सतीश बर्वे
आज अचानक सदा आठवला. खरंतर, काही कारण देखील नव्हतं. सदा म्हणजे दापोलीला माझ्या मित्राच्या मूळ घरी गाईम्हशींचा गोठा सांभाळणारा. गेल्यावर्षी माझा तरुण मित्र मंदार मला हट्टाने दापोलीला घेऊन गेला होता चार दिवस विश्रांतीसाठी. तिथे पहिल्यांदाच भेटला सदा. साधारण चाळीशीच्या आसपास असणारा युवक. गुडघ्यापर्यंत लांब असलेली ढगळ अर्धी चड्डी आणि टीशर्ट घालून… गाडीतून उतरल्या उतरल्या मला पहिलं कोण सामोरे गेले असेल तर तो सदा होता.
“नमस्कार दादानू…”
मला आणि मंदारला हात जोडून नमस्कार केला त्याने.
“मोठे दादा सकाळीच बोलले तुम्ही येताय असं, तेव्हापासून सडकेवर कानोसा घेत होतो तुमच्या गाडीचा…”
सदा आमच्या बॅगा घेऊन आत गेला. मी ओसरीवरच्या ऐसपैस झोपाळ्यावर क्षणभर बसलो. जाडजूड शिसवी झोपाळा आणि त्याच्या मजबूत कड्या या घरात वाढलेल्या पिढ्यांचे जणू प्रतिनिधीत्व करत होत्या. प्रवासात दमल्याने त्या रात्री पडल्यापडल्या झोप लागली. पण पहाटेच जाग आली ती गाईम्हशींच्या पावलांच्या आणि त्यांच्या गळ्यातील हलणाऱ्या घंटांच्या आवाजाने. मी हळूच खोलीचा दरवाजा उघडून मागच्या पडवीत गेलो. सदू गाई म्हशींना चरायला घेऊन चालला होता.
हेही वाचा – मातृत्वाची दिवाळी!
मला बघताच म्हणाला, “दादानू येता का संगती?” माझ्या उत्तराची वाट न बघता त्याने त्याच्या चपला काढून माझ्यासमोर ठेवल्या. “या घाला. मी येईन अनवाणी पायांनी. सवय झाली आहे पायांना माझ्या.”
सदाच्या देण्याच्या सवयीचा हा पहिला प्रसंग मी बघितला. पुढे गाईम्हशी आणि मागे आम्ही दोघे कधी गप्पांत रंगून गेलो ते माझं मलाच कळलं नाही.
“मोठे दादा सांगत होते परवा की, तुम्ही लेखक आहात म्हणून.”
“अरे, आजवर जगताना आलेले अनुभव आणि भेटलेली माणसं यांचा आधार घेऊन फेसबुकवर लिहित असतो मी “.
“ते तुमचं फेसबुक बीसबुक काही माहिती नाही मला. अनाडी माणूस मी. मजुरी करणारे मायबाप अपघातात गेल्यावर गावच्या संरपंचाने मला आजोबांच्या स्वाधीन केलं आणि तेव्हापासून मी या घरचा झालो. आजीआजोबा दोघेही प्रेमळ. इथे राहून मी आणि माझी भाषा दोन्ही गोष्टी सुधारल्या. सगळी कामं मी शिकलो. पण मन रमलं ते गोठ्यात. लई जीव लावला जनावरांनी. आता हाच गोठा माझं गोकूळ आहे आणि मी इथला कृष्ण!”
सदाच्या बोलण्यातून त्याचा जगण्यातला साधेपणा आणि सच्चाई झिरपत होती. शहरातील धकाधकीच्या आणि टेक्नोसॅव्ही जगापासून कोसो दूर होता सदा…
“तू सुखी आहेस का रे सदा?” मी नकळत विचारून गेलो, पण त्यानं दिलेल्या उत्तराने खजील झालो. त्याच्या आयुष्याच्या शांतपणे वाहणाऱ्या नदीत उगाचच प्रश्नाचा खडा टाकून विनाकारण तवंग आणला होता मी.
सदा मला म्हणाला, “दादानू, सुख हे मानण्यावर असतं. तुम्हाला जगण्यासाठी नेमकं काय आणि किती हवंय ते समजायला पाहिजे. नाहीतर, तुम्ही शहरातील माणसं अवतीभवती बघून सगळ्याच गोष्टींना सुख मानण्याचा उगाच हट्ट करता आणि ते मिळवण्यासाठी आयुष्य जगायचंच विसरून जाता. भूक भागेल एवढं पोटाला जेवण, अंग झाकायला कपडे एवढं पुरेसे आहे माझ्यासाठी. या घरात काम करू तेवढं कमीच आहे. हेच माझे पंढरपूर आहे आणि इथे मिळणारी माणुसकी माझा विठोबा आहे. मी आलो पहिल्यांदा तेव्हापासून आजपर्यंत या घराने मला माझं परकेपण आणि वेगळेपण कधीच जाणवू दिले नाही. फार जीव लावला इथल्या प्रत्येकाने. आणखी काय हवं असतं जगण्यासाठी!”
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
“तुम्ही शहरातील माणसं झोपडीच्या आकाराच्या सुखाला वाढवत वाढवत आकाशाएवढं करून बसलात आणि ते मिळवण्यासाठी घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे आयुष्य जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात. जो तो धावतोय पैसा कमवायला. पण तो खर्च करायला पुरेसा वेळ सापडत नाही त्याला. शरीराला यंत्र केलंय तुम्ही. पण ते चालवायला आरोग्याचं वंगण लागतं, हे मात्र तुमच्या नकळत तुम्ही विसरला आहात. मग काय लहान वयात आजारपणं आणि औषधं सुरू होतात आणि श्वास शाबूत ठेवण्यासाठी जीवघेणी धडपड. स्वतःला काय हवं आहे, ते बघण्यापेक्षा माझ्या भोवतीच्या जगात मी मोठेपणा मिळवून सगळ्यांच्या नजरेत कसा राहिन, याचा प्रयत्न असतो तुमचा सतत… आता आला आहात इथे तर शहरातील आयुष्य विसरून जा आणि नव्याने जगायला शिका तुम्हाला नेमकं काय हवंय त्याचा शोध घेत.”
एव्हाना बोलत बोलत आम्ही एका झाडाभोवती बांधलेल्या पारा जवळ थांबलो.
“दादानू बसा आता. दमला असाल. खूप चालणं झालंय तुमचं.”
मला माझं घाम गाळण्यासाठी रोजचं मॉर्निंग वॉक आठवलं. सदाबरोबर इतकं चाललो पण तरीही खरंच बिलकुल थकवा जाणवला नाही. कारण काहीतरी मिळवण्यासाठी मी चालत नव्हतो.
“हे घ्या,” असं म्हणून सदाने माझ्या पुढ्यात भाकरी आणि लसणाची चटणी ठेवली. ही माझी न्याहरी असते रोजची. आज दोघे वाटून खाऊ. कालची आहे भाकरी पण आज जास्त खुसखुशीत लागेल. मोठ्या वहिनी न विसरता देतात मला रात्रीच डब्यात घालून. तुम्ही येणार माहीत असतं तर दोन चार भाकऱ्या जास्त घेतल्या असत्या मी…”.
समोरच्या विस्तीर्ण पठारावर गाईम्हशी शांतपणे चरत होत्या. सदाने आणलेली भाकरी आणि लसणाची चटणी स्विगी आणि झोमॅटोचा मनुष्य प्लॅस्टिकच्या बंद डब्यातून घरी आणून देणाऱ्या पदार्थांपेक्षा कैक पटीने चविष्ट होती येवढं नक्की. भाकरी खाऊन झाल्यावर आम्ही परत यायला निघालो आणि माझ्या डोक्यात सदाचं बोलणं फिरत होते. सदा म्हणतो त्यात तथ्य होते. शहरात शाळेत दाखल होण्यापासून त्या पुढील आयुष्यात पावलापावलांवर आपण जगण्यासाठी फक्त तडजोडी करत येतो. कारण अनावश्यक सुखसमृद्धीच्या हव्यासापोटी जगण्याच्या त्या अभेद्य चक्रात आपण स्वत:हून अडकवून घेतलं आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला तरी अशक्यच आहे.
मला शांत बघून सदा मला म्हणाला, “दादानू माझ्या बोलण्याचा नका येवढा विचार करू. कारण त्याचा काही उपयोग नाहीये. इथे आहात तोवर माणूस म्हणून मनासारखं जगून घ्या. घरी गेल्यावर परत तुम्हाला गुलामगिरीच्या जोखडात बांधून घ्यायचं आहे. तुमच्या आयुष्याला तुम्हीच परिस्थितीचा गुलाम बनवलं आहे आणि त्यातच तुमचा शेवट आहे.”
सदा त्याच्या मनांतील मळमळ बोलून गेला आणि त्यातला काळजाला जाऊन भिडणारा सच्चेपणा जाणवून मी निःशब्द झालो.
आमच्या परतीच्या प्रवासात मी गप्पच होतो. मंदारनं मला त्याबद्दल खोदून खोदून विचारले, पण मी त्याला काहीच उत्तर देऊ शकलो नाही. डोळ्यांसमोर सतत येत होता तो साधा सरळ सदा आणि त्याचं तितकंच सच्चं आणि निरागस बोलणं…


