Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितकुंडलीयोग अन् विधिलिखित!

कुंडलीयोग अन् विधिलिखित!

दीपक तांबोळी

‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये 10-12 जण बसले होते. त्यातल्या एकाला मी “गुरुजी आहेत का?” असं विचारलं. त्यानं होकारार्थी मान हलवली. आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. दीडएक वर्षापूर्वी एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर, मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे, असं मानणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार? असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा! पण दीड वर्षापूर्वी बी.ई. पास झाल्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. कॉल येत नव्हते, असं नाही… पण इंटरव्ह्यू चांगला होऊनही माझी निवड होत नव्हती. “तुझं नशीब मार खातंय,” असं आईवडील म्हणत होते. मला ते पटत नव्हतं. “आपलं भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं,” असं माझं मत होतं. पण इतर मित्र भराभर नोकरीला लागत असताना मी मात्र बेरोजगारीचे चटके सहन करत होतो. गेल्या सहा महिन्यांपासून तर मी चक्क डीप्रेशनमध्ये गेलो होतो. मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. ते पाहून आईवडिलांनी मला आज जबरदस्ती इथे पाठवलं होतं.

मी समोरच्या लोकांकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्याची काळजी दिसत होती. कुणाला मुलाच्या लग्नाची काळजी, कुणाची कोर्ट केस, तर कुणाचं धंद्यात नुकसान झालेलं… प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रश्न होतेच. प्रयत्न करूनही यशस्वी न झालेली, दुःखात पोळलेली माणसं शेवटी ज्योतिषाचा आणि देवाचा आधार घेतात, असं मी ऐकलं होतं. ते आज मी स्वतःच अनुभवत होतो.

एक तासाने माझा नंबर लागला. मी गुरुजींसमोर जाऊन बसलो. गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने हसले.

“बोला काय म्हणताय?” त्यांनी विचारलं. मी माझी पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली.

“गुरुजी बी.ई. चांगल्या मार्कांनी पास होऊन दीड वर्ष उलटलंय. प्रयत्न करूनही साधी पाच-दहा हजारांचीही नोकरी लागली नाही. सध्या खूप निराशा वाटतेय. कशात मन लागत नाही. काय करावं समजत नाही…”

“साहजिकच आहे. बेरोजगारांची मानसिक अवस्था अतिशय वाईट असते.”

“गुरुजी बघा बरं माझ्या नोकरीचा योग कधी आहे ते! आणि नोकरी कुठं मिळेल, तेही सांगा.”

गुरुजींनी पत्रिकेवर नजर टाकली… खालची मान वर न करता म्हणाले,

“तुम्ही हुशार आहात. मेहनती आहात. पण पत्रिकेतल्या नोकरी, व्यवसायाच्या स्थानात अशुभ ग्रहांची युती आहे, त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येताहेत…”

मग त्यांनी पंचांग उघडलं. मनाशी काही आकडेमोड केली. मग माझ्याकडे पहात म्हणाले,

“वर्षापूर्वी नोकरीचा बऱ्यापैकी योग होता, तेव्हा काही झालं नव्हतं का?”

ते म्हणत होते, ते खरंच होतं.

“हो, एका कॉलेजमध्ये नोकरीची ऑफर होती. पण पगार कमी होता आणि तोही चार-चार महिने मिळत नाही, असं ऐकण्यात होतं. शिवाय, ते परमनंट करत नाहीत, असं माहीत पडल्यामुळे मी गेलो नाही…”

हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

“अच्छा. सगळ्या शिक्षणक्षेत्रात आजकाल अशीच पिळवणूक सुरू आहे. नशीब त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले नाहीत. नाहीतर परमनंट करण्याच्या बोलीवर ते 25-30 लाखांची मागणी करतात. वरून दोन-तीन वर्षं फुकटात काम करायला लावतात, असं ऐकण्यात आहे. ठीक आहे, आता 21 ऑगस्टनंतर चांगले योग आहेत. ऑगस्ट महिन्यात राहूची महादशा संपून गुरुची महादशा सुरू होतेय. शिवाय, गोचरीचे ग्रहही शुभस्थानात येताहेत. नोकरी शंभर टक्के मिळणार. मात्र, ती दक्षिण दिशेला मिळेल. पण तुम्ही फार काळ नोकरी नाही करणार. स्वतःचा व्यवसाय सुरू कराल. त्यातही तुम्ही चांगली प्रगती कराल…”

“बापरे, म्हणजे अजून सहा महिने वाट पाहायची?” मी थोडं नाराजीने आणि अविश्वासाने म्हंटलं. एकतर सहा महिने असं ऐतखाऊ बनून घरी बसून काढायचे माझ्या जीवावर आलं होतं आणि माझ्या हातात मुंबईच्या तीन चार कंपन्यांचे कॉल्स होते. त्यातल्या एकात तरी माझी निवड होईल, असं मला वाटत होतं. अर्थात, आजपर्यंतच्या अनुभवावरुन त्याचीही खात्री वाटत नव्हती. शिवाय, आईवडिलांना सोडून साऊथमध्ये जायची माझी अजिबात इच्छा नव्हती.

गुरुजींनी खांदे उडवले… म्हणाले, “ग्रह तरी तेच सांगताहेत.”

“नोकरी लवकर लागावी यासाठी काही उपाय नाही का?”

“करूनही फायदा नाही. उपायाच्या नावावर लोकांकडून पैसे उकळण्यातला मी नाही. तसंही विधीलिखित टळत नाही. दीड वर्ष वाट पाहिलीत, सहा महिने अजून पाहा!” मी निरुत्तर झालो.

“गुरुजी, तुमची दक्षिणा किती द्यायची?”

गुरुजी हसले… “मी बेरोजगारांकडून दक्षिणा घेत नाही. हे माझं एक समाजकार्य आहे, असं समजा. नोकरी लागली, भविष्य खरं ठरलं की, तुमची जेवढी इच्छा होईल तितकी दक्षिणा द्या. ओके?”

मला आनंद झाला. मी त्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो.

उत्सुकतेपोटी मी गुरुजींची माहिती काढली. गुरुजींचं खरं नाव होतं ‘चंद्रकांत’ पण त्यांना सगळे चंदू गुरुजीच म्हणायचे. गोरा रंग, देखणा चेहरा, सहा फूट उंची, कपाळावर गंध, मजबूत शरीरयष्टी… गुरुजी मेकॅनिकल इंजीनियर आहेत, असं चुकूनही वाटायचं नाही. वय असावं पस्तीस-छत्तीस. ‘माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाही,’ असं ते सर्वांना सांगायचे. पण त्यांच्या आईनं त्यांना जळगावबाहेर नोकरीला जाऊ दिलं नाही, हे खरं सत्य आहे, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं. एकुलता एक मुलगा लग्नानंतर सात वर्षांनी नवसाने झालेला. त्यामुळे त्याला दूर पाठवायला ती माऊली तयार नव्हती. गुरुजी दहावीत असतानाच त्यांचे वडील गेलेले. त्यामुळे जे काही करायचं ते जळगावातच कर, असं तिचं म्हणणं होतं. जळगावात इंडस्ट्रीज नव्हत्या. गुरुजींना सुरुवातीला मुंबई, पुण्याला बऱ्याच नोकऱ्या मिळण्याची संधी चालून आली होती; पण आईमुळे ते जाऊ शकले नाहीत. स्वतःच्या भविष्याचा अभ्यास करता करता भविष्य सांगणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. मनमानी दक्षिणा त्यांनी कधीही मागितली नाही… तरीही त्यांना चांगली कमाई व्हायची. चांगला अनुभव आलेले लोक त्यांना बराच दानधर्म करायचे.

हेही वाचा – निरोप समारंभ… स्मृतीपटलावर कोरलेला!

गुरुजींचं लग्न झालं नव्हतं. ‘माझ्या कुंडलीत विवाहयोग नाही,’ असंही ते म्हणायचे. त्यांच्या लग्नाचे अनेक प्रयत्न झाले. पण केवळ लोकांचं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणाऱ्याला आपली मुलगी द्यायला कोणीही तयार झालं नाही, ही खरी वस्तुस्थिती होती किंवा मला तशी ती वाटत होती.

त्या सहा महिन्यांत मी बऱ्याच ठिकाणी मुलाखतींना गेलो. गुरुजींचं भविष्य खोटं ठरवण्याच्या हेतूने मी इंटरव्ह्यूला जोरदार तयारी करून जायचो. पण मुलाखती चांगल्या होऊन देखील माझी कुठेच निवड झाली नाही. 16 ऑगस्टला मला बंगलोरच्या एका कंपनीचा मेसेज आला. 22 ऑगस्टला मुलाखतीला बोलावलं होतं. इच्छा नसतानाही मी गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिलेक्टही झालो. सुरुवातीलाच सहा लाखांचं पॅकेज मिळालं. मला खूप आनंद झाला. चंदू गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. दोन महिन्यांनी मी जळगावला आलो. गुरुजींना मी हजार रुपये दक्षिणा आणि पेढे तर दिलेच, पण एका हॉटेलमध्ये पार्टीही दिली.

त्यानंतर मी अनेक गोष्टीत गुरुजींचा सल्ला घ्यायला लागलो. ज्योतिषाला थोतांड समजणारा मी गुरुजींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करेनासा झालो. त्याचे फायदेही होऊ लागले. त्यांच्या सल्ल्यावरून मी माझ्या बहिणीचं लग्नं एका हॉटेल व्यावसायिकाशी लावून दिलं. वर्षभरातच त्यांची भरभराट झाली. दुसरं शानदार हॉटेल सुरू झालं. आता घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली. एका मुलीचं स्थळ सांगून आलं. मुलगी सुंदर होती, उच्चशिक्षित होती. माझ्यासह सर्वांनाच आवडली. मी तिची कुंडली चंदू गुरुजींना जाऊन दाखवली. ‘मुलीचं बाहेर अफेअर आहे. शक्यतो लग्न करू नका…’ गुरुजींनी सल्ला दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मुलीला नकार दिला. आश्चर्य म्हणजे, एका महिन्यातच ती मुलगी एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी आली. मी गुरुजींना लक्ष लक्ष धन्यवाद दिले. नंतर मी गुरुजींच्या सल्ल्यानेच लग्न केलं. माझा संसार सुरळीत सुरू झाला.

लग्नानंतर तीन वर्षांनी मला पुण्यात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची संधी मिळाली. बंगलोरची नोकरी सोडून मी पुण्यात स्थायिक झालो. गुरुजींचं हेही भविष्य खरं ठरलं. दोनच वर्षांत माझी खूप भरभराट झाली. बंगला झाला. दोनतीन चारचाकीही झाल्या. परदेशी वाऱ्या होऊ लागल्या… सगळं चांगलं सुरू असताना अचानक दोन वाईट बातम्या कानावर आल्या. पुण्यातल्या माझ्या मावसबहिणीचा नवरा अपघातात गेला. फक्त 35 वर्षांची बहीण आणि तिची 10 वर्षांची मुलगी अशा दोघींचाही एका झटक्यात आधार गेला. दुसरी वाईट बातमी चंदू गुरुजींच्या आईच्या निधनाची होती. गुरुजीही अनाथ झाले होते.

मी गुरुजींना जळगावला भेटायला गेलो, तेव्हा गुरुजी विमनस्क अवस्थेत बसले होते. सध्या गावात मिठास बोलून लोकांना लुबाडणाऱ्या अनेक खऱ्याखोट्या ज्योतिषांनी ज्योतिषाची, वास्तूशास्त्राची दुकानं उघडून ठेवली होती. त्यामुळे ज्योतिषाचा धंदा न करणाऱ्या, आपणहून लोकांकडे दक्षिणा न मागणाऱ्या, गरज नसताना ग्रहांची रत्नं न विकणाऱ्या चंदू गुरुजींच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला होता. त्यांचा ज्योतिषाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता, असं ऐकण्यात आलं होतं.

सगळी विचारपूस झाल्यावर मी गुरुजींना विचारलं, “आता यापुढे काय गुरुजी? तुम्ही काही ठरवलंय का?”

गुरुजी मंद हसले. म्हणाले, “तुम्हाला तर माहीत आहे, माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाहीये. त्यामुळे जसं चाललंय तसं चालू द्यायचं…”

“असे एकटे आयुष्य कसं काढणार? लग्न करून घ्या…”

“मी आता 42 वर्षांचा आहे. लग्नाच्या वयात लग्न झालं नाही. आता ते काय होणार? आजकाल तुम्ही बघताय ना मुलींच्या अपेक्षा किती वाढल्यात. लाखो रुपयांचे पगार असणाऱ्या मुलांची लग्न जुळणं कठीण होऊन बसलंय. मग माझ्यासारख्या सामान्य ज्योतिषाला मुलगी तरी कोण देणार? असाही माझ्या कुंडलीत लग्नाचा योगच नाहीये!”

माझ्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. मी त्यांना म्हणालो, “मी तुमचे हे दोन्ही योग जुळवून आणले तर?”

गुरुजी चमकले. माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

“म्हणजे?”

“म्हणजे नोकरी आणि लग्न… दोन्हीही?”

“ते कसे?”

“सांगतो. तुम्ही फक्त मी सांगेन ते करायचं…” मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो. मग मी त्यांना सविस्तर सगळं समजावून सांगितलं. ते अगोदर तयार झाले नाहीत. मी सांगितलेला प्लॅन यशस्वी होणार नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. पण ‘जमलं तर ठीकच नाहीतर सोडून द्या,’ असं मी म्हटल्यावर ते तयार झाले.

आज या घटनेला सहा महिने होऊन गेले. मधला काळ खूप धावपळीचा गेला. गुरुजींना मी माझ्याच कंपनीत, ते इंजीनियर असल्यामुळे सुपरवायझर म्हणून लावून दिलं. त्यानंतर मावसबहिणीला लग्नाला तयार केलं. तिला मुलीची काळजी वाटत होती. पण गुरुजींनी मनाचा मोठेपणा दाखवत तिला मुलीसकट स्वीकारलं.

लग्नानंतर एक महिन्याने मी त्यांच्या घरी गेलो. दोघंही सुखी आणि आनंदी दिसत होते. बहिणीची मुलगी गुरुजींना चिकटून बसली होती. याचा अर्थ नवीन वडिलांना तिनं फक्त स्वीकारलंच नव्हतं तर, ते तिला आवडू लागले होते. तीन निराधार जीवांना एकमेकांचा आधार मिळाल्यामुळे तिघांच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि समाधान झळकत होतं. माझ्या एका निर्णयाने तिघांचं आयुष्य सुरळीत झालं, याचा मलाही आनंद झाला. मी गुरुजींना म्हटलं, “गुरुजी तुमचा ज्योतिषाचा व्यवसाय परत सुरू करायला हरकत नाही. इथं पुण्यात खूप चालेल…”

गुरुजी हसले. म्हणाले, “तो व्यवसाय, ज्योतिषाची पुस्तकं, पंचांग मी जळगावलाच सोडून आलोय. त्या विधात्याच्या मनात काय आहे, हे कोणताही मोठ्यातला मोठा ज्योतिषीही काही सांगू शकत नाही. कुंडलीत कोणतेही योग नसताना माझ्या बाबतीत जे घडलं, ते पाहून मी ज्योतिष सोडून द्यायचा निर्णय घेतलाय. बघा ना तुमच्या बहिणीच्याही कुंडलीत वैधव्याचा तर योग होता, पण पुनर्विवाहाचा काही योग नाहीये. विधिलिखित टळत नाही, असं आपण म्हणतो… मग भविष्य बघायचंच कशाला? हा मला प्रश्न पडलाय. कदाचित, कुंडलीत योग नसतानाही आम्हाला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करून घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेतच, पण काही कर्म ही आपल्यालाच करावी लागतात, असं माझं आता ठाम मत झालंय. त्यामुळे आता तुम्ही जसा दिला तसा कर्मावर मी भर देणार आहे…”

ते म्हणत होते, ते पटत होतं. स्वतःच्या कुंडलीतले लग्नाचे आणि नोकरीचे योग गुरुजींना चांगले ज्योतिषी असूनही का कळले नाहीत? हे मला समजलं नाही. पण या घटनेमुळे एक चांगला ज्योतिषी कर्मवादावर उतरलाय याचा आनंद मानायचा की, एका चांगल्या ज्योतिषाला लोक मुकले, याचं दुःख करायचं हेच मला समजेनासं झालं…


(ही कथा ‘कथा माणुसकीच्या’ पुस्तकातील आहे.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!