सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥172॥ एऱ्हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचे ॥173॥ हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥174॥ तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथ कौरवेशा । कृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥175॥ म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पार्था ते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥176॥ ऐसीं श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥177॥ तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया कृष्णें ॥178॥ मग दिव्यचक्षु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी पाटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥179॥ हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥180॥ जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें वैकुंठें । दाविलें तया ॥181॥ मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदा धरिला ॥182॥ मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥183॥ ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मती ठेले । तें लागला बोलों ॥184॥ तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणे तो ॥185॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला
अर्थ
अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात असतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत काढत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. ॥172॥ सहज विचार करून पाहिले तर, विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादिक खरे खरे पुरुष, ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. ॥173॥ योगी ज्याचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदी आधीन झाला आहे. याकरिता राजा धृतराष्ट्रा, माझे मन आश्चर्य करते, ॥174॥ तसेच संजय म्हणतो, कौरवांच्या राजा, (धृतराष्ट्रा), याच्यात आश्चर्य ते काय? कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्य़ाचा असा भाग्योदय होतो. ॥175॥ म्हणून ‘अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील, ती दृष्टी मी तुला देतो’ असा तो देवांचा राजा (श्रीकृष्ण परमात्मा) म्हणाला. ॥176॥ अशी अक्षरे भागवंतांच्या मुखातून निघतात न निघतात, तोच अज्ञानांधकार एकदम जावयास लागला. ॥177॥ ती अक्षरे नसून ब्रह्मसाम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीच अर्जुनाकरिता कृष्णाने उजळल्या, असे समजा. ॥178॥ मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्यदृष्टि उत्पन्न झाली आणि त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपला ऐश्वर्ययोग दाखविला. ॥179॥ हे जे सर्व अवतार, ते ज्या विश्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वस्वरूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते ॥180॥ ज्या योग्य आणि अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप कृष्णांनी अर्जुनाला (आपल्या ठिकाणी) दाखविले. ॥181॥ पूर्वी बालपणी जेव्हा एका वेळेस या श्रीकृष्णांनी माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाताने धरले ॥182॥ नंतर त्यावेळी भीत भीत जसे काही तोंडातील (मातीचा) झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी यशोदेला विस्तारासह चौदाही लोक आपल्या मुखात दाखवले. ॥183॥ अथवा (तपश्चर्या करीत असताना) ध्रुवाच्या पुढे भगवान प्रगट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी, असे आले; पण ती कशी करावी हे त्यास कळेना. (तेव्हा) मधुवनामध्ये भगवंतांनी आपला शंख त्याच्या गालास लावला, तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते, ते तो बोलायला लागला. ॥184॥ (संजय म्हणतो,) राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला. त्यामुळे आता माया कोणीकडे आहे, ही भाषा देखील तो जाणेनासा झाला. ॥185॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…


