पराग गोडबोले
तो सत्तावीस वर्षांचा झाला आणि घरचे मागे लागले लग्नासाठी. खरोखर काहीच हरकत नव्हती बोहल्यावर चढायला आता. घरच्यांच्या मते, बंधनात अडकण्याचं हेच योग्य वय होतं. उगाचच उशीर करण्यात काहीच हशील नव्हतं. त्यानं कुठं काही जमवलंय का? याची आडून आडून चाचपणी सुरू होती, पण तसं काही नाही, यावर तो ठाम होता. त्याच्या मते अजून दोन वर्ष थांबायला हवं होतं, पण शेवटी आई आणि आजी, दोघी खनपटीला बसल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि तो नाव नोंदवायला तयार झाला.
सगळे सोपस्कार करून, पैसे भरून एका नामांकित संस्थेत नाव नोंदवल्यावर पटापट स्थळं यायला लागली. त्याचं शिक्षण, पगार, कुटुंबाची पार्श्वभूमी बघता, यात काही विशेष नव्हतंच म्हणा. लाखात एक म्हणावा, असाच होता तो. पत्रिका जुळली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं पाऊल, यावर सगळ्यांचं एकमत होतं. तेवढं याला ते पटत नव्हतं, पण पर्याय नव्हता… स्वतःच जमवलं असतंस, तर ही वेळ आलीच नसती, अशी त्यावर आईची मल्लिनाथी होती. तुकवली मान त्याने.
चार पत्रिका जुळल्या, फोटो आवडले आणि एक पाऊल पुढे पडलं. चारही मुली तोडीस तोड होत्या, डावं उजवं करणं खूप कठीण होतं, पण निवड एकीचीच करायची होती शेवटी! मुलगी बघणं वगैरे हल्ली काळाच्या ओघात पार विस्मृतीत गेलेली संकल्पना. त्याच्या आईबाबांचं लग्न असंच स्थळ बघून, चहा-पोहे खाऊन, जमलेलं. त्याच्या आईच्या मते ती मौजच निराळी होती. काळ बदलला तशा प्रथाही बदलल्या… कालाय तस्मै नमः।
हेही वाचा – माझ्यातल्या ‘मी’ची कथा
नवल म्हणजे, त्याला भावलेल्या चारही मुलींना तो आवडला होता. त्याही भेटीसाठी तयार होत्या. भेटणं कुठे आणि कधी हे ठरवलं गेलं… आणि यथावकाश चारही मुलींशी भेटी झाल्या. एकमेकांना जोखलं आणि परखलं गेलं. छंद, आवडीनिवडी, शिक्षण, नोकरी, यावर चर्चा झाल्या… तीन ठिकाणी नाही जुळली मतं आणि मनं, पण एका ठिकाणी मात्र ‘दिलकी घंटी बज गयी‘ असं जाणवलं त्याला! तरंगत घरी आला आणि आईला म्हणाला, ‘ही मुलगी आपल्याला साजेशी आहे, असं पहिल्या भेटीत तरी वाटतंय.’ तिचं शिक्षण, तिची नोकरी, तिचं दिसणं, तिचं हसणं, मनमोकळा स्वभाव, सगळंच आवडून गेलं त्याला… बघू काय आणि कसं होतंय ते. मी तर नांगर टाकलाय इथे!
दोघांच्या गप्पा सुरू झाल्या व्हॉट्सॲपवर… भेटीगाठी सुरू झाल्या आणि वसंत फुलायला लागला जणू. स्वभाव कळायला लागले, भाव उलगडायला लागले आणि त्याच्यासोबत घरचेही सुखावले. आता पुढचं पाऊल उचलायला काहीच हरकत नव्हती. तो तिला एकदा घरी घेऊन आला आणि होणाऱ्या सुनेला बघून आईबाबा आणि नातसुनेला बघून आजीआजोबा हरखून गेले. आवडली ती सगळ्यांनाच!
आधुनिक, जीन्स टॉप घातलेली, उत्तम प्रतीचा सुगंध ल्यालेली, हलकासा मेकअप केलेली, आत्मविश्वासाने ओतप्रोत ती. अवघडली थोडीशी सुरवातीला, पण नंतर मनमोकळी बोलली. स्वतःबद्दल, आईबाबांबद्दल, नोकरीबद्दल आणि तिच्या अपेक्षांबद्दल सुद्धा… आजीची पाचवारी, आईचा पंजाबी ड्रेस आणि तिची जीन्स. प्रत्येक पिढीचं स्थित्यंतर एकत्र बसलं होतं, एकमेकांशी बोलत.
तो सुद्धा तिच्या घरी जाऊन आला. होणारा जावई आवडला सगळ्यांनाच. आपली लेक सुस्थळी जाणार याची खात्रीच पटली सगळ्यांना. दोघांची कुटुंबं भेटली, रमली एकमेकांत. जुळत चालले होते ऋणानुबंध नात्यांचे, हळूवार. गाठी बांधल्या जात होत्या, न सुटण्यासाठी. साखरपुडा कधी करायचा, कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली आणि या सगळ्यालाच मूर्त रूप येऊ लागलं…
एकदा अशीच भेटली दोघं, थोडासा एकांत होता आणि त्याने पुसटसं चुंबन घेतलं तिचं… मोहरली त्या नाजूक स्पर्शाने, पण थोडी लांब सरकली ती आणि म्हणाली, “थांब. मला तुला काहीतरी सांगायचंय.”
त्याच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह, भलं थोरलं. सोबत चिंता, सतावणारी…
पिशवीतून पाण्याची बाटली काढून तिनं एक घोट घेतला, जुळवाजुळव केली शब्दांची आणि मान खाली घालून म्हणाली, ‘Sorry to tell you, but I am not virgin.‘ पाणी तरळलं तिच्या डोळ्यांत…
“बारावीत असताना, कॉलेजच्या एका सरांनी…” अश्रूंचा बांध फुटला आणि ठसठस बाहेर पडली सगळी, साचून राहिलेली… “कधीच बोलले नाही रे कोणाशी, अगदी आईशी सुद्धा नाही. सहन करत राहिले सगळ्या यातना, इतकी वर्षं… काय भोगलंय मी, माझं मलाच ठाऊक. मुखवटे घालून वावरत राहिले, प्रत्येक क्षणी वेदना दडवत, मनाच्या तळाशी. किती रात्री मी जागून काढल्यात, माझं मलाच ठाऊक. शिसारी बसलीय मनात, पुरुषांची. नसतं सांगितलं तुला, तर आयुष्यभर मन खात राहिलं असतं माझं. कसं सांगावं कळत नव्हतं, पण न सांगणंही पटत नव्हतं, म्हणून धीर एकवटून आज सांगितलं. आता काय निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी तुझ्या हातात. नाही म्हणालास, तरी ते स्वीकारण्याची तयारी केलीय मी. इतकं सगळं भोगलंय, त्यात आणखी एक भोग…”
हेही वाचा – ऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!
तो सुन्न. नभ फाटून वीज पडावी, तसा कल्लोळ त्याच्या मनात! हे काहीतरी अचानक, ध्यानीमनी नसताना… मस्त विहरत चाललेला पतंग, मांजा तुटून हेलकावत जावा तसं काहीतरी… काय प्रतिक्रिया द्यावी, कळेच ना त्याला!!
“आत्ता लगेच निर्णय नाही दिलास तरी चालेल. वेळ घे विचार करायला हवा तेवढा, पण मी अडकलेय आता तुझ्यात, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे.”
क्षण दोन क्षण, असेच गेले शांततेत आणि तिच्या गालाला हलकेच स्पर्श करत तो म्हणाला, “जे घडलं त्यात तुझा दोष काहीच नाही. तुझा दोष एकच, तो म्हणजे त्या नराधमाला तू मोकळं सोडलंस आणि कुढत राहिलीस आतल्या आत. किती खोल परिणाम झाला असेल तुझ्या मनावर, कल्पना आहे तुला?”
हलकेच तिचा हात हातात घेतला त्यानं आणि म्हणाला, “आता लग्न करेन तर तुझ्याशीच. तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला मला… माझं फक्त एक ऐकायचं. माझा एक जवळचा मित्र चांगला मानसोपचार तज्ज्ञ आहे. मनातलं सारं त्याच्यापाशी व्यक्त करायचं आणि त्याच्याकडून योग्य ते उपचार घेऊन, ही तगमग शांत करायची. आहे मान्य? हे फक्त तुझ्या माझ्यातच राहील, अगदी काहीही झालं तरी. हा शब्द आहे माझा, तुला दिलेला. आणखी एक लक्षात ठेव, मी कुठलेही उपकार करत नाहीये तुझ्यावर. मनावर कुठलंही ओझं बाळगू नकोस तू.”
तिचा विश्वासच बसेना! पुरुष असाही असू शकतो? एवढा समजूतदार, एवढा विश्वासू, एवढा नितळ?
पार दूर झाली तिच्या मनातली जळमटं. एक नवा अध्याय सुरू होऊ पहात होता तिच्या आयुष्यात, एका सुंदर, सुशील जोडीदारासोबत.
योग्य ते उपचार घेऊन, मनात रुतलेला काटा उपसून काढल्यावर, बोहोल्यावर चढताना, पालवी फुटलेली, एक नवी ती, आणि आश्वासक असा तो, यांची जोडी अगदी साजरी दिसत होती…
मोबाइल – 9323277620


