दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 01 जून 2025
वार : रविवार
तिथि : षष्ठी 19:59
नक्षत्र : आश्लेषा 21:35
योग : ध्रुव 09:10
करण : कौलव 8:00
सूर्य : वृषभ
चंद्र : कर्क 21:35
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:12
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
अरण्य षष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
‘रावबहादूर’ धुरंधर
‘रावबहादूर’ महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म दि. 18 मार्च 1867 रोजी झाला. कोल्हापूरचे कलासंस्कार लाभलेल्या या कलावंताला आबालाल रेहमान यांच्यासारखे गुरू लाभले. धुरंधर यांनी 1890 ते 1931 या कालावधीत जे. जे. कला महाविद्यालयात अध्यापन केले. आपल्या हजारो चित्रांमुळे त्रिखंडांत कीर्ती मिळविलेल्या धुरंधर यांना ब्रिटिश सरकारने ‘रावबहादूर’ ही पदवी दिली. सामाजिक भावनांची जाण आणि रंगरेषेवरील अतुलनीय प्रभुत्व ही त्यांच्या चित्रांची खासीयत होती आणि त्याच बळावर त्यांनी हजारो चित्रे रेखाटली. या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच 1895मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या रावबहादूर धुरंधरा यांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये तसेच ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्रीयांच्या अभिमानाचा विषय होता. ‘कलामंदिरात एकेचाळीस वर्षे’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 1 जून 1944 रोजी ते कालवश झाले.
लेखक, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
मराठीतील विनोदी लेखक, नाटककार, कवी तसेच समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म 29 जून 1871 साली बुलढाणा येथे झाला. 1891मध्ये बॅचलर पदवी मिळवण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1897मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अकोला आणि नंतर जळगाव जामोद येथे वकिली केली. त्यांनी आपल्या वाङ्मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (1893) केला. 1910 सालचा ‘सुदाम्याचे पोहे’ अर्थात ‘अठरा धान्यांचे कडबोळे’ हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह खूपच लोकप्रिय झाला. ‘दुटप्पी की दुहेरी’ आणि श्यामसुंदर या दोन कादंबर्या त्यांनी लिहिल्या. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठीतील विनोदाबरोबरच साहित्य समीक्षेच्या क्षेत्रातही अग्रणी होते. बहु असोत सुंदर, संपन्न की महान… या गीताचे रचनाकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. कोल्हटकर यांनी 12 नाटकेही लिहिली. त्यापैकी आठ नाटके रंगभूमीवर आली. 1913 मध्ये पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा या महान विनोदी लेखकाचे 1 जून 1934 रोजी निधन झाले.