Sunday, June 15, 2025
Homeललितपायाचे मनोगत!

पायाचे मनोगत!

शैलजा पुरोहित

“आधी कळस मग पाया रे।” गाण्यातील ही उफराटी रीत पाहून मला खरंतर हसूच आलं. त्या कवीचं तरी काय चुकलं? सध्याच्या युगाची हीच रीत आहे, सर्वजण दिमाखात उभ्या असलेल्या, चमचमणाऱ्या कळसाला भुलतात. ज्या भक्कम पायावर तो कळस उभा असतो, तो मात्र त्यांच्या खिजगणतीतही नसतो. कळस डळमळू लागला की, प्रत्येकाला वाटतं याचा पाया पक्का असायला हवा होता.

ज्याच्यावर एखादी गोष्ट स्थिरपणे उभी राहते तो पाया! आपल्या शरीराचा भार नि तोल सांभाळतात ते पाय! आम्हां दोघांमध्ये एका कानाचा फरक आहे. आमचं स्वरूपही वेगळं आहे, तरी आम्हा दोघांचे कार्य एकच आहे. आधारभूत होणं आणि स्थैर्य देणे!

आपण ज्या घरात राहतो त्याचंच बघा ना. जेवढी इमारत उंच, तेवढा पाया आधी खोल खणला जातो. त्यात खडी, गिट्टीचा भराव घालून तो पक्का केला जातो. मग त्यावर इमारत बांधली जाते, म्हणजेच इमारत बांधण्याची ठराविक पद्धत आहे. तद्वतच ज्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडणार असतं, जीवनाला आकार येणार असतो, प्रगती होणार असते, त्या शिक्षणाचा पाया देखील मजबूत असायलाच हवा. तो पाया भरायचा असतो जिद्द, मेहनत नि अभ्यासू वृत्तीने. निरंतर शिक्षण साधनेने तुमच्या यशाच्या कळसाचा मार्ग सुलभ होतो. पूर्वी घोटून घेतलेल्या परवच्यामुळे आजही तोंडी गणितं पटकन सुटतात. घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या युगात घोकंपट्टीला वेळ आहेच कुठे? मग कॅलक्युलेटरचा उपयोग केला जातो. कधी रेडीरेकनरची मदत घेतली जाते, धडा स्वत: समजून, जाणून घेऊन उत्तर स्वतःच्या भाषेत लिहितो, त्याचं समाधान काही औरच असतं. समजा कधी पाय दुखावला गेला, कुबड्या घेऊन काही काळ चालण्याशी वेळ आली तर, ते नकोस होतं. स्वतःच्या पायावर सहजपणे चालणं, धावणं याचं समाधानही तसंच असतं.

खडतर परिस्थितीतून एखादा मुलगा स्वकर्तृत्वावर मोठा होतो, तेव्हा त्याचे माता-पिता अभिमानाने सांगतात, “स्वतःच्या पायावर तो उभा राहिला. लाथ मारेन तिथे पाणी काढेन, असा त्यांचा बाणेदारपणा आहे.” आपल्याला आदरणीय असणारी व्यक्ती आपल्या घरी आली तर, आपण सहजपणे म्हणून जातो, “आपल्या चरणधुळीने माझं घर पावन झालं.” श्रीरामासारख्या अवतारी पुरुषाची कथाच न्यारी। त्याने पदस्पर्शाने उद्धरली अहिल्या नारी। असं म्हणतात की, स्त्रिच्या लत्ताप्रहराने अशोक वृक्ष बहरून येतो. किती रसिक हा वृक्ष नि किती नाजूक असावा तो प्रहार!

राजकारण्यांची बाचाबाची असो नाहीतर, मुलांची मारामारी, सगळेच उपहासाने म्हणतात, कसली ही गद्धेलाथाळी! गाढव ओझेवाहू, मान्य. पण त्याच्या पायाची अशी थट्टा का? त्याचे पाय स्थिर, ठाम नसतील तर, लडखडत्या पायांनी का तो तुमची ओझी वाहू शकणार आहे? पूर्वी राजे-महाराजे देशद्रोह्याला, राजद्रोह्याला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा फर्मावत. अशा कामासाठी माझा उपयोग व्हावा, याची मला खंत वाटायची. माझा मीच विचार करू लागलो तेव्हा आणवलं की, गुन्हेगाराला शासन करण्याचं कर्तव्यच करत होतो मी. ती बाब खेदजनक नाहीत मुळी,

यशाच्या पायऱ्या भराभर चढून सुद्धा मनुष्य जेव्हा निगर्वी राहतो, सर्वाशी मिळून-मिसळून असतो, तेव्हा लोक कौतुकाने म्हणतात, यशाचा कळस त्याच्या हाती आहे, पण त्याचे पाय मात्र जमिनीवर स्थिर आहेत. त्याच्या पायाबद्दल एकापरीने माझेच ते कौतुक ऐकताना मी मनोमनी तृप्त होतो. संस्कृतात एक सुभाषित आहे, त्याचा गोषवारा असा आहे की – हाताचं भूषण दान आहे. चांगली वचनं ऐकणं हे कानाचं भूषण आहे. त्याला जोडून मी म्हणेन, काळाच्या गतीबरोबर चालताना ठाम चालणं, वाकडी वाट न करणं, हे पायाचं भूषण आहे.

आपला पाय चुकून दुसऱ्याला लागला तर, आपण चटकन त्या व्यक्तीला नमस्कार करतो. मग जी धरित्री आपला भार सोसते, पायावर स्थिर उभं राहण्यासाठी मदत करते तिला सकाळीच उठून उभे राहण्याआधी, “पादस्पर्श क्षमस्व मे।” असं म्हणून तिला वंदन करणे ही आपली संस्कृती आहे. भावपूर्ण श्रद्धेने देवाच्या चरणावर आपण नतमस्तक होतो, त्यावेळी वेगळीच अनुभूती आपल्याला आपली स्थिती “अंगी रोमांच उठे। लोचनी नीर दाटे।” अशी होते.

असं आहे हे पद महात्म्य!

रसिक हो, माझं मनोगत मी मोकळेपणाने तुम्हाला सांगितलं. माझं हे मनोगत तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मत ऐकायला उत्सुक असणारा –

तुमचा नि सर्वांचाच आवडता, सदैव असणारा

पाय!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!