Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअवांतरसुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख म्हणजे नक्की काय असतं?

पराग गोडबोले

हे माझं दरवर्षीचंच आहे… दसरा संपून, दिवाळीची चाहूल लागायला लागली की, मला फराळाच्या पदार्थांची आठवण यायला सुरुवात होते. तसे हे पदार्थ हल्ली अगदी बाराही महीने मिळतात, पण सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी प्रसादाचा शिरा जसा जास्त चविष्ट लागतो, तसा दिवाळीत फराळ अंमळ जास्तच रुचकर असल्याचं जाणवतं… हा माझा कायमचा अनुभव!

वाण सामानाची यादी करून ती नेऊन देणे हे काम मी चोख करतो. अर्थात, ती सांगते आणि मी लिहून घेतो. तिच्यापेक्षा माझं हस्ताक्षर वाण्याला नीट कळतं, असा तिचा ग्रह आहे. हस्ताक्षर स्पर्धेत कधी उत्तेजनार्थ पारितोषिकही न मिळालेला असा मी अन् माझं अक्षर जर छान असेल, तर तिचं कसं असेल याची तुम्ही फक्त कल्पना करा!

घरी सामान पोहोचतं करणाऱ्या नवीन ॲप्सवर तिचा रोष का आहे, कोणास ठाऊक… पण इतकी वर्ष आपला ठरलेला वाणी कसा तोडायचा? हा तिचा विचार मला सार्थ वाटतो. मीही याला प्रोत्साहन देतो. काही झालं तरी, हे असे जपलेले संबंधच अडीनडीला उपयोगी पडत असतात, असं माझं मत आहे.

यादी दिली की, घरी सामान येऊन पडतं. पातळ पोहे, रवा, मैदा, तूप, साखर, गूळ, शेंगदाणे, डाळं, तेल, खोबरं सगळं येतं… कसं एवढं अचूक नियोजन असतं बायकांचं याचं मला नेहेमीच नवल वाटत आलं आहे, सोपं नसतं हे काम! आज हे करायचं… उद्या ते करायचं… असं वेळापत्रक बनवलं जातं, मनातल्या मनात. हे सगळे उद्योग सहसा दुपारच्या वेळेत होत असतात. फावला नाही म्हणू धजणार मी, कारण तिला बिचारीला फावला असा वेळ नसतोच. सतत आपली झुंजत असते, रात्री पाठ अंथरुणाला टेकेपर्यंत…

रोज संध्याकाळी घरी आलं की, नवा पदार्थ ओट्यावर असतो. चवीला म्हणून थोडासा दिला जातो वाटीत. त्या दिवशी तेवढयावर समाधान मानावं लागतं! चकल्या आणि शेव यावर्षी बाहेर सांगणार आहे. सोऱ्या जड पडतो आता, हात दुखून येतात माझे. अजूनही आमच्याकडे लाल रंगाचा, लाकडी अंग असणारा जड सोऱ्या आहे, त्याच्या निरनिराळया छोट्या ताटल्यांसकट…

हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!

‘माझी एक मैत्रीण छान करते चकल्या. तिला सांगणारे…’ तिनं सांगितलं. मी मात्र वाट बघत असतो पिवळ्या धम्मक चिवड्याची… पातळ पोहे, भरपूर शेंगदाणे, मिरच्या, भाजकं खोबरं, डाळं आणि इतर अनेक गोष्टी घालून सजलेला चिवडा म्हणजे माझा जीव की प्राण!

“अरे, मंजिरीला बोलावलंय मी मदतीला, खास चिवड्यासाठी. तिचा छान होतो म्हणून. ती उद्या येणार आहे, जरा कळ काढ.” पर्याय नसतो. मंजिरी म्हणजे बायकोची अगदी खास सखी. मंजिरी जागते शब्दाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर चिवड्याचा खरपूस घमघमाट सुटलेला असतो. मोठ्या कढल्यात पिवळा रसरशीत चिवडा आव्हान देत असतो मला. माझ्या आवडीचे सगळे जिन्नस अगदी भरघोस दिसत असतात त्यात…

या चिवड्यात कुरमुरे घालणं म्हणजे मला चिवड्याचा शुद्ध अपमान वाटतो. भडंगात कोणी पोहे घालतं का, नाही ना? मग पोह्याच्या चिवड्यात कुरमुऱ्यांची लफंगी लुडबूड कशाला? बायको तेवढी किंमत देते माझ्या मताला, आणि चिवड्यातून कुरमुरे हद्दपार होतात!

हा चिवडा खाण्याचे माझे दोन मुख्य प्रकार आहेत… पहिला म्हणजे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं, टोमॅटो आणि चिवडा यांचं बेमालूम मिश्रण. एकदम नामी प्रकार.  फराळाला हा माझा मुख्य जिन्नस. बाकी सगळे प्रकार उगाचच तोंडी लावायला वगैरे.  चिवड्याची मात्र स्वतंत्र ताटलीत वेगळी जहागिरी… इतरांची भाऊ गर्दी टाळायला.

दुसरा प्रकार म्हणजे वाडग्यात किंवा कुंड्यात घेतलेला दोन मुठी चिवडा आणि त्यावर घातलेलं कवडीचं घट्ट दही! हा प्रकार म्हणजे वेड लावी जीवा असा… सर्वगुणसंपन्न चिवडा आणि घट्ट दही यांचं हे मिश्रण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! दही आणि चिवडा कालवायला वाडगाच हवा, तरच हे दोन्ही पदार्थ एकजीव करून त्याचा पुरेपूर आनंद अनुभवता येतो… मधेच येणारे दाणे, काळपट झालेले खोबऱ्याचे तुकडे, डाळं आणि सोबत दह्याचा अपरंपार  गोडवा. अगदी दृष्ट लागण्याजोगी सोयरीक…

हेही वाचा – मन तृप्त करणारं… रथीनम!

मागे एकदा एका मित्राच्या घरी मिसळ खायचा योग आला होता, तेव्हा इतर सामग्रीसोबत पोह्याचा चिवडा पण होता मिसळीत. चिवड्याचा हा उपयोग तेव्हा नव्यानेच कळला होता. आता घरच्या मिसळीत सुद्धा संधी मिळेल तेव्हा पोह्याच्या चिवड्याचा समावेश हमखास केला जातो, माझ्या आग्रहाखातर!

असा हा बहुआयामी चिवडा.

त्याचबरोबर, कवडीच्या दह्यात बुडवून खाल्लेली भाजणीची खरपूस चकली म्हणजे आणखी एक हळवा कोपरा. नुसती चकली तर भारीच, पण ती दह्याच्या संगतीत आली की, अगदी चमचमती, लखलखती चांदणी होते, फराळाच्या रत्नांमधली! लोणी असलं घरचं, तर चकलीचा तुकडा लोण्यात बुडवून तोंडात टाकल्यावर जे काही होतं, ते मात्र शब्दांच्या पलीकडचं… अवर्णनीय… 

सुख म्हणजे नक्की काय असतं? हे प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं जगण्याचा एक विलक्षण अनुभव म्हणजे हे दोन्ही प्रकार!

दही नसलंच, तर हा मान मग ताकाकडे जातो. चिवडा किंवा चकली ताकात भिजवून खाल्ल्यानेही तीच ऊर्जा मिळते, जी दह्यामुळे मिळते. माझ्या आवडीला मान देऊन चिवडा भरपूर केलेला असतो, चकल्याही त्याच पटीत असतात आणि शिमग्यानंतर कवित्व उरतं, तसा दिवाळीनंतर चिवडाही उरतो आणि चकल्याही उरतात. माझ्या रसनेला तृप्त करायला, पुढचे काही दिवस!! दिवाळी येते आणि जाते, पण आनंदाचे, सुखाचे आणि चवींचे असे जिव्हाळे मात्र आपल्याला पुढचं वर्ष आनंदात जगण्याची नवीन उमेद देऊन जातात. हेच तर दिवाळीचं आणि फराळाचं महत्त्व आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!