Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!
    ललित

    परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 9, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, परतवारी, पंढरीवारी, वारकरी, विठ्ठल, विठ्ठल दर्शन, भक्तीभाव, Pandhariwari, Warkari, Vitthal, Vitthal Darshan, devotion
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. अस्मिता हवालदार

    ‘परतवारी’ पुस्तकाबद्दल मी खूप जणांकडून ऐकलं होतं. जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं तेव्हा भारावून गेले होते. पुस्तक वाचायचा सुद्धा योग यावा लागतो. सुधीर महाबळ यांच्या मुलाखती, भाषणं पण ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात उमटला, ‘यांना कसं जमलं असेल? आणि मला कधी जमेल का?’

    घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी
    दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी

    ही वैभव जोशींची कविता इतकी पटली! म्हणजे माझ्यासारखे बरेच आहेत. वारीला जायची खूप इच्छा आहे, पण ते घडत नाही. तुकोबांनी लिहून ठेवले आहे,

    आवा चालली पंढरपुरा
    वेशीपासून आली घरा…

    मीही त्यातलीच एक आवा! वारी आणि मराठी माणूस यांचं नातं शब्दपलीकडचं आहे. कुलदैवताच्या दर्शनाला जाण्यात आणि वारीत फरक आहे. लेखक म्हणतो, ‘विठुराया स्वतः संन्यस्त. त्याच्याकडे काही मागायच नसतं. फक्त दर्शनाला जायचं असतं.’ हा नवस करण्याचा देव नाही, पण अतिशय लाडका, प्रेमाचा आहे. ‘विठ्ठलाकडे काय मागितलं’, असं विचारल्यावर एक माऊली म्हणाली, ‘तुकोबांना प्रत्यक्ष विठ्ठलाने “काय देऊ?” विचारलं होतं, त्यावर ते म्हणाले, “तुझ्याकडे आहेच काय मला द्यायला? कमरेवर हात घेऊन उभा आहेस.” तरी, विठ्ठलाने आग्रह केल्यावर तुकोबा म्हणाले, “हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.”’

    लेखक कामाच्या व्यग्रतेमुळे वारीसाठी वेळ देऊ शकत नसल्याने परतवारीसाठी लागणारी फक्त दहा दिवसांची सुट्टी घेऊ शकत होते. त्यामुळे त्यांनी परतवारी करायची ठरवली. दुसरं कारण म्हणजे, वारी झाल्यावर वारकरी परत कसे जात असतील, याबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. यालाच ‘परतवारी’ म्हणतात. परतवारीत फार तर काही शे लोकांची गर्दी असते… वारीच्या लाखोंच्या तुलनेत काहीच नाही! परतवारीत तेवढी व्यवस्था नसते जेवढी वारीत असते. त्यामुळे परतवारीला ‘वैराग्यवारी’ म्हणतात. पहिली ‘ऐश्वर्यवारी’!  मात्र, लेखकाला ‘परतवारी’ अनुभवांच्या, अनुभूतीच्या दृष्टीने ‘ऐश्वर्यवारी’च वाटते.

    2005 सालापासून सतत परतवारी करताना त्यांना अनेक माऊली भेटल्या. वारीला प्रत्येक जण माऊली असतो. त्यांना बरे-वाईट सर्व प्रकारचे अनुभव आले. त्यांनी एका मुलाखतीत विलक्षण अनुभव सांगितला… गावाच्या बाहेर विठ्ठलाची मोठी तस्वीर लागलेली होती. त्यासमोर उभे राहून खेडूत बायका विठ्ठलाशी बोलत होत्या. एक म्हणाली, “यावर्षी मुलगी बाळंतपणाला आली आहे म्हणून तुला भेटायला येऊ शकले नाही. पण पुढच्या वर्षी नक्की येते.” या भक्तीला भाबडेपणा म्हणावे की, हा गुण आपल्यात नाही म्हणून दुःख करावे? मला समजलं नाही.

    हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’

    एका माळीणबाईने त्यांना खायला घातलं आणि पाय पुसणे मागितल्यावर स्वतःची साडी दिली म्हणाली, “विठ्ठलाचे दर्शन करून आलेले पाय माझ्या साडीने पुसले तर पुण्य मिळेल.” लेखक म्हणतो, ‘कपड्यांबद्दलच्या माझ्या कल्पनांना तडा गेला.’

    ‘सखा’ नावाचा शून्यातून श्रीमंत झालेला वारकरी दरवर्षी अन्नदान करतो, वारकऱ्यांना जेवणावळ घालतो. स्वतः व्यवस्था पहायला उभा असतो. तो कोणाकडून हे काम करून घेऊ शकला असता, पण स्वतः जातीने उभे राहून करतो. लेखकाला एक वारकरी म्हणाला, ‘हे तुम्हीच करता आणि नाव सखाचे घेता!’ लेखकाने हे सांगितल्यावर शांतपणे सखा म्हणाला, “माऊली, तुम्ही आणि मी एकच आहोत की!!” ‘जीवो ब्रह्म’ हेच आहे…

    एक अंध वारकरी इतके तन्मयतेने अभंग गात होता की, सुरेल मैफलीची आठवण व्हावी… त्याने भावपूर्ण अभंग गाऊन सर्वांना भक्तीतून मिळणाऱ्या आनंदाचा परिचय करून दिला होता. तर, आपल्या मुलीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सुद्धा नियम मोडू नये म्हणून अन्नदान करणारी माऊली जीवनाचे तत्वज्ञान शिकवते. ‘जाणारी गेली पण वारकऱ्यांची सोय करायला हवी,’ असं ती म्हणते.

    वारी किंवा परतवारी म्हटल्यावर पडणारे प्रश्न म्हणजे इतकं चालायला जमेल का? कुठेही खाऊन-पिऊन तब्येत बिघडेल का? उघड्यावर विधी उरकता येतील का? कुठेही झोप लागेल का? लेखकाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. वारीत गेल्यावर हे प्रश्न गौण होतात आणि ते जाणवतही नाहीत. पायाने अधू असलेली माऊली सुद्धा वारी करते. स्वतःची सोय पाहताना काही वेळा आपण दुसऱ्याची गैरसोय करत असतो. माऊलीच राहणार, माऊलीच जाणार, माऊलीच रक्षण करणार म्हणणारा वारकरी… ‘मामेकं शरणं व्रज’ भगवंतांना हेच सांगायचं असेल.

    परतवारी करताना गर्दी कमी असते, त्यामुळे स्वतःशी संवाद साधायला खूप वेळ मिळतो. लेखकाने 35 मैलांचा प्रवास अनेकदा केला आहे. प्रत्येक वेळी वेगळे अनुभव घेतले, पण त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. माऊलींच्या पावलांवर किडा-मुंगी दिसली नाही, पण कोणाला दिसली तर, असू शकते, असे लेखक म्हणतो. लेखकाला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, माणसांवरचा कमी झालेला विश्वास. ‘निर्मळ मनाची भाबडी माणसे माझ्या डेटामध्ये नाहीत; त्यामुळे पटकन कोणावर विश्वास ठेवता आला नाही,’ असे त्यांनी लिहिले आहे.

    हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

    कायमवारी म्हणजे सतत वारी करत राहणे. पंढरपूरला पोहोचल्यावर परतवारी सुरू. मग पुन्हा वारी… असे आयुष्यभर करणारे लोक आहेत. गेली तीस-पस्तीस वर्षे घरदार सोडून कायमवारी करणारे एक वारकरी लेखकाला भेटले. काही कामधंदा न करता सतत अशी वारी करणे योग्य आहे का? असाही प्रश्न त्यांना पडतो.

    वारी करणे जमेल का? या प्रश्नाचे मूळ शोधले तर ते आपणच स्वतःवर चढवून घेतलेल्या आणि इतरांनी आपल्यावर चढवलेल्या झुलींमध्ये आहे, हे सहज कळेल. आरामाची जीवनशैली असल्यामुळे कुठल्याही कष्टांची भीती वाटते. लेखकाने जेव्हा यातून मुक्ती मिळवली तेव्हा त्यांना खरे समाधान मिळाले, आनंद मिळाला! सकाळी उठल्यावर ‘जनाबाईचा गोड अभंग कानी पडणे, भोळ्या-भाबड्या स्वच्छ मनाच्या माणसांचा सहवास मिळणे, कुठलीही चिंता न करता सगळे विठ्ठलावर सोडून देणे, दोन वेळच्या भाकरीची सुद्धा चिंता नसणे, डोक्यावर आभाळ आणि पायाखाली जमीन हेच सुख असणे, माऊलींच्या पादुकांवर डोके ठेवल्यावर डोळ्यांत आलेले समाधानाचे अश्रू… जीवन जीवन म्हणतात ते हेच!’ लेखक म्हणतो, वारीत त्या आभाळाखाली माऊली पाहत आहोत. सामान्यांसाठी हेच विश्वदर्शन आहे…

    पुस्तक वाचल्यावर वारीला जायलाच हवे असे वाटू लागते. कुठेतरी लेखकाचा हेवा वाटू लागतो. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे त्याप्रमाणे, ‘मला माहीत नाही, हेच मला माहीत नाही!’

    काहीतरी अनमोल आपली वाट पाहत आहे, हातून निसटण्यापूर्वी गळाभेट घ्यायला हवी, हेही जाणवते. मी पुन्हा मनाशी निश्चय करते, पुढच्या वर्षी वारी नक्की!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn