एक करा,” आजी म्हणाल्या, “तिच्या घरीही तुम्ही दोघं जाऊन स्पष्ट बोला. या नात्याला दोन घरांचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे.”
शर्वायने मान डोलावली. आता तो एकटा नव्हता. त्याच्या पाठीशी त्याच्या माणसांची मान्यता होती — आणि त्याचं प्रेम, आराध्या… त्याची ताकद होती.


