नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय.
मला माझ्या लहानपणी ओळखणारी आणि आता ओळखणारी वेगवेगळी माणसं, म्हणजे त्यांची माझ्याबद्दलची मतेसुद्धा वेगळी आहेत. एका ठराविक वयानंतर येणारा आत्मविश्वास, एक प्रगल्भता हे माणसाचं आयुष्य, स्वभाव बदलते. मी जरा जास्त कॉन्फिडन्ट आणि मस्तीखोर आहे. मला आता ओळखणारी माणसं मला विचारतात की, तू लहानपणी देखील अशीच होती ना गं? खूप मस्तीखोर… आणि लहानपणी मला ओळखणारे विचारतात की, काय गं काही सुधारणा आहे का तुझ्यात की, अजून तशीच आहेस बावळट!
मज्जा… खरंच लहानपणी मी बावळट, भित्री भागुबाई होते. पण आता जशी आहे मस्तीखोर, त्याची मुळे खरंतर लहानपणीच रुजली होती… अगदी मी जेव्हा मॉन्टेसारित होते… गिरगावात देशमुख लेनमध्ये ऐनापुरे बाईंकडे दोन वर्षे माँटेसरीमध्ये शिकायचं आणि मग इयत्ता पहिलीसाठी शाळेत ॲडमिशन घ्यायची, अशी साधारण तेव्हाची प्रथा होती.
बरं, ऐनापुरे बाई म्हणजे त्या माझ्या आजीसारख्या होत्या. प्रचंड तल्लख बुद्धिमत्ता होती. मला त्यांच्या शाळेतून घरी न्यायला कोणीही यायचं. म्हणजे, खेतवाडी आठव्या गल्लीतून दादाकाका, राजूकाका, माईआत्या किंवा सातव्या गल्लीतून चक्क ताई आजी देखील येऊन मला त्यांच्या त्यांच्या घरी घेऊन जायचे. तशी मी संपूर्ण फॅमिलीमध्ये जरा जास्त लाडाची होते. आई जेव्हा मला न्यायला शाळेत यायची, तेव्हा ऐनापुरे बाई सांगायच्य की, ‘ताई नाहीये, राजू येऊन घेऊन गेला.’
हेही वाचा – Take care… काळजी घे
बाई माझ्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सना ओळखायच्या. पण मला कधी कधी त्यांचा खूप राग यायचा. म्हणजे, वर्गात एखाद्या मुलाला किंवा मुलीला झोप आली ना की, त्या त्यांना निजायच्या खोलीत नेऊन झोपवायच्या. अभ्यासाचा कंटाळा आला की, मी पण बसल्या बसल्या डुलक्या द्यायचे. वाटायचं की, बाई मलाही निजायच्या खोलीत पाठवतील. पण नाही, त्या मला, ‘तोंड धुवून ये… थोडावेळ उभी राहा…’ असे सांगायच्या! खूप राग यायचा…
त्या शाळेत अजून एक सिस्टीम होती. दुपारी डबे खायची सुट्टी व्हायची. डबे खाऊन झाले की, रांगेने सगळेजण ‘सू’ करायला जात असू. ऐनापुरे बाई बाहेर टॉयलेटपाशी उभ्या राहायच्या. सगळी मुले वर्गात आली की, त्या टॉयलेटमध्ये पाणी टाकून, सगळं स्वच्छ करून, मग वर्गात यायच्या. पण त्या आधी शास्त्री बाई किंवा सदावर्ते बाई यांच्यासाठी कोणाकडे तरी निरोप पाठवायच्या की, त्यांनी आता गोष्टी सांगायच्या, गाणी म्हणून घ्यायची की पाट्या (अभ्यास) घ्यायच्या. (तेव्हा आम्ही पाटी-पेन्सिल वापरत होतो.)
त्या दिवशी मला सांगितलं की, ‘ताई, शास्त्री बाईंना सांग पाट्या घ्यायच्यायत.’ मी ‘हो’ म्हटलं आणि शास्त्री बाईंना सांगितलं की, ‘गोष्ट सांगायचीय.’
त्याप्रमाणे बाईंनी तशी तयारी केली. ऐनापुरे बाई आल्या आणि म्हणाल्या, ‘हे काय? गोष्ट सांगायची तयारी काय केलीय! पाट्या घ्यायला सांगितलं होतं मी…’ शास्त्री बाई म्हणाल्या की, ‘हिनं सांगितलं गोष्टी सांगायच्यायत म्हणून…’
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
झालं… बाईंनी धोपटलीच मला! वरून आईला नाव सांगितलं. आईनंही धोपटलं. माझा सगळा ‘स्मार्टनेस’ या लोकांनी दाबून टाकला अन् मी एक नंबरची बावळट आणि घाबरट बनले. बावळटपणा अजूनही शिल्लक आहे. भित्रेपणा मात्र काळाच्या ओघात मागे पडला.
तुम्हाला आठवते का, तुम्ही मॉन्टेसरीमध्ये केलेली अशीच काही करामत. मला कळवली तर वाचायला आवडेल. तुमची तशी आठवण पुढील ईमेलवर कळवा.