Friday, February 6, 2026

banner 468x60

Homeललितआत्महत्या… शेतकऱ्याची अगतिकता!

आत्महत्या… शेतकऱ्याची अगतिकता!

चंद्रकांत पाटील

आमच्या गावाच्या दोन्ही बाजूने नदी वाहते आणि तिसर्‍या बाजूला ओढा आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की, त्या ओढ्यातून पाणी मागे जाते आणि सगळ्या गावाला वेढा बसतो. गावातून बाहेर जाता येत नाही. पाटील भावकीच्या सगळ्या जमिनी ओढ्याच्या काठावर आहेत. पूर आला की, ऊस पाण्याखाली जातो… पाणी जास्त दिवस राहिले की, उसाचे भरपूर नुकसान होते आणि शेतकरी आणखी नुकसानात जातो. त्यामुळे दरवर्षी एखादा तरी शेतकरी कर्जामुळे आपले जीवन संपवितो!

सुभानराव पाटलांची बहीण साताऱ्यात राहात होती… तिचे मिस्टर पीएसआय होते. त्यांना दोन मुली… थोरली शकू आणि दुसरी शेवंता. शकू दिसायला छान आणि चारचौघीत उठून दिसणारी होती. ती मामाची आणि आजीची खूपच लाडकी… त्यामुळे पाचवीपर्यंत शाळेला आजोळी, म्हणजे आमच्या गावातच होती. पुढे शिक्षणासाठी वडिलांनी तिला सातारला आपल्या घरी नेली.

आता ती बारावी कॉर्मस करत होती. पलीकडच्या वाड्यातली रेखा पाटील ही तिची खास मैत्रीण. मग ती सुट्टीला आली की, बर्‍याच वेळा रेखाच्या घरीच असे. यावेळी पण असंच झालं, ती सुट्टीला म्हणून आली आणि लॉकडाऊन लागलं. त्यामुळे ती इथेच अडकून पडली. दिवसातला बराच वेळ ती रेखाच्या घरीच असे. रेखाच्या घरी तिची आई, शेतकरी वडील आणि दोन भाऊ – थोरला सुरेश तर, धाकटा अनिल दहावीला होता – आणि रेखा गावातच बारावी करत होती. सर्व गाड्या, वाहने बंद पडल्यामुळे शकूला मामाकडे राहावे लागत होते.

रेखाचा थोरला भाऊ सुरेशने बारावीनंतर शाळा सोडली होती आणि शेती करत होता. जरी तो शेती करत असला तरी देखणा आणि भारदस्त होता. सुरेशचा मळा आणि शकूच्या मामांचा मळा जवळ जवळ होता. शकू मळ्यात आली की, आंबे, पपई काढण्यासाठी सुरेशला बोलावत असे. सुरेश पण आपल्या मळ्यातील चिकू, पेरू काढून शकूला देत असे. सुरेशच्या मळ्यात पाटाच्या कडेला जाईजुई, गुलाब, सोनचाफ्याची झाडे होती; त्यांचा सुंगध सगळ्या मळ्यात दरवळत असे… दुपारी सुरेशचे जेवण घेऊन रेखा मळ्यात येत असे, बरोबर शकूपण असे. जेवणात भाकरी, दही, खर्डा, झुणका, तेल, चटणी असा गावरान बेत असे. मग ते तिघे एकत्र बसून जेवत असत. शकूला हे जेवण आणि वातावरण खूप आवडे आणि ते दिवसभर धमाल करत असत.

इकडे लोकाना लॉकडाऊनमुळे अवघडल्यासारखं झालं होतं आणि केव्हा एकदा सर्व सुरळीत चालू होतंय असं झालं होतं. याउलट शकूला लॉकडाऊन कधीच संपू नये, असं वाटत होतं. इतकी मजा तिला येत होती. रेखाची आई शकू घरी आली की, तिची चेष्टा करीत असे… तिला सूनबाई म्हणून चिडवित असे! त्याचबरोबर तिचे लाड पण करीत असे… तिला चहा, लाडू खायला देत असे. अर्थात, शकूने कधी सुरेशकडे त्या अर्थाने बघितले नव्हते. पण हल्ली जरा जास्तीच भेटणं व्हायला लागलं आणि तारुण्यसुलभ भावना उचंबळायला लागल्या… सारखं सुरेशबरोबर बोलावं, बसावं वाटायला लागलं… एक दिवस तिला कळून चुकलं की, आपल्याला सुरेश आवडायला लागला आहे!

हेही वाचा – बहुरुपी गुलब्या

सुरेशलाही ‘इशारों पे इशारे’ यायला लागले आणि प्रेमकहाणी सुरू झाली… सुरुवातीला सुरेशला माहीत होते की, ही शिकलेली मुलगी आहे… पण नंतर नंतर तोही अडकत चालला. सुरेशच्या विहिरीवर एक भले मोठे आंब्याचे झाड होते, उन्हाळ्यात त्याच्या गर्द सावलीत छान वाटे. आंबा मोहरानी भरला होता. त्याचा सुगंध सगळ्या शिवारात दरवळत होता. त्याच्या भोवती पारासारखा कट्टा होता त्याच्यावर बसून गडीमाणसे गप्पा मारीत, जेवण करीत. पुढे याच  आंब्याच्या आडव्या फांदीला या मुलींसाठी एक मोठा झोपाळा सुरेशने बांधला होता. तिथे खेळण्यासाठी शकू आणि रेखा येत असत. काही वेळा शकू एकटी येत असे…

असेच एका भेटीत सुरेशला शकूने सांगितले की, “मला तू आवडतोस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे.” त्यावर सुरेश म्हणाला, “मलाही तू आवडतेस, पण मी शेतकरी आहे आणि तुझ्या घरच्यांना हे आवडेल का?”  त्यावर ती म्हणाली “हो, हे खरं आहे! पण काहीतरी करायला हवं… नाहीतर शेवटी पळून जाऊ!  मला मात्र तुझ्याशिवाय जगता येणार नाही.”

हळूहळू तिचा वावर स्वयंपाकघरापर्यत वाढला, ती आपलंच घर समजायला लागली… घरात रेखाच्या आईला मदत करू लागली आणि खरी स्टोरी रेखाच्या घरी समजली. त्यांनाही आनंद वाटला, कारण सुरेशचं लग्न करायंचच होतं आणि शकूतर आधीच आवडली होती!

हळूहळू दिवस सरत होते… सगळी वाहने बंद होती… लॉकडाऊन वाढला होता. अचानक एक दिवस शकूचे वडील पोलीस गाडी घेऊन सांगलीला आँफिसच्या कामासाठी आले होते आणि जाताना शकूला घेऊन जाण्यासाठी गावाकडे आले…. शकूची पंचाईत झाली. नाईलाजाने ती सातारला गेली. सुरेश आणि सुरेशच्या घरचे लोक खूप नाराज झाले.

दिवसामागून दिवस जात होते. शकू फोनवरून सुरेशच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. हळूहळू वातावरण बदलले पावसाची चाहूल लागली. शेतीच्या कामाला वेग आला. यंदा पाऊस सुरुवातीपासूनच चांगला होता. पेरण्या व्यवस्थित झाल्या होत्या. त्यामुळे सुरेश खूश होता. सुरेशची शेतीही यंदा जोरात होती. मळीला लावलेला दोन एकर ऊस फोफावत आला होता. यंदाच्या उसामुळे घरासाठी काढलेले कर्ज मिटणार होतं.

इकडे शकू लपूनछपून बर्‍याच वेळा फोनवर सुरेशशी बोलत असायची… पण शेवटी एक दिवस हे सगळं आईला कळालं! सुरेश आणि फॅमिलीबद्दल तिला माहीत होतेच. पण मुलगा शेतकरी असल्यामुळे तिचं मन तयार नव्हतं. त्यातच, शकूच्या वडिलांना क्लास वन ऑफिसरच जावई म्हणून हवा होता! ते या गोष्टीवर तडजोड करतील, असे वाटत नव्हते. शकूच्या आईने हळूहळू शकूची कहाणी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात हा विषय होताच… गेल्या महिन्यांत नवीन आलेला पीएसआय विजय त्यांना आवडला होता. त्याने एकदा घरी आल्यावर शकूला पाहिली होती, त्यालाही ती आवडली होती. पण शकूच्या वडिलांनीच क्लिरन्स दिला नव्हता. पण हे प्रकरण लक्षात आल्यावर त्यांनी या गोष्टीला वेग दिला.

शकूच्या वडिलांनी लॉकडाऊन उठण्याची वाट पाहिली, पण लॉकडाऊन पुढे वाढला आणि ‘यादी पे शादी’चा निर्णय घ्यायची वेळ आली. पावसाचा जोर वाढू लागला आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. पावसाळ्याचे दिवस असल्याने लवकरात लवकर लग्न करणेचे गरज होते, म्हणून ते पाऊस थांबायची वाट पाहत होते.

पण कोयनेच्या पट्ट्यात पाऊस थांबत नव्हता. नदीला मोठा पूर आला बघता गावात पाणी आले, एका रात्रीत गावाला वेढा पडला. गावाच्या आसपासची शेती पाण्याखाली आली. गावाचा संपर्क तुटला… एक-दोन दिवसांत पाऊस थांबेल, पाणी उतरेल, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. सुरेशचा फोफावलेला ऊस पाण्यात बुडून गेला. सुरेश अतिशय दु:खी झाला. सुरेशचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घराचे कर्ज फेडण्याचे स्वप्न पाण्यात बुडाले! त्यातच शकूचा रात्री फोन आला, “उद्या माझे लग्न आहे. तू ताबडतोब ये, आपण पळून जाऊ…” आणि फोन कट झाला.

हेही वाचा – एका लग्नाची पुढची गोष्ट…

सुरेश विचार करत होता कसे सातारला जायचे? गावाला पाण्याचा वेढा पडलेला. बाहेर पाऊस धो धो पडतो आहे. लॉकडाऊनमुळे सर्व वाहने बंद आहेत. आपण काहीही करू शकत नाही, या विचाराने सुरेशला प्रचंढ डिप्रेशन आले आणि सुरेशने अंथरूण धरले. पुढे आठवड्याभराने जरा परिस्थिती निवळली आणि एकदिवस सुरेश मळ्यात गेला… आंब्याच्या झाडाखाली कठड्यावर बसला तर, त्याला शकू झोपाळ्यावर झोका घेत घेत विचारते आहे, ‘सुरेश तू का आला नाहीस?’ असा भास झाला.

सुरेश अतिशय दु:खी झाला… पुरामुळे कर्जाचा डोंगर वाढला होता आणि शेतकरी असल्याने प्रेमातही असफल झालो… आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही, या विचाराने तो उठला झोपाळ्याचा दोर कापून गळ्यात अडकविला आणि त्याने शेवटचा झोका घेतला…

दुसऱ्या दिवशी पेपरात पहिल्या पानावर बातमी होती…

“पुराच्या नुकसानामुळे एका प्रगतीशील शेतकर्‍याची आत्महत्या!”

मोबाइल – 9881307856

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!