“अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनीअर आहात अशोक; मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?” अग्रवाल शेठनी विचारलं.
अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला, “काय करणार सर, दोन वर्षं झालीत बी.ई. होऊन, पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे…”
“काय करतात वडील तुमचे?”
“गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं…”
“ओह! पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती?”
“हो सर. सगळी नॉन-टेक्निकल काम असतात. पण ईलाज नाही सर… माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. मी मात्र दोन वर्षांपासून रिकामा बसून आहे. ते मला बोलत नाहीत, पण त्यांची मन:स्थिती मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीतकमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल.”
अग्रवाल शेठ विचारात पडले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या फॅक्टरीत एक इंजिनीअरची जागा रिकामी होती. अशोकला तिथे पाठवता आलं असतं, पण त्याला इंजिनीअरचा पंधरा-वीस हजार पगार द्यावा लागला असता. शेठ महाधूर्त होते… त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं…
“ठीक आहे अशोक. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. तुम्हाला पाच हजार पगार देऊ आम्ही. ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील.”
“येस सर…” अशोक खूश होऊन म्हणाला. जसा तो उठायला लागला शेठ म्हणाले, “अजून एक, आता तुम्ही इंजिनीअर आहात तर, आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना?”
“जाईन की सर. ते आवडेल मला…”
शेठ हसले. त्यांचा हेतू साध्य झाला होता.
हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!
दोन-तीन दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलावण्यात आलं. कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनीअर मिळेपर्यंत तिथेच काम करावं, असं सांगण्यात आलं. अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबधित काम मिळालं, याचा आनंद झाला. थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला. मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले. क्वालिटी आणि क्वान्टिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या, त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या. त्याच्या लक्षात आलं की, इथले कामगार खूप बेशिस्त आहेत. वेळीअवेळी मशिन्स बंद करून तंबाखू, गुटखा खाणं, केव्हाही चहा प्यायला जाणं, काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे. प्रॉडक्शन मॅनेजरला सांगून त्याने त्याच्यावर बंधनं आणली. त्यामुळे कामगार दुखावले, पण उत्पादन वाढलं. कंपनीचा नफा वाढू लागला.
तीन महिने झाले तरी दुसरा इंजिनीअर आला नाही आणि अशोकचा पगारही पाच हजाराच्या वर गेला नाही. वीस-पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजिनीअर्स आता त्याची टिंगलटवाळी करू लागले. महाधूर्त असणाऱ्या अग्रवाल शेठनी त्याचा पाच हजारांत कसा बकरा केला, यावर हशा पिकू लागला. अशोकलाही ते समजत होतं, पण जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं. परत आईवडिलांवर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती.
मध्यंतरी अग्रवाल शेठनी सगळ्या इंजिनीअर्सची मीटिंग घेतली. त्यात त्यांनी अशोकची खूप प्रशंसा केली. “कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्सलन्ट असून वीस-पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजिनीअर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे,” असं ते म्हणाले… तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली. अग्रवाल शेठनी त्याला पगारवाढीचंही आश्वासन दिलं.
अशोकला आता फॅक्टरीत 11 महिने झाले होते. अग्रवाल शेठनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही. तो निराश झाला, पण ईमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठना दया येऊन ते पगार वाढवतील, अशी त्याला खात्री होती.
त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून आले. त्यांनी फॅक्टरीतील वातावरण बिघडवून टाकलं. अशोकच्या रोजच कामगारांशी कटकटी होऊ लागल्या.
एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी अशोकचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. आजूबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशिन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली. सिक्युरिटीने वाद सोडवला, पण अख्ख्या फॅक्टरीतल्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे, तोपर्यंत काम सुरू होणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. फॅक्टरीच्या डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या दिवशी अग्रवाल शेठनी अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. काय होणार याची पुसटशी कल्पना असल्याने, धडधडत्या ह्रदयाने अशोक केबिनमध्ये शिरला.
“या अशोक बसा. जे घडलं ते वाईट घडलं,” अग्रवाल शेठनी बोलायला सुरुवात केली… “यात तुमची काही चूक आहे, असं मला वाटत नाही. पण माझा काही इलाज नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हाला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे.”
अशोकचे डोळे अश्रूंनी भरुन आले.
“सर, मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठीच होतं…”
“मला मान्य आहे. एक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय. पण तुम्ही जाणताच दोन दिवसांपासून फॅक्टरी बंद आहे. लाखोंचं नुकसान होतंय. एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही.”
“सर पण प्लीज मला काढू नका. मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे…”
“तिथे तर दोन माणसं अगोदरच काम करताहेत. त्यामुळे ते शक्य होणार नाही.”
“सर, मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू?”
दुःखाने अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. अग्रवाल शेठनी खांदे उडवले.
“तुमचा हिशोब तयार आहे. कॅशियरकडून घ्या…” अशोक जड अंतःकरणाने उठला. दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला…
“थांबा अशोक…” अशोक वळला, त्याने चमकून शेठकडे पाहिलं.
“या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी, आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉइन करू शकता!”
अशोकला आपण काय ऐकतो आहोत, ते समजेना!
“काय म्हटलात सर?”
“होय, अशोक तुम्ही योग्य तेच ऐकताहात…”
“सर, पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला?” अशोक अजूनही संभ्रमावस्थेतच होता.
“नाही अशोक, तिथे तुम्हाला पाच नाही, पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे!”
“सर, चेष्टा करताय माझी,” अशोक अविश्वासाने म्हणाला.
“नाही अशोक तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर, प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जाताय. तुमची हुशारी, मेहनत पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं. ती संधी आज अशा प्रकारे चालून आली. तुमच्यावर नशिबाने, कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खूप अन्याय केला. आता न्याय करायची वेळ आलीय…”
हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा
अशोक आनंदला.
“सर, पण मला दोन दिवस वेळ द्या, पुढची सगळी व्यवस्था करायला…”
“काहीच गरज नाही अशोक. तिथे टू बीएचकेचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी करून ठेवलाय. बाकी सर्व व्यवस्थाही झाली आहे. तुम्ही फक्त बॅग पॅक करा. उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. तुम्ही जोपर्यंत नोकरीत रहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील.”
अशोकच्या डोळ्यांतून आता आनंदाश्रू वाहू लागले. तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला. शेठजींनी त्याला उचलून छातीशी धरलं.
“अशोक एक गोष्ट मला नेहमी खटकते. तुम्ही मराठी तरूण का नोकरीच्या मागे लागता? जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारांसाठी वर्षभर केलीत, तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकता…”
“सर, आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो. ते असलं तरी कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठींबा नसतो. त्यातून धंदा नाही चालला तर, नुकसानाची भीती असते…”
“अहो, तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा… पोहता तुम्हाला आपोआपच येईल! तुम्हाला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय… भीक मागायची वेळ आली होती माझ्यावर… पण चिकाटी ठेवली तर, माणूस तरून जातो…! ठीक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची! दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरू करून दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन…”


