मानसी देशपांडे
लेखनाचं जग हे किती सुंदर आहे हे मला व.पु. काळे यांचे विचार वाचल्यावर समजलं. तसं कवितेचं जग हे देखील तितकंच भावस्पर्शी आहे, हे शांता शेळके यांच्या कविता वाचून समजलं. जी व्यक्ती प्रेमात पडते त्यांचं विश्व हे किती रंगीबेरंगी असतं, तिथे क्षणिक रुसवे-फुगवे देखील असतात. कारण, प्रेमाच्या या जगात जितका सहवास महत्वाचा आहे, तितकंच एखादी व्यक्ती जेव्हा काही क्षणांसाठी जरी दूर होते, तेव्हा निर्माण होणारी हूरहूर सुद्धा लक्षात घेतली जाते. व.पु. या वर म्हणतात, “प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो…” कसं असतं, प्रेमात वचनं असतात, जाणीवा असतात तसंच काही भेटी या नि:शब्द करणाऱ्या असतात. तुमची जवळची व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे, पण केवळ तिच्या जवळ असल्यामुळे अनेकदा शब्द ओठांपर्यंत येतात, पण बाहेर पडत नाहीत. यालाच तर प्रेम म्हणतात ना! पण एक असतं, तुमचे डोळे हे अनेकदा शब्दांचं प्रतिनिधित्व करतात. मग ओठ मूक झाले तरी डोळ्यांतून संवाद सुरूच असतो. नेमकं हेच शांताबाईंनी आपल्या “हे विश्व प्रेमिकांचे…” या कवितेतून सांगितले आहे-
“असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे…
शब्दांविना परंतु, बोलून सर्व जावे..”
विरह हा मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, जेव्हा आयुष्यात येतो, तेव्हा कितीतरी स्वप्नं ही अपूर्ण राहतात. ती अतृप्तता शब्दांत व्यक्त होण्यासारखी नसते! खऱ्या प्रेमात नेहमी समर्पण वृत्ती असली पाहिजे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे नुसतं सांगितले म्हणजे प्रेम असते का? ते तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे… तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी कधी एखादा त्याग करावा लागला तर, तो सुद्धा हसत हसत करता येणं म्हणजे खरे प्रेम! म्हणून तर जसं व. पु. म्हणतात, “प्रेम म्हणजे मरण असतं. ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे त्याने प्रेम करावं…” विरहात देखील आपल्या माणसाच्या सुखाचा विचार करणं, यासाठी सुद्धा मोठं मन असावं लागतं. इथे कवयित्री शांताबाईंनी म्हटलं आहे,
“अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे,
विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे….”
व. पुं.नी एक विचार मांडला आहे, “कित्येकदा एकमेकांशी कडाडून भांडलो, पण एकमेकांशिवाय नाही कुठेच रमलो…” आयुष्य एकट्याने काढणं सोपं नाही. काही वाद जरी झाले तरी, वादामागे फक्त प्रेमच असतं. बराच वेळ घरात तुमचा जोडीदार आला नाही तर, मन सैरभैर होते… नको नको ते विचार मनात थैमान घालतात… अशा वेळी वाद मागे सरतो आणि प्रेम जिंकते. ते क्षण पटकन जावे, असं वाटतं. ती हूरहूर मन इतके बेचैन करते की, त्यावर औषध हे फक्त जोडीदाराची भेट असते. शांताबाईंचे यावर व्यक्त होणं म्हणजे आत्ताच्या काळातील आमच्या मनातील भावना आहे,
“फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती,
होता क्षणिक दूर, वेडी मनात भीती,
दिनरात चिंतनाचे, अनिवार कौतुकाचे,
विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे…”
स्पर्शात इतकी ताकद असते की, न सुटलेली कोडी देखील लगेच सुटतात. खरंच, काही वेळा वाटतं माणसाला डोळ्यांची भाषा समजत असती तर, किती बरं झालं असतं? काही वेळा घटना अशा घडतात की, एका हळूवार स्पर्शाची खूप गरज असते. कारण, नात्यात कधी दुरावा आला तर, त्याचा परिणाम थेट मनावर होतो. एकमेकांची इतकी सवय झालेली असते की, मनावर कधी सुरकुत्या पडतात हेच कळत नाही. काळाला थांबवणे हे निश्चितच आपल्या हातात नाही, पण हृदयात जी धडधड सुरु असते तिचं काय करायचं? जेव्हा काही काळानंतर दुरावा संपतो, तेव्हा फक्त एका स्पर्शाने अंगावर सुखाचे रोमांच उठतात. डोळे आपलं कार्य करत असतातच पण, स्पर्शाची जादूही काही निराळीच!!
“दूरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा,
स्पर्शाविना सुखाने, हा जीव मोहरावा…”
दोन जीवांच्या म्हणा किंवा प्रेमी युगुलांच्या मनातील भाव हे काव्यात अचूक रितीने उतरवणं म्हणजे कसबच म्हणायला हवं. प्रेमाचा संबंध थेट मनाशी येतो. याला कारण ते पटकन गुंतते. व. पु. म्हणतात, “मन.. म म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे नष्ट होत नाही, मरेपर्यंत नष्ट होत नाही ते मन…” मग जेव्हा या मनावर काही परिणाम होतात, तेव्हा ते मन कधी प्रेमात बेभान होते तर, कधी क्षमा करताना आभाळाएवढे मोठे होते. प्रेमाची भावना प्रेमिकेच्या मनात कशी निर्माण झाली, हे तिचं तिलाच समजलं नाही… सांगायला जावं तर, शब्द ओठांआड लपतात, मग मार्ग काय तर डोळे आणि चेहरा… हे सर्वच भाव शांताबाईंनी या कवितेतून खूप छान व्यक्त केले आहेत. “प्रेम म्हणजे नेमके काय तर, समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं…” कारण, या प्रेमाच्या जगात ओठांवर स्मितहास्य आणतं ते एकमेकांवरचे निस्सीम प्रेम… शेवटी काय तर, हा जन्म सार्थकी तेव्हाच लागतो जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्रेम हे समुद्राइतके विशाल आहे ही जाणीव होणं…
“ओठी फुलून यावे, स्मित गोड सार्थकाचे,
विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे…”