सुहास गोखले
(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
माणसाचे आयुष्य एका खळखळत्या झऱ्यासारखे प्रवाह कसे बदलेल ते सांगताच येत नाही. 1960च्या दशकात नासिकसारख्या छोट्या शहरात लहानपण घालवताना अगदी सर्वसामान्य perception नुसार, पोलीसांपासून चार हात दूर रहावे, त्यांची दोस्तीही वाईट तर दुश्मनीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विचार.
अभ्यासात बरा असल्याने मुंबईत जाऊन Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात 10 वर्षं ट्रेक्स, स्नो स्किईंगचे दोन कोर्स केले. मुंबई, पुणे, नासिक या त्रिकोणातच खासगी नोकरी तसेच छंद यात मश्गुल असतानाच मुंबईत आक्रित घडले आणि नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला. गटारात पत्र्याखाली लपवलेल्या त्याच्या देहावर डोक्यापासून कमरेपर्यंत 36 घाव होते.
शिक्षक आईवडिलांना तो धक्का सहन करणेच अवघड असल्याने, भावाचा मृतदेह ओळखणे, ताब्यात घेणे आणि अंत्यसंस्कार हे सगळे मलाच करणे भाग होते.
हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव
त्याकाळात अनेक नागरिकांनी येऊन, भेटून भावाने त्यांना कशी मदत केली होती, ते प्रसंग सांगितले. नागपाड्यातल्या आशा सदनमधल्या सिस्टर्सही माझ्या भावाला आपल्या भावासारख्याच मानत होत्या, हेही पाहिले. भावाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. मनात असेल तर, पोलीस अधिकारी हे अनेक लोकोपयोगी कामेही करू शकतात हे लक्षात आल्याने, मी भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन पोलीस दलात प्रवेश करण्याचा निश्चय त्यावेळी जाहीर केला.
भावाचे अंत्यसंस्कार 20 मे 1984 रोजी झाले आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. केवळ पाच महिने हातात असल्याने दु:ख बाजूला ठेवून मी तयारीला लागलो आणि 31 ऑक्टोबर 1984ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राष्ट्रीय दुखवटा, शीखविरोधी दंगल अशा अस्थिर वातावरणातच एमपीएससीच्या परीक्षेला बसलो. परीक्षेनंतर निकालाच्या प्रतीक्षेचा कालावधी अक्षरश: प्राण कंठाशी आणणारा वाटत होता आणि अखेर निकाल जाहीर झाला… महाराष्ट्रात 25व्या आणि नासिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो होतो.
हेही वाचा – नवी पिढी, ब्रॅण्डेड पिढी
मायक्रोबॉयॉलॉजीची पार्श्वभूमी असलेला अन् माझे प्राणप्रिय छंद विसरून, मी खाकी युनिफॉर्म परिधान केला आणि लोकांच्या सेवेसाठी, पूर्वी मला नावडत्या असलेल्या पोलीस दलात प्रवेश केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला.
क्रमश: