स्वयंपाक बनवताना गृहिणी आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टिप्स देत आहोत. पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स करताना या टिप्स वापरून पाहा.
- वर्षभरासाठीच्या पापड-कुरडया करून आपण डब्यात भरून ठेवतो. शेवटी पापड, कुरडया संपल्यावर डब्यात चुरा शिल्लक राहतो. हा चुरा स्वच्छ करून थोड्या तेलात तळून घ्यावा. त्या चुऱ्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी बारीक चिरून टाका. चवीप्रमाणे मीठ, साखर, तिखट, जिरेपूड, शेंगदाण्याचे कूट टाकून एकजीव करावे. त्यानंतर त्यात अर्धे लिंबू पिळावे. ही आगळीवेगळी कोशिंबीर लहान मुले फार आवडीने खातील. शिवाय कच्च्या भाज्या खाण्यात येतात म्हणून ती पौष्टिकही असते.
हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…
- हिरव्या कच्च्या केळ्यांची भाजी करताना साल काढून फोडी करेपर्यंत हात आणि भाजी दोन्हींना राप येतो. केळी काळी पडतात त्यामुळे भाजीचा रंग बदलतो. अशावेळी सोपा उपाय म्हणजे भाजीची केळी कुकरमध्ये प्रथम दहा मिनिटे वाफ देऊन घ्यावीत. नंतर थंड झाल्यावर सोलून बटाट्याप्रमाणे फोडी करून भाजी करावी. बटाट्याच्या भाजीप्रमाणेच पांढरी होते.
- कुठलीही रसभाजी किंवा रस्सा भाजी करताना कांदा खरपूस परतणे आवश्यक असते. त्यासाठी खूप वेळ, गॅस, तेल खर्च होतो. त्यासाठी भरताच्या वांग्याप्रमाणे तेलाचा हात लावून अख्खा कांदाच गॅसवर अगदी काळा होईपर्यंत भाजावा. वापरायच्या वेळी वरचे टरफल काढून टाकायचे की, आत चांगला खरपूस भाजलेला कांदा मिळतो. तो लगेच वाटला जातो. त्यामुळे पदार्थाला आपोआप तेल सुटते आणि पदार्थाची चव अधिक रुचकर होते
- फरसबी किंवा फ्लॉवर यांची आदल्या दिवशीची भाजी उरली असल्यास त्यात उकडलेले बटाटे, गाजर किसून आणि ब्रेडच्या स्लाइस, आलं-लसूण घालून चांगले मळणे. (लसणीची चटणी असल्यास) आलं-लसूण न घालता चटणी आयत्या वेळी घातली तरी चालेल. त्याचे गोळे रव्यावर थापून मस्तपैकी कटलेट बनवावे. मुलांच्या डब्यात तसेच जेवताना खावयास द्यावेत.
हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
- कोबी अर्धा कापून शिल्लक ठेवला तर, तो थोडा खराब होतो. त्याऐवजी कोबीची आपणास हवी तेवढी पाने सुटी करून घ्या आणि जुळवून कापा. ही पद्धत सोपी पडते. उरलेला गड्डा आतला, जो अगदी कोवळा असतो तो कोशिंबीर, सलाड करायला अगदी छान असतो आणि अख्खा असल्याने निश्चितच बरेच दिवस टिकतो.
- उन्हाळ्यामध्ये भाज्यांमध्ये नारळ घातलेला असेल, तर भाजी लवकर खराब होते. म्हणून भाजी फोडणीत टाकायच्या आधी नारळ फोडणीत टाकून परतावा आणि नंतर भाजी फोडणीला टाकावी.


