मानसी देशपांडे
आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण मी स्वतः मुंबईची असल्यामुळे थोडा हळवेपणा आहे. मुंबई ही काहीजणांसाठी मायानगरी आहे. पण ही कधीच झोपत नाही. आजच्या तारखेला सुद्धा नोकरीनिमित्ताने अनेक लोक येथे येतात, ज्यांना ही मुंबई आपल्यात सामावून घेते. बघा, काहींना नाईलाजास्तव देखील इथे यावं लागतं. कारण, उदरनिर्वाहाला इथे कमी नाही. जसं व.पु. म्हणतात, ” प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंत पोहोचवतो, पुढचा प्रवास तो स्वतःच्या हिमतीवर करतो…” अगदी काहीसं असंच आहे. मुंबई ही अतिशय वेगवान आहे. इथे तुम्हाला आणून जरी ठेवलं तरी वेळ पाळणं आणि मेहनत करून आपला जम बसवणं, हे तुम्हालाच करणं भाग आहे.
अनेकांच्या कुटुंबाचं पालनपोषण या आपल्या मुंबईने केलं आहे आणि अजून करते आहे. जसं पहाटे तीन वाजता पहिली गाडी पकडून दादरला फुलं घेऊन उतरणारे अनेक स्त्री-पुरुष आहेत, हे कष्ट कशासाठी तर याची दोन कारणे आहेत, पहिलं म्हणजे या फुलांमुळे त्यांचा चरितार्थ चालतो आणि दुसरं, ही ‘ताजी फुलं’ लोकांच्या नजरेत भरतात…
हेही वाचा – कवी ग्रेस अन् “भय इथले संपत नाही…” कविता
व.पुं.चा अजून एक विचार मनात येतो, “समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की, आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते…” आपण बघतो, विरार लोकल असो किंवा चर्चगेट, तुम्ही लेडिज किंवा जनरल, दोन्ही डबे बघा खचाखच भरलेले असतात. अनेक लोक जबाबदारीमुळे जो संघर्ष करतात, वेळेला दोन-दोन तास उभ्याने प्रवास करतात, त्याची साक्षीदार ही लोकल असते. म्हणून तर मुंबईत तुफान कष्ट आहेत, पण एकदा तुम्हाला ती सवय झाली की, याच मुंबईचा तुम्हाला लळा लागतो. तुमच्या कष्टाचं फळ द्यायला इथे मुंबादेवी आहे तसंच, सिद्धिविनायक मंदिर आहे. कारण, आयुष्यात कितीही अपयश आलं तरी, तो कर्ताकरविता तुमच्यावर प्रामाणिकपणाचं फळ म्हणून पुष्पवृष्टी करतोच. म्हणून, तुम्ही मुंबईत एकटे नसता. जसं व.पुं.नी म्हटलं आहे, “हजारो देणग्यांची पुष्पवृष्टी करायला परमेश्वर तयार आहे, तुम्ही फक्त स्वीकारण्याची तयारी दाखवा…”
एक सांगू का, इथे आज असे देखील संसार करणारी लोकं आहेत, जे दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहतात. पण मनाचं समाधान महत्त्वाचं! कारण, परिस्थिती ही नंतर सुधारते पण, तुम्ही जे सुंदर क्षण जगलेले असता, ते परत येत नाहीत. खूप काही दिलंय या मुंबईने. घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडेल, पण मुंबई ही तिच्याकडे आलेल्यांना कधी नाराज करत नाही, हे मात्र नक्की. इथे गाड्यांचे प्रचंड हॉर्न आहेत, ट्रॅफिक आहे, तरीही समाधानाचं तेज देखील आहे! माझ्यासाठी ही मुंबई म्हणजे सर्व काही आहे…
हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात
मराठमोळे खाद्यपदार्थ पाहिजे असतील तर, दादरचं प्रकाश हॉटेल आहे, जिथे अजूनही लोणी थालिपीठ, मसालेभात, भाजणीचे वडे असे एकाहून एक सुंदर पदार्थांची रेलचेल आहे. लिहू तेवढं कमीच आहे… तुम्ही ‘डबलसीट’ हा चित्रपट पाहिला असेल तर, मुंबईचं आयुष्य जास्त जवळून अनुभवता येतं. शेवटी काय, मुंबापुरीत संधी एकापेक्षा एक आहेत, पण कष्टाला पर्याय नाही…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


