दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 10 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 31 मे 2025
वार : शनिवार
तिथि : पंचमी 20:15
नक्षत्र : पुष्य 21:06
योग : वृद्धी 10:42
करण : बव 8:42
सूर्य : वृषभ
चंद्र : कर्क
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:11
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या गावात माणकोजी आणि सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेरावांशी झाला. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासर्यांचा मोठा विश्वास होता. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासर्यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. सासर्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली. तथापि, मालेराव यांच्या अकाली निधनामुळे अहिल्याबाई यांनी 1754 ते 1795 या काळात इंदूर संस्थानची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवालयांचे जीर्णोद्धार, न्याय तसेच राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था आदींबाबत त्यांचा लौकिक होता. इंदूर शहराची भरभराट अहिल्याबाईंनीच केली. अशा या कर्तृत्ववान राज्यकर्त्या अहिल्याबाई यांचे 13 ऑगस्ट 1795 रोजी निधन झाले.
फास्टरफेणेचे जनक भा. रा. भागवत
मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत यांचा जन्म 31 मे 1910 रोजी इंदूरमध्ये निरीश्वरवादी सुधारणावादी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भागवत हे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते. भा. रा. भागवत यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंबऱ्या, विज्ञानकथा लिहिल्या. त्यांनी 184हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात 49 कथासंग्रह, 100 कादंबऱ्या, 4 चरित्रे आणि 32हून अधिक अन्य पुस्तकांचा समावेश आहे. ‘फास्टर फेणे’ ही पुस्तक-शृंखला तुफान लोकप्रिय झाली. बनेश फेणे ऊर्फ फास्टर फेणे हे यातील मुख्य काल्पनिक नायक आहे. आजही कुमार वाचक फास्टर फेणेचे फॅन आहेत. भागवतांनी 1930च्या दशकापासून पत्रकारिताही सुरू केली. 1975 सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. 27 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांचे निधन झाले.