“रमा तोंड सांभाळून बोल. कुणाशी बोलत आहेस, त्याचा विचार तरी कर जरा! आजी-आजोबा आहेत ते तुझे… आधी सॉरी म्हण बघू त्यांना… आणि पुन्हा असं बोलायचं नाही. काय कळतंय का काही तुला?”
रमा घुश्यातच होती. समीरा म्हणजे तिच्या आईने सांगूनही रमा माफी मागायला तयारच नव्हती. समीराने थोडा वेळ वाट बघून परत तेच सांगायचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरोजताई मधे पडल्या, “असुदे गं समीरा. लहान आहे ती अजून. कळेल हळूहळू तिला. म्हातारपणी काय त्रास होतात, हे तिला आत्ता कसं कळणार. तू नको ओरडू तिला.”
समीरा हे ऐकून चिडलीच, “घ्या! झालं? आता काय बोलणार मी यावर… नेहमीचच झालं आहे हे!”
समीरा गप्प बसली अगदी नेहमीप्रमाणे. तिची खूप धुसफूस होत होती. आतल्या आत खूप रागही येत होता. पण सासुबाईंपुढे काय बोलणार?
समीरा मोने हिच्या लग्नाला आता जवळ जवळ 16 वर्षं होत आली होती. समीरा आणि सिद्धार्थ यांच्या सुखी संसारात लगेचच वर्षभरात ‘कुणीतरी येणार येणार गं’ अशी गाणी ऐकायला यायला लागली. दोन्ही घरात आनंदी आनंद झाला. एका गोड परीचं आगमन झालं आणि मोने घराण्यात जवळ जवळ 30 वर्षांनी लक्ष्मी आली. समीराने लाडाने तिचं नाव रमा ठेवलं. एखाददोन महिन्यात बारीकसारीक कुरबुरी आणि मग वर्षभरात त्याचं रूपांतर मोठ्या वादात झालं… त्यामुळे समीरा आणि सिद्धार्थ यांनी चांगल्या तऱ्हेने वेगळं रहायचा निर्णय घेतला.
सरोजताईंना ते काही पटलं नाही. “सुखासुखी कशाला वेगळं व्हायचं. मी सुनेला ‘असं कर तसं कर’ नाही सांगणार तर कोण सांगणार?” असा त्यांचा विचार होता. पण मुलापुढे त्या काही बोलल्या नाहीत आणि त्यांना रमेशराव म्हणजे समीराचे सासरे पण काहीच बोलत नसत. त्यांना सगळं दिसत होतं, पण त्यांचा मृदू स्वभाव असल्याने ते सरोजताईंना कधीच काहीच बोलले नाहीत.
पुढच्या महिन्यात सिद्धार्थ आणि समीराच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे समीराचे सासू-सासरे काही दिवस इथेच येऊन राहिले. काय तर म्हणे वाढदिवस साजरा करायचा तर, सगळे असायला हवेत. पण लग्नाचा वाढदिवस समीराचा… पण तरीही इथेही सरोजताई ‘हे आणून दे, ते आणून दे’ असं समीराला सांगत होत्या. शिवाय, सगळा स्वयंपाक, तयारी ती पण समीराने करायची. त्यांची इतर बाबतीत सुद्धा खूप भूणभूण असायची. पण समीरा थोडे दिवसांचा प्रश्न म्हणून सोडून द्यायची. पण आज कहर झाला. रमा आजीला अपमानित होईल असं बोलली म्हणून समीरा तिला सॉरी म्हणायला सांगत होती. तर सरोजताई मात्र नेहमीप्रमाणे रमाच्या नजरेत स्वतः छान राहू पाहात होत्या!
हेही वाचा – बेटर हाफ
समीरा मात्र नेहमीच या सगळ्यांत हिरमुसून जायची. अशाने रमा आपल्याविषयी आकस तर मनात नाही ठेवणार ना? ‘आई वाईट’ आणि ‘आजी चांगली’ असं तिच्या विचित्र वयात तिला वाटायला लागलंच आहे, ते आता या प्रकर्षाने परत परत करतायत. काय करावं… असाच विचार तिच्या मनात येत होता. दरवेळी हे असंच चालायचं आणि सरोजताईंना, ना सिद्धार्थ समजवायचा ना रमेशराव…
पुढचे दोन दिवस समीरा गप्पगप्प होती. त्याच दोन दिवसांत रमेशराव संध्याकाळी सरोजताईंना मोगऱ्याचा गजरा घेऊन आले. सरोजताई वासानेच अगदी खूश झाल्या. त्या चहा बनवत होत्या, तोच रमेशराव आत आले. “काय? मंडळी गालातल्या गालात हसतायत? सुवास दरवळत पोहोचला वाटतं तुमच्यापर्यंत.” सरोजताईंनी चहाचा कप समोर धरत म्हटले, “हो तर… आणि तुमच्या आवडीचा आलं घातलेला चहा पण बनवून तयार आहे. वेळेत आलात. या झोपाळ्यावर बसून घेऊ चहा.”
चहा घेत घेत रमेशरावांनी विषयाला हात घातला… “सरू मी काय म्हणतो, आपल्यावेळी दिवस किती वेगळे होते ना? आपल्या आईवडिलांना 7-8 मुलं असायचो. मग काय आईला जास्त लक्ष द्यावंच नाही लागायचं. एकमेक मिळून मिसळून रहात होतो ना? आजकाल एक नाहीतर, जास्तीत जास्त दोन मुलं… सगळ्यात मोठं होण्याची मजा यांना कशी कळणार?” तशा ‘त’वरून ताकभात ओळखणाऱ्या सरोजताई म्हणाल्या, “तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पटकन मुद्द्याला हात घालून सांगा. आढेवेढे नका घेऊ.”
तसे रमेशराव छानसे हसले. “बाईसाहेब तुम्हाला लगेच कळतं मला, सिद्धार्थला, रमाला काय म्हणायचं आहे ते. मग फक्त समीराच्या मनातलं का नाही ओळखता येत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तू जशी आई होतीस आणि आहेस तशीच ती पण आई आहे. तुला तुझे दिवस आठवत नसतील तर, ते आठव आणि मग बघ तुझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल. अगं, आपल्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आता या सूना पण शिकलेल्या असतात. त्या नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करत असतात. शिवाय, रमाची पिढी सुद्धा आपल्या मुलांसारखी नाहीये. आई बाबा म्हणतील ते निमूट ऐकून घेणारी. हट्टी आणि हेकेखोर आहे, हे आपण बघतो आणि ऐकतोच की. रमा आपल्यासोबत रहात नाही म्हणून आपल्याला कळत नाही. पण या मुलांना आता मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यावर इतकी माहिती मिळते की आपण पण कित्येकदा गप्प होतो. तिथून ते बरंच काही शिकत असतात आणि त्यांचं अपरिपक्व मन, मेंदू ते कुठेही लागू करतं. त्यांना तिथेच थांबवायला नको का? आणि अगदी शेवटी हा त्या दोघांचा संसार आहे. आपण त्यांच्यात बोलायला नको… ते आई मुलीचं नातं आहे. समीराला जसं वाढवायचं आहे, तसं वाढवू दे रमाला…”
त्यावर लगेच तोडत सरोजताई बोलल्या, “अहो, पण मी कुठे तिला वाढवायला जातेय. रहातेच आहे की, ती वेगळी आपल्यापासून. मग रमाचं चुकलं तर इतकं कशाला बोलायचं. आजी आजोबांची माफी वगैरे जास्तच होते ना जरा!” आता मात्र रमेशराव सीरियस होत बोलले, “सरोज, अगं तूच तुझ्या तोंडाने म्हणते आहेस रमा चुकली. मग तिला तिची चूक दाखवायला नको का. आता ती लहान नाही. आपलं चुकलं की, माफी मागायची हे तिला कळायला हवंच! तेच तर केलं समीराने. आता आजी समोर होती म्हणून चूक झाकायची, हे काही बरोबर नाही. अगं प्रेम कर ना, कोण नाही म्हणतंय? पण आंधळं प्रेम करू नकोस. जशी सासू, आई, बायको म्हणून सजग होतीस तशीच आजी म्हणून पण जबाबदारीने वाग. बघ सगळं सोप्प होईल… आणि जसं नवरा बायकोमध्ये कधी पडू नये, तसंच आई-मुलाच्या किंवा आई-मुलीच्या मध्येसुद्धा कधीही आपण पडू नये. आई आपल्या अपत्याच्या चांगल्यासाठीच करत असते. आणि पिढी दर पिढी हे बदलत जाणारच. आपण सुनेला पाठिंबा द्यायला हवा. ती करेल ते संस्कार चांगलेच असतील. तू समीराला रमा समोर बोललीस तर, रमाही तिच्या आईचा मान ठेवणार नाही आणि हे तुझ्या संस्कारात नक्कीच बसत नाही. तू काल हे केलं त्याने समीराला नक्कीच वाईट वाटलं असेल. थोडं तिच्या बाजूने विचार केला की, कळेल तुला नक्कीच!” सरोजताई आता गप्प झाल्या… नुसत्याच हसल्या.
रात्री रमा उशिरा येणार होती क्लासमधून म्हणून संधी साधून सरोजताईंनी समीरासोबत बोलायचं ठरवलं आणि तशी वेळ त्यांना जेवण झाल्यावर मिळाली. रमेशराव हॉलमध्ये टीव्ही बघत होते, सिद्धार्थ लॅपटॉपवरती काम करत होता.
“अगं समीरा, ये आपण दोघी मिळून पुढच्या महिन्यात तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी कुणाला बोलवायचं ते ठरवू आणि वाढदिवस यावेळी त्या घरी होणार.”
हेही वाचा – अधिकाचं देणं
समीरा चक्रावलीच… “इतकी वर्षं झाली या कधीच तिकडे काही करत नाहीत, कायम इथेच माझ्याकडुन सगळं करून घेतात… यावेळी हे काय नवीन आता.” असं ती मनात म्हणत असतानाच सरोजताई तिच्या खांद्यावर हात ठेवत हळूच कुजबुजत म्हणाल्या, “अगं सासू म्हातारी झाली. तिला नाही कळत आजकालच्या युगात कसं वागायचं ते. चुकलंच माझं! रमा नात आहे, हे मनात इतकं ठसलं आहे की, ती नात तुझ्यामुळे आहे, हेच विसरले बघ मी! मलाही आता हळूहळू पचनी पडत आहे की, दुधापेक्षा दुधावरची साय महत्त्वाची असते हे खरं, पण, त्या दोन्हीला धरून ठेवणारं पातेलं म्हणजे ‘तू’ सगळ्यात महत्त्वाचं. नाहीतर सगळं वाया आहे. साठी झाली ना की, माणसाचा विशेषतः बायकांचा हेकटपणा कमी होण्याऐवजी कधीकधी वाढतच जातो. सगळं इतकी वर्षं जीव ओतून सांभाळलेले असतं की, दुसऱ्या कुणामुळे हे विस्कटू नये असं वाटत जातं. पण तूही माझाच संसार पुढे नेत आहेस, हे डोक्यातून गेलं… आणि काय गं, असा अबोला तुझी आई असती तर, धरला असतास का? मी पण तुझ्या नवऱ्याची आई आहे, मलाही समजावून सांगायचं ना, वेळेपरत्वे रागवायचं… पण असं घरच्या लक्ष्मीने फुगून नाही बसायचं बरं! दे सोडून.” असं म्हणून सरोजताईनी डोळ्याला पदर लावला. आणि समीराचा सगळा रुसवा क्षणार्धात गळून पडला.
“आई अहो, माझं पण चुकलंच. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ… झालं गेलं गंगेला मिळालं. रमा यायला वेळ आहे थोडा. चला आपण यादी बनवू. मी कागद पेन आणते आणि तुम्ही बसा मी छान गरम कॉफी करुन आणते तुम्हाला आवडते तशी. तुम्हाला रात्री झोपायच्या आधी कॉफी आवडते, हे सिद्धार्थकडून खूप वेळा ऐकलं आहे मी,” असं म्हणून समीरा वळली आणि हॉलमध्ये जाऊन तिने डोळ्यांनीच सासऱ्यांना ‘थँक यू’ म्हटले. रमेशराव पण त्यांच्यातला समेट बघून गोड स्मित करत हसले.


