चंद्रशेखर माधव
साधारण 1985-86चा काळ असावा. मी पाचवी किंवा सहावीत होतो. त्यावेळी आसामला जात असताना रेल्वेत घडलेली ही घटना. मुंबईहून गाडी निघाली. आमच्या कंपार्टमेंटमध्ये अजून एक कुटुंब होतं मुंबईचं. प्रवास मुंबई ते गुवाहाटी असा साधारण तीन दिवसांचा होता. इतका वेळ एकत्र काढायचा असल्यामुळे साहजिकच पटकन ओळख करून घेतली. दोन दिवस मजेत गेले.
तिसऱ्या दिवशी गाडी पश्चिम बंगालमध्ये आली होती. एका स्थानकात काही विक्रेते गाडीत चढले. त्यांच्याकडे इम्पोर्टेड कॅमेरे, तसेच दुर्बीण वगैरे अनेक वस्तू होत्या. सीमावर्ती भाग असल्याने तिथे हे सामान्य होतं, असं नंतर आम्हाला समजलं.
एक विक्रेता आमच्या कंपार्टमेंटमधे आला. तो आल्यानंतर आमच्याबरोबर असलेल्या कुटुंबातील एका सदस्याने कुतूहलाने त्या वस्तू पाहायला सुरुवात केली. किंमत वगैरे विचारू लागला. सर्व वस्तू पाहिल्यावर त्याला त्यातील एक कॅमेरा पसंत पडला. तेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते. कॅमेरात फिल्म रोल भरावा लागत असे. भाव वगैरे करून त्याने सुमारे 500 रुपयांना तो विकत घेतला. त्याकाळी ही रक्कम जास्त होती.
हेही वाचा – मावशीची हाळी म्हणजे आंब्यांची वर्दी
आम्ही दोघे भाऊ कुतूहलाने त्या कॅमेराकडे पहात होतो. गाडी स्टेशनमधून पुढे निघाली. थोड्याच वेळात दोन पोलीस आमच्या कंपार्टमेंटमध्ये आले अन् कॅमेरा विकत घेतलेल्या व्यक्तीकडे चौकशी करू लागले – “हमें खबर मिली है कि, आपने गलत ढंग से देश में लाए गए कैमरा को खरीदा है। वो कैमरा स्मगलिंग करके लाया गया है । आप अगले स्टेशनपर नीचे उतरिए और थाने चलिए।” असं म्हणून धमकी देऊ लागले. हा प्रकार पाहून ते कुटुंब घाबरून गेलं होतं.
सर्व प्रकार हाताबाहेर जाईल की, काय असं वाटल्यामुळे शेवटी माझ्या वडिलांनी मध्यस्थी करायला सुरुवात केली “जाने दीजिए इन्हे पता नहीं था कि, कैमरा स्मगलिंग करके लाया गया है. आप कैमरा जप्त करके ले जाइए, लेकिन इनको छोड दीजिए…” असं म्हणून त्यांना समजवायचा प्रयत्न केला. हो- नाही करत करत शेवटी ते पोलीस तयार झाले.
“सिर्फ कैमेरा जप्त करने से काम नहीं बनेगा। जुर्माना भरना पड़ेगा।” हे ऐकल्यावर ज्याने कॅमेरा विकत घेतला होता त्याने पोलिसांना विचारलं, “कितना देना पड़ेगा? मै तैयार हूं.” हे ऐकताच पोलीस म्हणाला “500 रुपए देने पड़ेंगे.”
त्या व्यक्तीने मुकाटपणे खिशातून नोटा काढल्या अन् पोलिसांकडे सुपूर्द केल्या. पैसे हातात येताच पोलिसाने ते खिशात घातले, कॅमेरा घेतला अन् दोघेही तिथून निघून गेले. ते गेल्यावर आजूबाजूच्या सर्वांनाच जरा हायसं वाटलं. विनाकारण जोरदार आर्थिक फटका बसल्यामुळे त्या प्रवाशाचा चेहरा मात्र चांगलाच पडला होता.
हेही वाचा – अनाहूत सल्ला
गाडी अजून थोडी पुढे गेल्यावर माझे बाबा आम्हा दोघांना हलक्या आवाजात म्हणाले, “ते पोलीस अन तो विक्रेता यांचे लागेबांधे असणार त्यामुळेच ते थेट आपल्या इथे आले. फासा टाकला होता अन् तो मनुष्य फसला. दमदाटी करून कॅमेरा अन् वर पैसे सुद्धा घेऊन गेले. दंड भरा म्हणाले, पण पावती दिलीच नाही. दंड वगैरे काहीही नव्हता. पैसे घेऊन गेले. कोणत्या भावात पडलं पाहा. प्रवासात कधीच असल्या वरकरणी स्वस्त वाटणाऱ्या प्रलोभनांना बळी पडू नये.”
थोडं थांबून बाबा परत एकदा आमच्याकडे वळून बघत म्हणाले, “प्रवासातच काय पण आयुष्यात कधीही अशाप्रकारे स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.”