दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 9 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 30 मे 2025
वार : शुक्रवार
तिथि : चतुर्थी 21:22
नक्षत्र : पुनर्वसु 21:28
योग : गंड 12:56
करण : वणिज 10:14
सूर्य : वृषभ
चंद्र : मिथुन 15:42
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:11
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे 1894 रोजी झाला. गोव्यातील पहिले इतिहास संशोधक म्हणून डॉ. पिसुर्लेकर यांची ओळख आहे. त्यांची या क्षेत्रातील सुरुवात गोव्याच्या पुराभिलेखागारातून झाली. पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक दस्तऐवज भारतीय पुराभिलेख विभागात जमा करण्यात पिसुर्लेकर यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. पोर्तुगीज दफ्तरात असलेली साडेचारशे वर्षांतील सर्व कागदपत्रे त्यांनी अभ्यासली. त्याच आधारे त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला. फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रजी, मराठी अशा चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. पिसुर्लेकर यांनी ‘विविध ज्ञान विस्तारा’त 1917मध्ये पहिला मराठीवरील लेख लिहिला. कृष्णदास श्यामांचा मराठी ग्रंथ संपादित करून गोव्याचा आद्य ग्रंथकार मराठीच होता, हे सिद्ध केले. 10 जुलै 1969 रोजी डॉ. पिसुर्लेकर यांचे निधन झाले.
संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण जोशी
नारायण मल्हार जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 5 जून 1879 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे झाला. 1911मध्ये त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापन केली. 1955पर्यंत ते या संस्थेशी निगडित होते. दरम्यानच्या काळात त्यांनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले. मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग त्यांनी चालविले. 1921 साली त्यांनी कामगार समाचार हे मराठी साप्ताहिक सुरू केले. 31 ऑक्टोबर 1920 रोजी ‘अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) या भारतातील पहिल्या कामगार संघटना स्थापनेत त्यांचे योगदान आहे. कालांतराने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी स्वतंत्र संघटना उभी केली. 1933मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ या संघटनेत विलीन करण्यात आली. त्यानंतर नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. अनेक कामगार कल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशी यांनाच आहे. 30 मे 1955 रोजी नारायण जोशी यांचे निधन झाले.
गोवा राज्य दिन
पोर्तुगीज आरमाराचा उपनौदलप्रमुख अल्फोन्सो डी अल्बुकर्कने विजापूरच्या आदिल शाहचा पराभव करून गोव्याचा प्रदेश जिंकला. त्यानंतर पुढील 400 वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर हा प्रदेश देण्याची विनंती भारत सरकारने केली, परंतु पोर्तुगीजांनी त्यास नकार दिला. म्हणूनच, भारत सरकारने 1961मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले, ज्यामध्ये दमण आणि दीव बेटे तसेच गोवा भारतीय मुख्य भूमीत समाविष्ट करण्यात आले. त्याद्वारे गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचा अंत झाला. 1987मध्ये दमण आणि दीवसह गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. तर, 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ते भारतीय प्रजासत्ताकाचे 25वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. पणजीला गोव्याची राजधानी तर, कोकणी ही अधिकृत भाषा घोषित करण्यात आली. तोपर्यंत गोवा हा दमण आणि दीवसह केंद्रशासित प्रदेश होता.