नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
देशमुख लेन मधल्या ऐनापुरे बाईंकडे दोन वर्षं माँटेसरी केली की, पुढे बाहेरच्या शाळेत ॲडमिशन घ्यायची आणि शिक्षणाची सुरुवात करायची, असा तेव्हा पायंडा होता… आजपासून शाळा सुरू होणार होती आणि आमच्या मातोश्री मला शाळेत घालण्यासाठी गिरगावातल्या चिकित्सक शाळेत घेऊन गेल्या. डायरेक्ट शाळेत बसवायच्या तयारीत. पण हाकलून दिलं आम्हाला… असे सांगून की, “आमच्याकडे खूप आधी मुलाखत घेऊन ॲडमिशन देतात. आता जागा भरल्या.” माझ्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती. घर आणि घरातली कामे या पलीकडे तिला जग नव्हतं. तेव्हा टीव्ही, इंटरनेट नव्हते. बरं, पेपर होते, पण आईला वेळ नसायचा आणि वाचनाची विशेष आवडही नव्हती. मग या गोष्टी तिला कशा समजणार? मग काय अस्मादिकांचा रवानगी झाली गिरगावातल्या सदानंद वाडीत भरणाऱ्या म्युनिसिपालटीच्या शाळेत!
एकदा तिथे नेऊन बसवलं ते डायरेक्ट इयत्ता चौथीपर्यंत. तिथून मग पाचवीसाठी चंदा रामजी गर्ल्स हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे काही मुलाखत वगैरे भानगड नव्हती. खऱ्या अर्थाने खूप छान शाळा आयुष्यात आली. पहिल्यांदा कळलं की, मधली सुट्टी दोन वेळा होते. पहिल्या छोट्या सुट्टीमध्ये फटाफट डबा खाऊन मोठ्या सुट्टीत खाली जाऊन बॅडमिंटन खेळायचं… खूप खेळायचं… हेच डोक्यात असायचं! घरी जाऊन अभ्यास करायचा आणि पुन्हा वाडीत खेळायला जायचं. आजच्या पिढीला तेच मिळत नाहीये. शाळेचा अभ्यास, ट्युशन, डान्स क्लास, तबला, ड्रॉइंग, स्केटिंग… जिथे जमेल, सुचेल तिथे आई-वडील लेकरांना अडकवून टाकतात. भरपूर खेळणे, धडपडणे पुन्हा उभे राहणे, हे काही या आजच्या पिढीला माहीतच नाही!
चंदा रामजी म्हणजे स्वर्ग होता. नव्याने उलगडलेलं विश्व! प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असू शकतात नाही, तर असतातच, हे तिथे कळलं!! बरं शाळा गुजराती आणि मराठी माध्यमची होती. त्यामुळे काही विषय शिकवायला कॉमन गुजराती शिक्षिका होत्या. जसं की, हिंदी, इंग्रजी, गायन, चित्रकला, पीटी… त्यामुळे एक अतिरिक्त भाषा शिकता आली आणि माझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये त्याचा खूप उपयोग झाला.
हेही वाचा – मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…
मुलींची शाळा आणि माणसं जोडायची आवड असल्याने खूप खूप मैत्रिणी लाभल्या. खूप वर्षांनी फेसबुकच्या कृपेने शाळेमधल्या कितीतरी मैत्रिणी भेटल्या. मग काय व्हॉट्सॲप ग्रुप बनले मैत्रिणी गप्पा मारायला लागल्या. सुख-दुःख वाटायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणी जॉब करताहेत. काहींना मुलांच्या लग्नाची विवंचना, तर काही सासू झाल्यात. काही जणी तर आज्जी पण झाल्यात! एक गोष्ट मात्र कॉमन दिसली सगळ्याजणी आई आहेत आणि आपापल्या मुलांची, नातवंडांचे कौतुक करून थकत नाहीत. बऱ्याच जणींना वयपरत्वे आलेले आजार आहेत. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, कंबरदुखी आणि काही न काही आहेच… काहीजणी मुंबई सोडून पुणे, नाशिक, नगर किंवा सरळ देशाबाहेर गेल्यात. काहीजणी तर भेटण्याआधीच पुढल्या प्रवासाला निघून पण गेल्यात. दुर्दैवाने, आमची भेट नाही झाली. काहींचे जोडीदार पुढल्या प्रवासाला निघून गेलेत.
हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…
अचानक ठरलं की, ‘आता फोन गप्पा पुरे, भेटुयात.’ पण शेवटी आम्ही पडलो बायका. अडचणींवर मात करून चौघीजणी तयार झाल्या आणि माझ्या घरी आल्या. खूप धम्माल वाटली. त्यातली एक पाच-सहा वर्षांपूर्वी भेटली होती. बाकीच्या तिघी 43 वर्षानी भेटल्या. भेटीचा आनंद कमाल होता.
नवऱ्याने आधीच दम भरला होता की, “घरात जेवण बनवू नकोस. सगळ्याजणी बाहेर जा जेवायला. तू म्हणशील, मी जेवण बनवते. मोजके पाच पदार्थ बनवेन आणि सुचेल तसे 17 प्रकार बनवत बसशील… उपयोग काय मैत्रिणींना भेटून.” मग तो स्वतः सोबत आला. छान जेवण मिळेल, एसीमध्ये बसून मस्त गप्पाटप्पा करत enjoy करता येईल, असे हॉटेल त्याने शोधून दिलं. दिवस संपला. पण गप्पा काही संपेनात. पुन्हा लवकर आणि अजून जास्तजणी भेटुयात, असे ठरवून सगळ्यांचा निरोप घेतला.
पंधरा दिवस होऊन गेलेत, पण मैत्रिणींच्या भेटीने मिळालेली ऊर्जा अजूनही आनंद ताजा करतेय. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची आठवण म्हणजे 1983चा वर्ल्ड कप! त्यावरच अलीकडे एक सिनेमा आला होता, ’83’. त्यात वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये गेल्यावर मोहिंदर अमरनाथ कपिल देवला सांगतो, वडील लाला अमरनाथ यांनी सांगितलं की, ‘मुझे 10 साल जवान कर दिया, यार…’
त्या दिवशी आमचंही यापेक्षा वेगळं काय झालं?


