डॉ. अस्मिता हवालदार
प्रतिभा कणेकर लिखित ‘इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ’… पुस्तकाचे नाव लांबलचक असले तरी सार्थ आहे. 2025मध्ये जानेवारी महिन्यात पहिली आवृत्ती निघाली आणि लगेच ऑगस्टमध्ये दुसरी सुद्धा आली. मुखपृष्ठावर इरावती बाईंचा सुंदर प्रसन्न हसरा फोटो आहे. लेखिकेची भाषा ओघवती आहे. इरावती बाईंचे संशोधन सोपे करून, समजेल अशा भाषेत सांगितले आहे. लेखिकेचे मनापासून आभार.
इरावती कर्वेंबद्दल मला कुतूहल वाटत होतं, ते पुरातत्वाच्या अभ्यासक होत्या म्हणून! त्यावेळी हा विषय लोकांना माहीत नव्हता. आजही ते पुरेसे गांभीर्याने घेतले जात नाही. मी या विषयात पदविका अभ्यासक्रम केला, त्यावेळी याचे महत्त्व अधिकच लक्षात आले.
इरावतीबाईंबद्दल बापलेकी पुस्तकात त्यांच्या दोन्ही मुलींनी जाई आणि गौरीने, लिहिले आहे. त्या उंच होत्या म्हणून सासूबाई कौतुकाने त्यांना दीपमाळ म्हणायच्या. मानवशास्त्रासारखा विषय त्यांनी त्या काळात अभ्यासला! इतकेच नव्हे तर, महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढले. वंशवाद खोडून काढला. तेही हिटलरच्या जर्मनीत राहून! त्या खरोखरच दीपमाळेसारख्या दिशादिग्दर्शक होत्या.
इरावती करमरकर हे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचे कुटुंब ब्रह्मदेशात राहत असताना वडिलांनी त्यांना पुण्याला शिकायला हॉस्टेलमध्ये ठेवले. तिथे शकुंतला परांजपे यांच्याशी मैत्री झाल्यावर त्यांच्या आई वडिलांनी म्हणजेच, अप्पा आणि सईबाईंनी त्यांना घरीच ठेवून घेतले आणि मुलीसारखे वाढवले. दोघी मैत्रिणी सख्ख्या बहिणीसारख्या मोठ्या झाल्या. शकूचे वडील सुप्रसिद्ध रँगलर परांजपे. त्यांनी दोघींना उत्तम घडवले. पुढे करमरकर कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले. इरावती बाई देखण्या होत्या, त्यामुळे कुणा संस्थानिकाशी त्यांचा विवाह करून द्यावा, असे त्यांचे वडील ठरवत असताना त्यांनी दिनकर कर्वे यांच्याशी विवाह करण्याचा आग्रह धरला. दिनकररावांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. शिवाय अण्णांनी (त्यांचे वडील महर्षी कर्वे) विधवा विवाह केला होता. यामुळे वडिलांच्या मर्जीविरुद्ध त्यांचा विवाह झाला.
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
इरावती बाईंनी डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली The Chitpawan Brahman socio ethnic study या विषयावर संशोधन करून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. जर्मनीत डॉ. युजिन फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. डॉ. फिशर वंशवादाचे पुरस्कर्ते होते, पण इरावती बाईंनी कवट्यांच्या मापावरून कुठलाही वंश श्रेष्ठ कनिष्ठ नसतो, हे सिद्ध केले. डॉ. फिशर यांना मत आवडले नसले तरी, प्रबंध मान्य करावा लागला. वंशवाद हाच ज्यूंच्या शिरकाणाचे मूळ होता, जो इरावती बाईंनी पुराव्याने अयोग्य असल्याचे सिद्ध केले.
त्यांनी अण्णा आणि बाया कर्वे (त्यांचे सासू-सासरे) यांच्यावर एक सुरेख लेख लिहिला आहे. दोघांच्या कार्याचा आणि समर्पणाचा आदर व्यक्त करत त्या शेवटी लिहितात, केवढे माझे भाग्य! मी अशा माणसाची सून झाले, “केवढे महत्तर माझे भाग्य, मी अशा माणसाची पत्नी झाले नाही.” पुढे महर्षी कर्व्यांना पद्मभूषण मिळाले आणि त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी भारतरत्न मिळाले. त्यावेळी दिल्लीहून त्यांच्यासाठी आलेले पत्र पत्ता मिळाला नाही म्हणून परत गेले होते. अण्णांच्या हयातीतच लोक त्यांना विसरू लागले, असे त्या खेदाने म्हणतात.
या एका ओळीत त्या बरेच काही सांगून जातात. जर्मनीतून परत आल्यावर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत त्यांना काम करावे लागले, पण नंतर त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये आवडीचे काम मिळाले. त्या प्राध्यापक झाल्या.
भारतीय कोण आहेत? याविषयी त्यांना उत्सुकता होती. ‘जन्मांतरीची गोष्ट’ या लेखात त्यांना मानवी सांगाडे कसे मिळाले? त्याची रोमहर्षक कहाणी लिहिली आहे. हजारो वर्षे झाली तरी स्त्रीची परिस्थिती बदलली नाही, असे सांगताना त्या कोवळ्या मुलीच्या सांगाड्याला त्या विचारतात, ‘तू ती मीच का गं?’
त्या काळी स्त्रियांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या तर उन्हातान्हात रानोमाळ भटकत होत्या. तेव्हा त्यांच्यासमोर तर अडचणींचा डोंगर होता. पुरातत्वीय पुरावे शोधायला त्या मुलांना घेऊन जात. या सर्व संशोधनात पती दिनकररावांची समर्थ साथ होती.
त्यांचे अनेक लेख अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाले, जे खूप गाजले. स्त्री आणि संस्कृती, वाटचाल, बीजक्षेत्र, गौराई, जुळी मुले, स्त्रीराज्य स्त्रीमनाचा वेध घेणारे लेख आहेत. त्यापैकी परिपूर्ती लेख आणि त्यातले शेवटचे वाक्य, ‘“ही नंदूची आई” असे कोणीतरी म्हणाले,’ याबद्दल माझी धारणा वेगळी होती. पण त्यांनी हे वैतागाने लिहिले आहे, हे पुस्तक वाचून समजले. त्या म्हणतात, माझ्या लेखात समाजशस्त्र आणि मानवशास्त्र अभ्यासाची दृष्टी आहे. वरवर संस्कृतीची आवरणे घेतलेल्या पण मनातून रानटी पौरुषाची पूजा करणाऱ्या तरुणी आणि सुसंकृत अहिंसक झालेले तरुण यांची जोडी एकत्र कशी नांदणार? असे त्या म्हणतात. गांधीजींच्या आश्रमातले नन सारखे जीवन त्यांना निसर्ग नियमांच्या विरुद्ध वाटते.
डॉ. सांकलिया पुरातत्व विषयात आदराने घेतले जाणारे नाव आहे. त्यांच्याबरोबर इरावती बाई संशोधन करत होत्या. माझे सामाजिक देणे मी संशोधनातून फेडते आहे, असे त्यांनी लिहिले आहे. ज्या देशातील लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र, असे त्या म्हणत. नास्तिक असून सुद्धा विठ्ठलाला तर बॉयफ्रेंड म्हणत. त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. देशविदेशीच्या संशोधकांनी त्यांची स्तुती केली आहे. एकूण 3054 व्यक्तींची अठरा प्रकारची मापे आणि रक्ताचे नमुने तपासल्यावर त्यांनी महाराष्ट्रातल्या संस्कृतीबद्दल निष्कर्ष काढले. जेथे जेथे समाजकल्याणाचे नाव पुढे करून व्यक्तींची तोंडे बंद करतात, देशहिताची सबब पुढे करून एखाद्या जमातीवर भयंकर अन्याय केला जातो, तेथे खास असे समजायचे की लोकशाही संपून अधिकारशाहीला सुरुवात झाली, असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यांची बहुपत्नीत्वाबद्दलची मते मात्र पटत नाहीत. त्या स्त्रीवादी असून सुद्धा त्यांनी बहुपत्नीत्व कसे योग्य ठरवले?
‘’टिळक आगरकरानी अत्यंत साधी राहणीमानाचा गाजावाजा केला नाही. अंत:करण शुद्धीसाठी गाजावाजा करून उपास करण्याची गरज नाही,’’ ही त्यांची मते गांधीविरोधी वाटली. त्यांनी हिंदी राष्ट्रभाषा करायला विरोध केला होता. भारतातल्या सर्व भाषा एका लिपीत आणाव्यात असा आग्रह केला होता.त्यां नी दोन पिढ्या आणि आम्ही बायका, हे दोन लेख लिहिले. आम्ही बायका या लेखात त्यांनी विधवांची स्थिती, मुलींचे शिक्षण हे विषय चर्चिले आहेत. मुलींसाठी वेगळे विद्यापीठ असावे का? यावर त्यांनी समतोल विचार मांडले आहेत. धर्माबद्दल त्यांनी लिहिलेल्या लेखात माणसाने समाजात वागायचे नियम म्हणजे धर्म अशा अर्थाने लेखन केले आहे, जे प्रगल्भ आहे. लोककल्याण, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा, गोवंश याबद्दल त्यांनी प्रांजळ मते मांडली आहेत. त्यांनी अमेरिकेत बर्कलेमध्ये भारतीय जातीव्यवस्थेबद्दल भाषणे दिली होती. त्याचे पुस्तक Hindu society an interpretation या नावाने प्रसिद्ध झाले.
त्यांनी आयुष्यभर भारतीय समाजाची संरचना आणि इतिहास यांचा अभ्यास केला. अनेक प्रबंध वाचले. समाज शास्त्रीय साखळी जुळवली. भाषांचा अभ्यास केला. हे सर्व या पुस्तकात आहे. आपण भारतीय कोण आहोत आणि आहोत तसे का आहोत, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला आणि शेवटी उत्तर मिळवले. भारतातल्या जातींचे वर्णन करताना, त्या गोधडीची उपमा देतात. गोधडीत जसे एकच रंगाचे आणि आकाराचे तुकडे असतात, पण त्यात कुणाच्या पोलक्याचा तर कुणाच्या साडीचा, कुणाच्या सदऱ्याचा तुकडा असतो. किती समर्पक उपमा आहे. जाती आणि वर्ण याबद्दल त्यांनी चिंतन करून त्यांनी निष्कर्ष काढला की, जाती एका मोठ्या जातीतून निर्माण झालेल्या नसून त्या स्वतंत्र आहेत, त्यांचा एक जातीपुंज आहे. इंग्रजीत त्याला cast cluster असे म्हटले आहे. जातसमूह ही जनुकीय श्रेणी नसून ती एक सामाजिक ओळख आहे, हे फार महत्त्वाचे वाक्य आहे.
डॉ. मुटाटकर यांनी इरावती बाईंचे चरित्र लिहिले आहे. भारतातला पहिला वैद्यकीय मानवशास्त्रज्ञ अशी ओळख डॉ. मुटाटकरांना मिळाली ती इरावती बाईंमुळे.
त्या विद्यार्थ्यांना आईसारख्या वाटत असत. विद्याधर पुंडलिक आणि रागिणी बाई यांनी त्यांच्या खूप आठवणी लिहिल्या आहेत. इरावती बाई पुण्यातली पहिली स्कूटर चालवणारी स्त्री. त्या स्कूटर चालवत असल्यामुळे हे बायकांचे वाहन, अशी समजूत झाली आणि काही काळ पुण्यात या स्कूटर विकल्या गेल्या नाहीत, अशी तक्रार दुकानदाराने दिनकर कर्व्यांकडे केली.
युगांत हे त्यांचे महाभारतातील पात्रांवरच्या लेखांचे पुस्तक. गांधारी, द्रौपदी, सत्यवती, कुंती या सर्व स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अपार दुख सहन करावे लागले, हे मत त्यांनी मांडले. कृष्ण खऱ्या अर्थाने गीता जगला, असे त्या म्हणतात. भांडारकर संस्थेची महाभारताची क्रिटीकल आवृत्ती त्यांनी संदर्भासाठी वापरली. याचे कारण देताना त्या म्हणतात, पन्नास वर्षे संशोधन करून हजार हस्तलिखितांचा अभ्यास करून, ही आवृत्ती लिहिली आहे.
हेही वाचा – Bookshelf : वलय… सर्वच कथा सशक्त
रामायणावर त्यांनी काही लेख लिहिले. भरत आणि राम भेटल्यावर भरत, रामाला राज्य सोपवतो, इथे रामायण संपते, असे त्यांचे मत आहे. कुश, लव आणि कुशीलव हे दोन वेगळे संदर्भ असलेले शब्द आहेत.
कोयना धारण विस्थापितांवर त्यांनी त्या भागातल्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. सर्व्हे करून अहवाल सादर केला. धरणग्रस्तांचे जीवनमान उंचावण्याऐवजी खालावले, हे लक्षात आणून दिले. त्यांच्या अभ्यासात त्रुटी जाणवल्या, पण त्यांनी वंचितांवरच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त करून दिले.
आज ज्या भारतीयांना भारत ही आपली भूमी वाटते ते भारतीय, अशी सोपी व्याख्या त्यांनी केली. माझा पिंड स्त्रीचा. सृजन, संगोपन आणि संवर्धन ही भाषा मला कळते आणि पटते, असे सांगत त्या विविधतेत एकता, हेच सूत्र देशासाठी आवश्यक आहे, हे सिद्ध करतात. आपण सगळे मंग्रोल्स आहोत. सर्व जातीच्या लोकांना एकसारखे कपडे घालून उभे केले तर त्यांना वेगवेगळे ओळखता येणार नाही, हे त्या ठामपणे सांगतात.
असे असले तरी दुर्गाबाई भागवतांनी इरावती बाईंवर कडाडून टीका केली, त्यांचे संशोधन खोटे ठरवले. कडक शब्दात त्यांनी निंदा केली आहे. द्वेष असावा का? याबद्दल आश्चर्य कमी, वैषम्य अधिक वाटते. दुर्गाबाईंची टीका पूर्वग्रहदूषित वाटते.
इरावती कर्वेंचे चरित्र वाचताना जाणवते, ती त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि संशोधकाची वृत्ती. सर्व स्त्रियांप्रमाणे त्यांनाही पत्नी, सून, आई या भूमिका निभावाव्या लागल्याच; पण त्याबरोबर त्यांनी आपले संशोधनाचे कार्य चिकाटीने पूर्ण केले. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, ध्येय निष्ठा आणि आत्मविश्वास हे गुण प्रकर्षाने जाणवत राहतात. त्यांना पतीची समर्थ साथ मिळाली, हे भाग्य… त्यांचे आणि आपलेही. त्यामुळे इतके संशोधन होऊ शकले. पुरातत्व, मानववंश या विषयांत मोलाची भर त्यांनी घातली. तीही त्या काळात जेव्हा स्त्रियांना प्रवासात मुलभूत सुविधा सुद्धा मिळत नव्हत्या, स्त्रिया नुकत्याच शिकू लागल्या होत्या, अर्थार्जन करू लागल्या होत्या.
इरावतीबाईंबद्दल ऐकीव माहिती असल्यामुळे, युगांत सारखी पुस्तके वाचल्यामुळे आणि पुरातत्वात रस असल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा वाटत होती. हे पुस्तक वाचल्यावर कुतूहलाची जागा अतीव आदराने घेतली आहे आणि मनोमनी त्यांना चरणस्पर्श करून वंदन केले आहे.
हे पुस्तक वाचायला हवे, कारण अशी अलौकिक व्यक्तिमत्व आपली लहानशी आयुष्य समृद्ध करत असतात.


