दतात्रय पांडुरंग मानुगडे
भाग – 5
मिरजच्या मीरासाहेब दर्ग्याजवळ बाबांच्या रुपाने एक देव भेटला याचा आनंद झाला. देव मंदिरात नाही देव माणसात आहे… प्रत्येकाने माणसात देव शोधला पाहिजे. एकमेकांचा आत्मा जाणणे, हा पुण्याच मार्ग आहे. अन्नदान हे फार श्रेष्ठ दान आहे. हल्लीतर प्रत्येक तीर्थस्थळाच्या ठिकाणी महाप्रसाद भाविकांना दिला जातो, हे फार मोठे पुण्याईचे काम आहे. या प्रसादासाठी बरेच भाविक प्रसादासाठी मदत करतात. काही ठिकाणी प्रसादासाठी धान्य कोठून येते, हे कळतही नाही. माझ्या मते नरसिंह वाडी येथे गेली पाच वर्षं एक व्यक्ती प्रसादाचे जेवण देत आहे, ती व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. अशी दानधर्म करणारी माणसे भरपूर आहेत.
दिवस पुढे पुढे पळत होते… परंतु त्या बाबाचं प्रेम आणि त्यांच्याविषयी मनात लागलेली मायेची ओढ कमी होत नव्हती. आठवडाभर काम केलं की, मी शनिवार-रविवार बाबांकडे हमखास जाणार, हा माझा ठरलेला शिरस्ता होता. बरेच दिवस बाबांकडे जात होतो, पण बाबांची तब्येत दिवसेनदिवस खालावत चालली होती. त्यांची हाडे स्पष्टपणे दिसू लागली होती. शरीराचा पिंजरा झाला होता… त्यातच त्यांची दृष्टीही अधू झाली होती. ते हिंदीत बोलत असे. हेच बाबा मला आधी भेटले असते तर आणखी थोडे दिवस सेवा करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली असती. वर्षभर मिरजला जाऊन बाबांना भेटायचो. दर आठवड्याला त्यांची ख्यालीखुशाली समजायची.
नेहमीप्रमाणे याही आठवड्यात गेलो होतो. मी बाबांना म्हणालो, “ बाबा…”
“क्या बेटा…”
“मी म्हणतो, तुमची तब्येत दिवसेनदिव खंगत चालली आहे, मी डॉक्टरांना घेऊन येऊ का?”
“कुछ नहीं… डॉक्टर मेरे को कौन सा दवा देने वाला है! मै डॉक्टर हूं… वह मेरे को क्या तपासनेवाला हैं..?”
“तरीपण डॉक्टरला घेऊन यावे म्हणतो…” मी म्हणालो.
“अभी कुछ फायदा होने वाला नहीं, अभी मेरा जाने का टाइम हो रहे है, मैं क्या बोलता…”
“काय, बोला ना बाबा…”
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
“बेटा, फटा शर्ट एक ना एक दिन बदलना पडता है, ऐसाच आदमी का हैं… एक ना एक दिन उनके पास जाना है… आना और जाना यह सभी ऊपर वाले के हाथ में हैं…” बाबा म्हणाले.
“बाबा, पण तुम्ही नक्की कुठे जाणार?”
“ हमारे गांव में…”
“बाबा, तुम्ही जे काय बोलता ते मला समजत नाही… तुम्ही माझ्यावर स्वतःच्या मुलासारखा जीव लावला आणि मला सोडून जाता? पण मीही तुमच्याबरोबर येणार आहे…”
“तुम्हारा और मेरा मिलने का यह टाइम है, लेकिन तुम अभी जाओ… मैं तुम्हारे ऋण में नहीं रहना चाहता… तुम्हारा आगे सब अच्छा होने वाला हैं… और बेटा, तुम मेरे लिए बहुत किया… और तुम्हारी बदली किर्लोस्करवाडी कर रहा है… अभी जाओ, अगले हप्ते में फिर इधर आओ… मैं किधर जाता नहीं…” बाबा म्हणाले.
“ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता तर मी जातो… पण माझ्यावर लक्ष असू दे…”
“सही लक्ष तुम्हारे ऊपर रहने वाला हैं… चिंता मत करो, मैं तुमको आशीर्वाद देता हूं…”
… बाबांचा निरोप घेऊन मी मिरज स्टेशनला आलो, परंतु बाबा या जगातून निघून जाणार आहेत, हे माझ्या लक्षात आले नाही. बाबा कोणत्या गावाला जाणार आहेत, हे लवकर मला समजले नाही. परत एक आठवड्याने मी मिरजेला बाबांना भेटावयास गेलो, पण त्या जागी मला बाबा दिसले नाहीत. मन म्हणू लागले, हे बाबा गेले कुठे? परत मी टेलरजवळ गेलो आणि म्हणालो..
“टेलर मामा इथं असणारे बाबा कुठे गेले?”
“ते परवाच वारले…”
हेही वाचा – मला केवळ ध्यास बाबांचाच!
हे ऐकून मला फार दुःख झाले, डोळ्यातून पाणी येऊ लागले… मी बाबांवर एक वर्ष जीव लावला होता… मी टेलर मामाला म्हणालो..
“त्यांना कुठे दफन केले?”
“मीरा साहेब दर्ग्याच्या मागे दफनभूमी आहे, तिथे दफन केले…”
“मला पहावयास मिळतील का?”
“तसे आत कुणाला सोडत नाहीत…” टेलर मामा म्हणाले.
गेल्या आठवड्यामध्ये त्यांना मी म्हणत होतो, ‘डॉक्टरला बोलू का? ते नको म्हणाले. फक्त म्हणाले, मला दुसऱ्या गावी जायचे आहे… पण हे माझ्या लक्षात आले नाही.’ मी जड अंतकरणाने कराड रेल्वे स्टेशनला आलो. त्या दिवशी मला झोप लागली नाही… मी खूप दु:खी होतो. दुसऱ्या दिवशी मी जेवलो नाही, बाबांचीच आठवण येत होती. बाबा एके दिवशी स्वप्नात आले आणि म्हणाले, “बेटा, मैं किधर भी गया नहीं, तुम्हारे पास हैं… रोना नहीं. मेरे को तकलीफ होता है…” आणि मी स्वप्नातून जागा झालो. असा हा दिव्यशक्तीचा माणूस मला भेटला! आजही त्यांची आठवण येते मला…
समाप्त


