मानसी देशपांडे
आज रविवार. म्हणजे आराम… आठवड्याची कामं करण्याचा दिवस. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जशी वपुप्रेमी आहे ना, तशीच संगीतप्रेमी सुद्धा आहे बरं! काही जणं माझ्यासारखे असे देखील असतील की जे ठरवतात, आज सकाळी मस्तपैकी एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकायची. मग जर ते संगीतकार ‘गुलजार साहेब’ असतील तर!! बहारच!! शायरींचा राजा म्हणजे गुलजार साहेब. ज्यांच्या गाण्यात प्रेम, विरह, आयुष्य या सर्वांवर एक नव्हे, अशा अनेक गाण्यांचा नजराणा आहे… जसं या वर व.पु. म्हणतात, “छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात…” तुम्हाला आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर, गुलजार साहेबांची गाणी किंवा शायरी ऐकावी…
व.पुं.नी एक हृदयस्पर्शी विचार मांडला आहे, “कापसाचे तळवे हे मांजरांनाच नसतात, तर भूतकाळालाही असतात…” प्रेम म्हटलं की, तिथे शपथा, रुसवे-फुगवे हे आलेच. पण त्या व्यक्तीपासून दूर जायची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. मग अशा शांत वेळी गुलजार साहेबांचं हे गाणं कानावर पडल्यावर डोळे पाणावतातच…
“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा…”
लग्न ठरणं म्हणजे घरात आनंदाचे वातावरण असते. कारण, ती मुलगी म्हणजे आपल्या व.पुं.च्या भाषेत सांगायचं झालं तर झुळूक… “पोरगी म्हणजे झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही…” मग आता ही झुळूक सासरच्या मंडळींच्या घरात जात असेल तर, तिची थोडीशी गंमत तर होणारच… तेव्हा गुलजार साहेब एका बहिणीचे लाडीक मनोगत मांडताना व्यक्त होतात,
“सुन सुन सुन दिदी तेरे लिए, एक रिश्ता आया है…”
गुलजार साहेबांची एक खासियत म्हणजे ते प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या मनातील भावना अचूक हेरत असत. कारण, प्रेम जरी दूर गेलं तरी आठवणी या चिरंतन असतात. त्याच आठवणी नायिका परत मागते आहे, जे गुलजार साहेबांनी फार छान रेखाटले आहे-
“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है
वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो…”
व.पु. जसे लेखनातून वाचकांशी संवाद साधतात तसंच, गुलजार साहेबांच्या शायरी या मनाला स्पर्श करतात. मनाला लागेल अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा एकाकीपण भासू लागते. इथे व.पुं.नी विचारातून तर गुलजार साहेबांनी शायरी लिहिली आहे. व.पु. म्हणतात, “एकाकीपण वेगळं. एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण…” आता गुलजार साहेब म्हणतात, “दिल अब पहले सा मासूम नहीं रहा, पत्थर तो नहीं बना पर अब मोम भी नहीं रहा…”
शेवटी काय, प्रत्येकाच्या आयुष्य, सुखाची व्याख्या या वेगळ्याच असतात. पण तरीही कितीही टेन्शन आलं तरी आयुष्याची इस्त्री ही कडकच राहिली पाहिजे, जे गुलजार साहेबांना लागू पडते. जसं व.पु. म्हणतात, आयुष्याचा महोत्सव करता यायला हवा. म्हणून तर अशा कायम एव्हरग्रीन राहणाऱ्या गुलजार साहेबांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे, “कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो आज मैं हूं…” इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी!!