दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 फेब्रुवारी 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 07 फाल्गुन शके 1947; तिथि : दशमी 24:33; नक्षत्र : मार्गशीर्ष 12:11
- योग : प्रीति 22:33; करण : तैतिल 13:36
- सूर्य : कुंभ; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 07:01; सूर्यास्त : 18:42
- पक्ष : शुक्ल; मास : फाल्गुन; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नवीन काम मिळण्याचीही दाट शक्यता आहे. परदेशी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला हायड्रेट ठेवा.
वृषभ – नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या कामामुळे तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नोकरीत आपले काम समर्पणाने पूर्ण केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल. उन्हात फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
मिथुन – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. ज्या जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला आत्मविश्वास वाटतो त्याच जबाबदाऱ्या स्वीकारा. दिवसाच्या सुरुवातीला व्यावसायिकांना काही अडचणी येऊ शकतात, परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी परिस्थिती सुधारेल. रागावर ताबा ठेवा, अन्यथा अनावश्यक अडचणी निर्माण होतील.
कर्क – आजच्या दिवशी कारकिर्दीत काही अडचणी येऊ शकतात. काही योजना बिघडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. तुमचे प्लॅन्स काय आहेत, याची कोणालाही माहिती देऊ नका. यामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशावेळी ध्यान धारणा करा. विद्यार्थ्यांनी आपण बरे आणि आपले काम बरे, अशी वृत्ती ठेवावी.
सिंह – आज ऑफिसमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. धीर धरा आणि कठोर शब्द टाळा. व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यावर तातडीने पावले उचलण्याची गरज असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. प्राणायाम केल्याने मानसिकदृष्ट्या शांतता लाभेल.
कन्या – व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील, मात्र काही कारणांनी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात नाते मजबूत करण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत डेट प्लॅन करू शकता. संध्याकाळ त्यामुळे आनंदात जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष परिश्रम करण्याची गरज असेल.
तुळ – आज आर्थिक स्थिती सरासरी असेल आणि नफ्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असेल. सहकाऱ्यांकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. त्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देताना संयम ठेवा, परिस्थिती आणखी बिघडू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या.
हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…
वृश्चिक – आजचा दिवस पैशासाठी आणि आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमच्या कौशल्याचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी तसेच काहीतरी गुंतवणूक करण्यासाठी आज योग्य दिवस आहे. नोकरी करणाऱ्यांना जातकांना कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकेल. आज बाहेरचे खाणे टाळावे, त्रास होण्याची शक्यता आहे.
धनु – दिवसाच्या सुरुवातीला करिअरमध्ये संघर्ष करावा लागेल. कामाचा ताण तीव्र असेल. नोकरी बदलण्याचीही शक्यता जास्त आहे. व्यावसायिक त्यांचे कामाचे क्षेत्र बदलण्याचा विचार करत असतील, मात्र त्यासाठी सध्याचा काळ अनुकूल नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. उन्हाचा त्रास होऊ शकतो.
मकर – आज मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जीवनात समस्या या येणारच, पण म्हणून हार मानू नका आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आज जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष परिश्रम करण्याची गरज आहे. डोळ्यांची काळजी घ्या.
कुंभ – आज उत्पादकता नेहमीपेक्षा कमी असेल, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे ठरवलेल्या योजना पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. मात्र सध्या संयमी राहणे आवश्यक आहे. आज ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या, हलका आहार घ्या. बाहेरचे अन्न टाळा.
मीन – व्यवसायिकांनी खर्चाबाबत सावधगिरी बाळगावी. जोडीदाराशी वाद घालणे टाळा, कारण परिस्थिती गंभीर होऊ शकते. आज उन्हाळी सुट्टीतील प्रवासाचे नियोजन देखील केले जाऊ शकते. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढू नये, म्हणून योग्य नियोजन करा. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी, अन्यथा अभ्यासावर विपरित परिणाम होईल. आज पचनाची समस्या उद्भवू शकते. शक्य असल्यास लंघन करावे.
दिनविशेष
देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक वि. दा. सावरकर
टीम अवांतर
सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते, देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला. विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इत्यादी साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते.
1899 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले. मात्र प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी 1900 मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे 1904 मध्ये या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संस्थेत झाले.
एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी 1906 मध्ये सावरकर भारतातून निघाले. लंडनमध्ये असताना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र आणि राजकारण हा ग्रंथ अनुवादित केला. 1857 चे भारतीय स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचे हस्तलिखितही त्यांनी पूर्ण केले. ब्रिटिश सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याने 13 मार्च 1910 रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकूपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. मात्र त्यांना तिथे अटक करण्यात आली. पुढे सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली.
हेही वाचा – गोरख गडाबद्दल प्रेम अन् भीतीसुद्धा!
सावरकरांना जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमानात 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले. तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. 1921 मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व, माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील आणि पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत, या दोन अटींवर 1924 मध्ये सावरकरांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.
सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. शिवाय ‘मला काय त्याचे? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड, काळे पाणी या दोन कादंबऱ्या. उःशाप, संन्यस्त खड्ग आणि उत्तरक्रिया ही त्यांनी लिहिलेली नाटके देखील प्रसिद्ध आहेत.
मुंबई येथे 1938मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी यांचे महत्त्व सांगितले. वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. 1943 मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले.


