मानसी देशपांडे
“धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे…” प्रत्येक मुलीच्या वडिलांना ही ओळ ऐकताना डोळे पाणावत असतील. कन्यादानाचा क्षण म्हणजे वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीचे बालपण आणणारा क्षण असतो. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी यावर एक विचार मांडला आहे, “पिता आणि पती, एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडे. तरीही वाटतं, पती होणाऱ्या पुरुषाला पिता होणे जमेल का? कन्यादान करताना प्रत्येक पिता हा मुका का होत असावा? कदाचित तो जावयाला सांगू शकत नसेल की बाबा रे, माझ्या मुलीचा तू पतीच आहेस पण तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का?” किती हृदयस्पर्शी विचार आहे ना!!
आपल्याकडे नवदाम्पत्याला लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणतात, मुलगी ही तुमची असतेच, कारण ते नातं रक्ताचं असतं. पण तुमच्या कुटुंबात नव्याने आलेला सदस्य असतो तो म्हणजे जावई. व.पुं.नी या विचारात वडिलांची एक हळवी बाजू स्पष्ट केली आहे. कारण, कोणत्याही आई-वडिलांना जावई हा मुलाप्रमाणे असतो. जिथे एकुलत्या एक मुली असतात, त्या आई-वडिलांसाठी तर जावई म्हणजे दुसरा मुलगाच. मुलगी जशी झुळूक असते, सासरी प्रेमाचा गारवा पसरवते… तसंच जावईदेखील मुलाची उणीव भरून काढतात.
कसं असतं, प्रेम निर्माण व्हायला सहवासाची गरज जास्त असते. माणसाचं रंग, रूप बघण्यापेक्षा आंतरिक सौंदर्य नक्कीच बघावं. मुलींची चूक कुठे होते, त्या बाह्य रुपावर भाळतात. व.पु. हेच म्हणतात, “आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे…” मुलगा हा दिसायला काळा-सावळा जरी असला तरी तो कधीच जावई म्हणून वागणारा नसेल, आई-वडिलांना खंबीर आधार देणारा असेल तर तो खरा तिच्या आयुष्याचा जोडीदार. कन्यादानाच्या वेळी हातांवर पाणी घालताना जेव्हा वडिलांचा हात थरथरतो, ते त्याच्या नजरेत आल्यावर त्यांना जो मानसिक आधार देतो, त्यावेळी त्या वडिलांना वाटतं, आपल्याला परमेश्वराने जावयाच्या रुपात मुलगा दिला. म्हणून भाळण्यात मजा नसते, खरा कस लागतो तो सांभाळण्यात…
हल्ली समाजात आपण बघतो, उतारवयात आई-वडिलांना जावई मुलाप्रमाणे सांभाळतात. एवढंच कशाला, मी माझ्या घरातलं, माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण देते. माझे आजोबा दोन वर्षं सिरीयस होते, माझ्या आजी-आजोबांना मुलगा नसल्यामुळे त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची सर्व काळजी माझ्या काकांनी म्हणजेच त्यांच्या जावईबापूंनी घेतली. कसं असतं, प्रत्येक वय झालेल्या आई-वडिलांना वाटतं की, परावलंबित्व येऊ नये. चालतं-बोलतं परमेश्वराने घेऊन जावं, पण या गोष्टी आपल्या हातात असतात का? माझ्या आजोबांना कधीच जावयाच्या दारात मरण येऊ नये, असं वाटायचं; पण तुमची गात्रं थकली की, या गोष्टी बाजूला पडतात.
अहो, आपल्याकडे तर जावयाला नारायण म्हणजे विष्णू स्वरुप मानतात. व.पु. म्हणतात, “कस्तुरीकडून सौंदर्याची अपेक्षा नाही फक्त सुगंधाचीच अपेक्षा असते…” काळजाचा तुकडा जेव्हा जावयाच्या स्वाधीन होतो, तेव्हा ती वेळ कठीण असते. पण याच जावईरुपी मुलाकडून अपेक्षा फक्त लेकीचा सांभाळ प्रेमाने करावा, हीच असते. हल्ली तर हे नातं म्हणजे सासू-सासरे आणि जावई हे इतकं सुधारले आहे की, टाळ्या देऊन गप्पा मारणं, मस्करी करणं हे होतंच.
शेवटी काळ हे सर्वांवरचं औषध असतं. संवादामुळे नातं बळकट होतं. जसं व.पुं.नी म्हटलं आहे, “संवादाचचं दुसरं नाव म्हणजे मित्र…” आत्ताचे जावई हे जाच करणारे नाहीत. जेव्हा आई-वडिलांपैकी कोणीतरी एक मागे राहतं, तेव्हा त्या व्यक्तीला मुलाप्रमाणे सांभाळणारा जावई असतो. हे नातं तसं म्हटलं तर रक्ताचे नसते, पण तुमची जीभ जर चांगली असेल तर हे नाते सख्ख्या नात्याच्या पलीकडे जाते. इतकं प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो. मुलगी जेव्हा माहेरच्या आठवणीत किंवा आता आई-बाबांचे कसे होणार असा विचार करते तेव्हा तिच्या जोडीदाराचे, “मी आहे ना, त्यांची काळजी आपण दोघं मिळून घेऊ…” हे शब्द संजीवनीसारखे काम करतात. तुम्हाला काय वाटतं?
जेव्हा अधिक महिना सुरू होतो तेव्हा त्या जावयाला मिळालेल्या आहेरापेक्षा सासू-सासऱ्यांचा त्याच्याबद्दल असलेला विश्वास जास्त आपलासा वाटतो, तेव्हा तो देखील सुखावतो. प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे… मुलीने सासरी विरघळून जीव लावावा तसंच जावयाने मुलगा म्हणून काळजी घ्यावी. मुलगा हा नुसता मी तुमचा जावई नाही मुलगाच आहे, असं नुसतं बोलून उपयोग नसतो, वेळेला जेव्हा परिस्थिती सांभाळण्याची वेळ येते तेव्हा मुलाप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे, परावलंबित्व कोणालाही नकोच असते, पण जेव्हा एखादी व्यक्ती आपली काळजी मुलाप्रमाणे घेते, असं दिसतं तेव्हा हेच विचार हवेत विरून जातात. तुम्हाला खोटं वाटेल पण, माझ्या आजोबांचे सर्व कार्य त्यांच्या जावयाने केले. तेही मुलाप्रमाणे.. म्हणजे एक जावई हा मुलगा होतो, ही फक्त बोलण्याची गोष्ट नसते. म्हणून तर लग्नात आपली लाडाची लेक ही विष्णूरुपी वरास सुपूर्द करतात.. तोच तिचा जोडीदार, तोच तिचा सहचर..
“तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि॥”