भाऊ काळकर
कल्याण रेल्वेचे देशातील पहिले जंक्शन. इथूनच दक्षिणेकडे आणि उत्तर दिशेला रेल्वेमार्ग फुटतात. सतत गाड्यांची ये-जा सुरू असते. रात्रंदिवस प्रवांशांच्या वर्दळीमुळे गजबजलेले. तो पोरका जीव कल्याण स्टेशनवर उतरला आणि तिथेच रमला. सकाळच्या गाड्यांमध्ये ‘दातून’ म्हणजेच कडुनिंबाच्या काड्या विकायचा. पाण्याच्या बाटल्या गोळा करायचा. दुपारच्या गाड्यांमध्ये गोळा केलेल्या बाटल्यांमध्ये फलाटावरच्या कुलरमधील पाणी भरून विकायचा. उन्हं कलल्यावर कडुनिंबाच्या झाडावर चढून फांदी तोडायचा, दुसऱ्या दिवसासाठी दातूनच्या काड्यांचा गठ्ठा तयार करायचा. पण यातूनच जे कमवायचा त्यातून ‘राजा’नं जवळच्या बँकेत पैसे साठवू लागला.
ती कुर्ल्याला झोपडपट्टीत रहायची. शिक्षणाचा गंध नव्हता. तिची आई लोकलमध्ये बायकांसाठी पिना, रबरबॅण्ड आदी सामान विकायची. जणूकाही चालता-बोलता मॉलच होता. ती आईबरोबर जायची. लोकलमध्ये अनेक भाषा शिकली. ती स्वतंत्रपणे महिलांच्या डब्यातून वस्तू विकू लागली. तिला बायका ‘सखी’ म्हणू लागल्या. ओळखीच्या बायकांना संध्याकाळी परतताना ती निवडलेल्या भाज्या देऊ लागली. तिचा छान जम बसला… चार पैसे हातात खेळू लागले.
हेही वाचा – उकितामो आणि आरीगातो
उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची 12.05 वाजताची कल्याण लोकल पाच नंबर फलाटावर येत होती. सखी उतरण्याच्या तयारीत दाराशी उभी होती. गाडी थांबली आणि सखी भोवळ येऊन फलाटावर पडली. राजा समोरच उभा होता, त्याने तिच्या तोंडावर पाणी मारले, तिला पाणी पाजले. तिने त्याचे आभार मानले. त्यांची ओळख झाली आणि प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. त्यांनी घाटकोपरला जागा घेतली. कुंभमेळयात त्याने दातून विकून लाखोंची कमाई केली. त्यांचा संसार आनंदात चालला होता. राजाला प्रथमच आयुष्यात प्रेम मिळाल होतं. तो सखीला खूप जपायचा. पावसाचे दिवस होते, पुढचा डबा पकडताना सखी घसरली आणि चालत्या गाडीखाली आली. राजाच्या पायाखालची जमीन सरकली, धाय मोकलून रडला. स्मशानात प्रेत आणलं, अग्नी दिला. चिता चहूबाजूने पेटली. बरोबरीचे लोक पांगले. हा एकटक चितेकडे बघत होता. अचानक तो तीरासारखा धावला आणि स्वतःला चितेत झोकून दिले. तो सखीबरोबर अनंताच्या यात्रेला निघून गेला.
पती निधनानंतर मागच्या शतकापर्यंत पतीच्या शवाबरोबर स्वतः चितेवर जाणाऱ्या स्त्रियांना सती म्हणत. ही प्रथा कायद्याने बंद झाली. पण पत्नीच्या चितेवर स्वतःला झोकून देणारा राजा अपवादात्मकच! त्याच्या या कृत्याला काय संबोधावे? याला शब्दच नाहीत!
हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट
(1975 ते 1980च्या दरम्यान मुंबईत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित)