अपटुडेट पोषाख केलेला आणि एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेला तो उमदा तरुण उत्सुकतेने माझ्याकडे पहात होता. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासत होतो. काही वेळानंतर मी त्याला म्हणालो, ” तुझ्या जन्मलग्नकुंडलीतील कर्मस्थानी असलेली ग्रहस्थिती बघता असं दिसत आहे की, तुला कामाच्या ठिकाणी तीव्र अशा मानसिक चढउतारांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच, अशुभ स्थितीत असलेल्या राहूची पूर्ण दृष्टी चंद्रावर असल्याने कोणत्याही लहानसहान समस्येवरून तुझी मनःस्थिती बिघडत असण्याची शक्यता आहे.” माझे बोलणे ऐकून तो अस्वस्थ झाला आणि अभावितपणे त्याचा हात वरच्या खिशातील सिगारेटच्या पाकीटाकडे गेला. पण तत्क्षणी मी समोर आहे, हे लक्षात येऊन तो भानावर आला. स्वतः ला सावरुन तो मला म्हणाला, “मला भरपूर पगार आहे. पण त्याच्या दुप्पट कामाचा ताण आहे. सततच्या तणावामुळे मी रिलॅक्स होऊ शकत नाही. त्यामुळे काहीही मनाविरुद्ध झालं की, मला खूप राग येतो. अशा परिस्थितीमुळे गेल्या काही काळात माझे खूप जवळच्या लोकांशी संबंध बिघडले आहे. त्याला माझा चिडचिडा बनलेला स्वभाव कारणीभूत आहे, हे मला कळतंय, पण मानसिक ताण कमी करणं काही केल्या जमत नाहीये.”
यावर मी थोडा वेळ विचार केला आणि दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली,
“तणाव कमी करण्यासाठी तुला निसर्ग, नियमित व्यायाम आणि ज्ञान या तीन जीवनसरितांचा त्रिवेणी संगम मनाच्या तीर्थक्षेत्रावर घडवून आणायचा आहे. निसर्ग म्हणजे तुझी गंगा, नियमित व्यायाम म्हणजे तुझी यमुना आणि ज्ञान म्हणजे तुझी अदृश्य सरस्वती नदी असणार आहे. या त्रिवेणी संगमाला संयम, विवेक, सहनशीलता यासारखे अनेक लहान-लहान झरे सुद्धा येऊन मिळणार आहेत. यात तू निरंतर अमृतस्नान करत राहणार आहेस. हे स्नान म्हणजे तुझ्या मनावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी असलेला रामबाण उपाय आहे.
हेही वाचा – झाले मोकळे आकाश…
मनावर प्रचंड ताण आणण्यात निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा फार मोठा वाटा आहे. त्यातही सतत तुझ्या मानगुटीवर बसणारा स्मार्टफोन हा अत्यंत घातक आहे. त्याचा आवश्यक तितकाच वापर करणं योग्य आहे. पण सकाळी उठताक्षणी स्मार्टफोन हाती घ्यायचा मोह तुला होत असेलच. अशावेळी तू निसर्गाच्या गंगेत डुबकी मारायची आणि आजूबाजूच्या झाडांवर बसलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटावर लक्ष केंद्रित करायचे. काही क्षणांतच स्मार्टफोनचा विचार मनातून हद्दपार होईल. त्यानंतर काही वेळाने तुला सिगारेटची आठवण येऊ शकते. त्याक्षणी तू व्यायामाला सुरुवात करायची. व्यायामासोबत प्राणायाम, योगसाधना केलीस तर फारच उत्तम होईल. व्यायामानंतर तुझे शरीर आणि मन एकदम हलकेफुलके होऊन जाईल. अशाच पद्धतीने दिवसभर येणारे वेगवेगळे मानसिक ताण या त्रिवेणी संगमात स्नान करत विशुद्ध ज्ञानाच्या जलाने तुला कमी करता येतील.”
माझे बोलणे ऐकून तो बराच रिलॅक्स झालेला दिसला. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. मग मी त्याला काही ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा सांगितले. माझ्या सर्व सूचना तंतोतंत पाळण्याची ग्वाही देऊन तो समाधानाने निघून गेला.
या घटनेला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो…
एके दिवशी मी सोलापूर शहरातील निसर्गरम्य अशा पंखाबावडी विभागातून जात होतो. विद्याविहार कॉलनीपाशी आल्यावर मी अचानक स्तब्ध झालो. माझ्यापासून काही अंतरावर एक तरुण अत्यंत तल्लीनतेने एक दृश्य पाहात होता. मी हलक्या पावलांनी, त्याची तंद्री भंग होणार नाही, याची काळजी घेत त्याच्या थोडं मागे थांबून ते नजरबंद करणारं दृश्य पाहू लागलो.
हेही वाचा – ही वाट एकटीची…
कॉलनीच्या कंपाऊंडला लागूनच असंख्य छोटी छोटी रानफुले फुलली होती. एका लहानशा रोपट्याच्या पानावर एक इवलंसं सरड्याचं पिल्लू बसलं होतं. तितक्यात एक फुलपाखरू गिरकी घेत आलं. पिल्लाने त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण फुलपाखराने त्याला हुलकावणी दिली. फुलपाखरू फुलांच्या ताटव्यांत बागडत होतं. मृत्यूच्या इतक्या निकट सान्निध्यात ते जीवनाचा आनंद लुटत होतं. ते वर जात होतं, खाली येत होतं… मृत्यूभोवती गिरक्या घेत त्याला जगणं शिकवत होतं. काही वेळाने ते फुलपाखरु दूरवर उडून गेलं आणि तो तरुण जाण्यासाठी वळला… तो तोच होता. आमची नजरानजर होताच तो हर्षभरित होऊन म्हणाला,
“निसर्गाच्या सहवासात आपली पुन्हा भेट होत आहे, हा किती सुंदर योगायोग आहे. तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी सध्या रोज त्रिवेणी संगमात अमृतस्नान करत आहे. त्यामुळे माझा जणू काही कायापालटच झाला आहे. मी संपूर्ण तणावमुक्त झालो आहे. सिगारेटची तर आता मला आठवणसुद्धा येत नाही.”
बोलता बोलता त्याने वरच्या खिशाकडे बोट दाखवले. मला खूप समाधान वाटलं की, आता त्याच्या वरच्या खिशात सिगारेटचं पाकीट कधीच दिसणार नव्हतं. मग त्याच्याशी थोडावेळ बोलून मी आनंदाने तिथून निघालो.


