सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥2॥
जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥47॥ आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥48॥ मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥49॥ तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥50॥ परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥51॥ पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आलें तरी न वचे । आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥52॥ येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥53॥ एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥54॥ तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य । आणि स्वसुख वरि धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥55॥ ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरों लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥56॥
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥3॥
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरूनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥57॥ कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेची घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥58॥ नातरी निदैवाचां परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥59॥ तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ॥60॥ बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें ॥61॥ तैसीं अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवती बापुडीं । म्हणोनि जन्ममरणाचिये दुथडी । डहुळितें ठेलीं ॥62॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अहो चंद्रकांतु द्रवता करि होये, परि ते हातवटी चंद्री कीं आहे
अर्थ
हे (ज्ञान) सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट, प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, अनायासे आचरण करता (मिळावता) येणारे आणि क्षयरहित आहे. ॥2॥
जे स्वरूपज्ञान या सर्व विद्यांच्या गावामध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्यपदावर (अधिष्ठित) आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे आणि जे पवित्र गोष्टींचा राजा आहे ॥47॥ आणि जे धर्माचे स्वत:चे राहाण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे सर्व उत्तम पदार्थांत उत्तम आहे आणि ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन: दुसर्या जन्माचे काम (उरत) नाही, ॥48॥ गुरुमुखातून ते ज्ञान अंमळसे उगवताना दिसते, पण ते हृदयांत मूळचे सिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. ॥49॥ त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायर्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चयेकरून भोगणेही संपते. ॥50॥ परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते, असे ते (स्वरूपज्ञान) कष्टावाचून मिळाणारे आणि सोपे असून, शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. ॥51॥ अर्जुना, याचे आणखीही एक माहात्म्य आहे. ते असे की, जे प्राप्त झाले असता कधी (हातातून) जात नाही आणि अनुभविले असता काही सुद्धा कमी होत नाही आणि शिवाय त्यात काही विकारही उत्पन्न होत नाहीत. ॥52॥ तर्ककुशल अर्जुना, या ठिकाणी जर तू अशी शंका घेशील की, एवढी ज्ञानासारखी वस्तू (तिचा) अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली? ॥53॥ शंभराला एक व्याज मिळून एकशे एक रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीसारख्या धोक्यात उडी घालतात, असे जे लोक, ते कष्टावाचून मिळणारी स्वरूपसुखाची गोडी कशी टाकतील? ॥54॥ तरी पवित्र आणि रम्य, त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे स्वसुख, परंतु धर्माला धरून मिळणारे, शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते. ॥55॥ याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकारक आहे, तर ते लोकांच्या सेवनातून राहिले कसे? ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. ॥56॥
हे शत्रुतापना, या (आत्मज्ञानरूपी) धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता मृत्यूरूप संसाराच्या मार्गावर परत येतात. ॥3॥
अर्जुना, (असे) पाहा की, दूध हे पवित्र असून, शिवाय गोड आहे आणि ते जवळच (सडांच्या) कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतु गोचीड ते टाकून देऊन रक्तच पीत नाही काय? ॥57॥ किंवा कमळकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमलातील परिमळ (दूरचे) भुंगे येऊन सेवन करून जातात आणि जवळच असलेल्या बेडकांना (मात्र) चिखलच शिल्लक राहातो. ॥58॥ अथवा, दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथे राहून उपवास काढतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठितो. ॥59॥ त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी (सर्वांच्या) हृदयात असताना (त्या मला न जाणून) मूर्ख लोक (सुखाकरिता) विषयांचीच इच्छा करतात. ॥60॥ मोठे मृगजळ डोळ्यांना दिसल्यावर अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा अथवा गळ्यात बांधलेला परीस, शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा ॥61॥ त्याप्रमाण ‘मी आणि माझे’ या नादात दंग झालेले ते दीन लोक मला येऊन मिळत नाहीत आणि म्हणूनच ते जन्ममरणरूप या दुथड्या असलेल्या नदीत (संसारात) गटांगळ्या खात राहिले आहेत. ॥62॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें…


