Sunday, June 15, 2025
Homeललितनजर नजर की बात हैं!

नजर नजर की बात हैं!

मनोज जोशी

भाग -1

किन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत:, बायकांची! किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पाहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं त्या केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळत होतो. एखादा तृतीयपंथी समोर आला की, सरळ मान हलवून पुढे जा सांगत असे किंवा इथं-तिथं पाहात रहायचो. पण एक अनुभव असा आला की, त्यांच्याकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला!

वृत्तपत्रात काम करत असताना ऑफिसला जाण्यासाठी मी दुपारी विरारहून दादर लोकल पकडत असे. एक किन्नर रोज माझ्या खिडकीजवळ काहीतरी पुटपुटत पुढे जात असे. सुरुवातीला मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस चिडून दरवाजातच जाऊन उभा राहिलो. ती आली आणि म्हणाली, ‘क्या सेठ, कैसा है? मैं हमेशा बुलाती, तो तुम देखते नहीं.’

‘ठीक हूँ,’ असं सांगून मी तिला पैसे दिले. नंतर नंतर हे रोजच झालं. जवळपास वर्ष-दोन वर्षं सुरू होतं. आम्ही दररोज गप्पा मारत होतो. आता नोकरी बदलली आणि वेळही बदलली. त्यामुळे क्वचितच आमची भेट होते.

ती मूळची आंध्र प्रदेशची अन् नाव ईश्वरी! भेटली की, ती माझी आणि कुटुंबीयांची आवर्जून चौकशी करते. एक दिवस तिनं सांगितलं की, ‘आम्ही काही जणांनी मिळून आता दर गुरुवारी जिवदानीच्या पायऱ्यांजवळ गरीब निराधार वृद्धांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. कधी तरी नुसतेच येऊन जा.’ मी म्हणालो, ‘हो, येईन नक्की.’ अर्थात, माझं काही जाणं झालं नाही. शिवाय, विरार पश्चिमेला एका अनाथ आश्रमात ती महिन्यातून एकदा, पण दोनही वेळचं जेवण‍ देत होती.

साधारणपणे आठ एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिने जे काही सांगितलं, त्याने मी चकितच झालो. तिनं एका लहान मुलाचं पालकत्व स्वीकारलं अन् तेही कायदेशीररीत्या! हे पालकत्व घेतलं त्यावेळी ते अगदी दोन दिवसांचं अर्भक होतं. पण मला जेव्हा समजलं, तेव्हा तो मुलगा तीन वर्षांचा होता. (साधारणपणे आठ वर्षांपूर्वी)

ईश्वरीला लिहिता-वाचता येत नाही. पण ईश्वरीने पालकत्व घेतलेला मुलगा आंध्र प्रदेशातील एका शाळेत शिकतो. ईश्वरीने आपल्या आईकडे त्याची जबबादारी दिली होती. त्याचा वाढदिवसही जोरदार साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ईश्वरीने काहींना जेवण दिलं तर, स्त्रियांना साडी-चोळी दिली. असं काही ऐकल्यानंतर काही बोलायला शब्दच नसतात. या मुलाला मायेची ऊब देणाऱ्या ‘तिनं’ मनात खूप आदराचं स्थान निर्माण केलंय.

आता गेली तीन एक वर्षं झाली, ईश्वरीची फारशी भेट होत नाही. ऑफिसला सकाळी लवकर जात असल्याने तो योग जुळून येत नाही. केव्हातरी सुट्टीच्या दिवशी दुपारी ट्रेनने कुठे जायला निघालो तर, ती कधीतरी भेटते.


या ईश्वरीप्रमाणेच आणखी एक किन्नर परिचयाची झाली. विरारलाच भेट झाली. आता फार कमी भेटते.

या दोघींची खासियत अशी की, त्या शांतपणे समोर येऊन उभ्या राहतात. ‘जे दे उसका भला और जो ना दे उसका भी भला’ अशी त्यांची वृत्ती आहे. समोर आल्यानंतर हाती काही पडलं नाही तरी, आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला जातोच. दोन रुपयांचं नाणं दिलंत तर, इमानेइतबारे एक रुपया परत करतात. पाच रुपये दिले तर, चार रुपये परत करतात.

ही दुसरी किन्नर ग्रॅज्युएट आहे. दक्षिणेकडचीच आहे. भाऊ शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर. ‘आई आणि कुटुंबीय मला परत बोलावतात. पण मी अशी आहे, म्हणून परत जात नाही. त्यांना मी सांगितलं की, मी येणार नाही. माझं व्यवस्थित चाललंय,’ असं तिनं एकदा सांगितलं होतं.

रविवारी लोकलमध्ये नियमित प्रवासी नसतात. दुपारच्या वेळेस गाडीत अनेक जण जिवदानी देवीचं दर्शन घेऊन परत जाणारे असतात. त्यामुळे ही किन्नर डब्यात शिरल्यावर पहिल्यांदा ही गाडी कुठून कुठे जाणार आहे, कुठल्या स्थानकांवर थांबणार आहे, याची ओरडून माहिती देते आणि नंतर पैसे मागते.

आपल्या समोर येणारे किन्नर असेही असू शकतात, हा विचार अनेकदा आपल्या मनाला शिवत देखील नाही. ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ असं म्हटलं जातं. पण अशा किन्नरांच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणता येईल – ‘दिसतं तसं नसतं’!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!