संगीता भिडे (कमल महाबळ)
साधारण 1982-83 साल असावं, तेव्हाची ही घटना… अजूनही आठवली तरी अंगावर भीतीने अंगावर काटा येतो. आम्ही नुकतीच नवीन स्कूटर घेतली होती. जरा लांबची सफर करावी, या उद्देशानं आम्ही उभयतां ठाण्याहून डोंबिवलीला माझ्या आत्येभावाकडे गेलो. सबंध दिवस त्याच्याकडेच मुक्कामाला होतो. संध्याकाळी निघायला जरा उशीरच झाला. तारुण्याचा जोश होता, मस्ती होती. स्कूटर जरा वेगातच होती. साधारण, मुंब्रा-कळवा यांच्यामध्ये असू… भोवताली मिट्ट काळोख… लोकवस्तीही अगदी तुरळकच… स्कूटरच्या हेडलाइटच्या प्रकाशातच मार्गक्रमण सुरू होते. रस्ता पूर्णत: खडबडीत, कोणास ठाऊक कशी पण स्कूटर जोरात हिसका बसून रस्त्यावरून घसरली. आम्ही उभयतां दूरवर फेकले गेलो. मी सावध होते, पण मुका मार लागला होता. तशीच धडपडत उठले, ‘ह्यां’चा शोध घेऊ लागले, लक्षात आलं, नवरा बेसावध होऊन पडला आहे गुडघे, हाताची कोपरं रक्तबंबाळ झाली आहेत. जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. पण आसपास चिटपाखरूही नव्हते. माझी हतबलता वाढत होती. माझं सारं अवसान गळून पडणार, अशी भीती वाटू लागली.
…आणि अचानक गचकन ब्रेक मारून एक रिक्षा माझ्यापाशी थांबली. रिक्षावाला आणि आतील एक प्रवासी माझ्यापाशी येऊन थांबले, सहज दोघांकडे नजर टाकली. भीतीनं अंग थरथरलं. दोघांचंही एकूण रंग-रूप असं की, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण वाटू लागलं. पण माझ्याजवळ त्या क्षणी अन्य पर्यायही नव्हता. ‘आम्हाला कोणत्याही जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्याल का?’ माझी अगतिक विनवणी… “ताई, घाबरू नका, आम्ही नेतो तुम्हाला.” त्यांच्या ‘ताई’ या शब्दानं मलाही जरा धीर आला.
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
त्या दोघांनी नवऱ्याला उचलून रिक्षांत ठेवले. शेजारी मी स्वतःच्या अब्रूसकट जवळच्या धन- कांचनाची भीती अख्ख्या तन-मनाला व्यापून राहिली. डोळे मिटून देवाचा धावा केला. (मी निरीश्वरवादी असूनही मला ‘देव’ आठवला, हे विशेष) त्या भयाण क्षणीही मनातच हसू उमटलं. त्या दोघांनी अत्यंत सुखरूपपणे आम्हाला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवले. मी दोघांना मनापासून धन्यवाद दिले.
सुदैवाने तेथील एक डॉक्टर अगदी निकट परिचयाचे निघाले. त्यामुळे पंचनामा – चौकशी इत्यादी सोपस्कारांना सामोरं जावं लागलं नाही, त्याच दोघांनी आमच्या अपघाताची वार्ता घरी कळवली. ताबडतोब शेजारची मंडळी मदतीला धावून आली.
रस्त्यावर पडलेली स्कूटर त्याच दोघांनी घरी आणून दिली. इतकंच नाही तर, दर दोन दिवसांनी ती दोघं आमच्या तब्येतीची चौकशी करायाला भेटायला येत होती. आमच्या पांढरपेशा मनात मात्र ‘हे दोघं आता अवाजवी पैशांची मागणी करणार बहुदा’ हे दडपण. एक दिवस ते असेच चौकशी करायला घरी आले. त्यांच्यासाठी मी चहा-पाणी केले आणि त्यांच्या हातात पैशाचं पाकिट दिलं, पण त्यांनी ते साफ नाकारले, आणि मलाच म्हणाले, “भाऊ कधी पैशाच्या आशेने बहिणीला मदत करतो का?” मी अवाक्!
हेही वाचा – संस्कार आणि स्त्रिया
मनुष्य स्वभावाचा अंदाज कधीकधी सपशेल चुकतो, तो असा. मलाच माझी लाज वाटली, डोळ्यांत पाणी तरळलं आणि मी ते पाकिट त्यांना पुन्हा देत – ‘ठीक आहे, मला माझ्या छोट्या भाचरांसाठी ही भेट द्यायची आहे. त्यांना सांगा, आत्याने खाऊ दिला म्हणून…’ मग त्यांनीही ही भेट आनंदाने स्वीकारली.
त्यानंतर मात्र हे दोघे भाऊ मला कधीच भेटले नाहीत, मला मात्र प्रत्येक रक्षाबंधनाला त्यांची आठवण येतेच येते… देवदूतासारखे आलेले हे भाऊ आम्हाला भेटलेच नसते तर?