रविवारी (01 जून 2026) एक आणखी कर्णमधुर आवाज काळाच्या पडद्याआड गेला. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मागील शतकातील सदाबहार संगीत युगाचा अंत झाला आहे, असे म्हणावे लागेल. आवाजातील गोडवा आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेले साधर्म्य, यामुळे त्यांना ओळख तर मिळाली आणि त्या प्रस्थापितही झाल्या, पण तरीही त्या काहीशा मागेच राहिल्या.
कुणासारखं तरी असणं हे फारसं फलदायी नसतं. कारण, सुमन कल्याणपूर यांचा मूळ आवाज जो लता मंगेशकर यांच्या अत्यंत जवळचा आणि तितकाच सुश्राव्य होता… पण लतादिदी संगीत जगताच्या केंद्रस्थानी विराजमान होत्या. कदाचित, सुमनजींनी जर एखादी वेगळी वाट निवडली असती, तर आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासारखे अढळ स्थान त्यांना नक्कीच मिळाले असते.
या गोष्टीची प्रचिती या तथ्यावरूनही येते की, 1960च्या दशकात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात मानधनावरून वाद झाला होता. त्या काळात दोघांनी एकत्र गाणे बंद केले होते. रफीसाहेबांसोबत गाण्यासाठी संगीतकारांना लतादिदींसारख्याच ताकदीच्या आणि गोड आवाजाची गरज होती. ही उणीव सुमन कल्याणपूर यांनी भरून काढली आणि जशी द्वंद्वगीते सुमनजींच्या वाट्याला आली, तशी ती नंतर लता मंगेशकर आणि रफी यांच्यातील वाद मिटताच अचानक मिळणे बंद झाली. त्यानंतरच्या काळात त्यांना त्या दर्जाच्या गायकीच्या संधी खूप कमी मिळाल्या.
हेही वाचा – एक अकेला इस शहर में…
तरीही, या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही की, त्या एक अत्यंत लाजवाब आणि सुरील्या पार्श्वगायिका होत्या. कानांना तृप्त करणारा आणि शास्त्रीय रागांची उत्तम जाण असलेला तो आवाज होता! 1950, 1960 आणि 1970च्या दशकात त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली.
त्यांची काही अविस्मरणीय गाणी आठवून पहा :
- ‘जूही की कली मेरी लाडली’ (दिल एक मंदिर)
- ‘शराबी शराबी ये सावन का मौसम’ (नूरजहाँ)
- ‘मन गाए वो तराना जिसे सुनकर आ जाना’ (चालाक)
- ‘अपने पिया की मैं तो बनी रे जोगनिया’ (कण कण में भगवान)
- ‘मेरे महबूब ना जा’ (नूर महल)
- ‘ना तुम हमें जानो’ (बात एक रात की)
- ‘पहला पहला प्यार है’ (बदतमीज)
- ‘नींद उड़ जाए तेरी चैन से सोनेवाले’ (जुआरी)
- ‘कहती है झुकी झुकी नज़र’ (जिंदगी और ख्वाब)
- ‘मेरे संग गा, गुनगुना कोई गीत सुहाना’ (जानवर)
- ‘चले जा चले जा चले जा’ (जहाँ प्यार मिले)
- ‘दिल गम से जल रहा है’ (शमा)
- ‘तारों की गोरी चाँद की गुड़िया’ (देखा प्यार तुम्हारा)
- ‘जो हमपे गुज़रती है’ (मोहब्बत इसको कहते हैं)
- ‘पाकीजा’ चित्रपटाच्या पाकीज़ा रंग बरंग’ मधील त्यांचे ते अनोखे गाणे ‘गिर गई रे मोरे माथे की बिंदिया..’
तसेच त्यांची सदाबहार द्वंद्वगीते :
- ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ (ब्रह्मचारी)
- ‘तुमने पुकारा और हम चले आए’ (राजकुमार)
- ‘ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे’ (जब जब फूल खिले)
- ‘चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना’ (दिल ही तो है)
- ‘दिल एक मंदिर है’ (दिल एक मंदिर)
- ‘अंखियों का नूर है तू’ (जौहर महमूद इन गोवा)
- ‘अजहुं ना आए बालमा, सावन बीता जाए’ (सांझ और सवेरा)
- ‘मनमोहन मन में हो तुम्हीं’ (कैसे कहूँ)
- ‘ये किसने गीत छेड़ा’ (मेरी सूरत तेरी आँखें)
- ‘ठहरिए होश में आ लूं तो चले जाइएगा’ (मोहब्बत इसको कहते हैं)
- ‘बाद मुद्दत के ये घड़ी आई’ (जहाँआरा)
लता मंगेशकर आणि सुमनजींच्या आवाजात इतके साधर्म्य इतके होते की, अनेकदा मोठे कानसेन आणि सामान्य रसिकही फसत असत. सुमनजी आणि लतादिदी यांच्या आवाजाची मूलभूत पट्टी आणि पोत कमालीचा सारखा होता. दोघींच्याही आवाजात एक प्रकारची दैवी नितळता, उच्च पातळीवरील सुस्पष्टता आणि गाण्यातील शब्दांना अचूक न्याय देण्याची क्षमता होती. जेव्हा सुमनजी वरच्या पट्टीत गात असत, तेव्हा त्यांचा आवाज हुबेहूब लतादिदींसारखाच भासत असे. दोघींचेही सांगीतिक संस्कार आणि शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होता. त्यामुळे गाण्यातील हरकती, मुरक्या आणि ताना घेण्याची दोघांची शैली खूप अंशी मिळतीजुळती होती.
या आवाजातील साधर्म्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘ममता’ या हिंदी चित्रपटातील ‘रहें ना रहें हम’ हे गाणे आहे. संगीतकार रोशन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या या चित्रपटात या गाण्याची एकूण तीन व्हर्जन आहेत :
- पहिले सोलो व्हर्जन : चित्रपटात हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे.
- डुएट व्हर्जन : याच गाण्याचे एक लहान व्हर्जन सुमन कल्याणपूर आणि महंमद रफी यांनी एकत्र गायले आहे.
- दुसरे सोलो व्हर्जन – लता मंगेशकर यांच्या आवाजातीलच हे दुसरे गाणे आहे.
सुमन कल्याणपूर आणि रफीसाहेबांनी गायलेले व्हर्जन ऐकताना, ते गाणे लतादिदी आणि रफी यांनीच गायले आहे, असा थेट भास होतो.
लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्यात प्रत्यक्ष किंवा जाहीर असा कोणताही वाद कधीही नव्हता. मात्र, त्या काळात चित्रपटसृष्टीत त्यांच्यातील कथित ‘शीतयुद्धा’बद्दल अनेक चर्चा आणि अफवा रंगल्या होत्या. 1960च्या दशकात लता मंगेशकर यांचे चित्रपटसृष्टीवर एकछत्री साम्राज्य होते. त्याच वेळी सुमन कल्याणपूर यांचा आवाज हुबेहूब लतादिदींसारखा असल्याने काही संगीतकारांनी लतादिदींना पर्याय म्हणून सुमनजींना संधी देण्यास सुरुवात केली. विशेषतः, जेव्हा लतादिदींचे काही कारणाने संगीतकार (उदा. एस. डी. बर्मन) किंवा सहगायकांसोबत वाद झाले, तेव्हा सुमनजींना जास्त गाणी मिळाली. यामुळे, “लतादिदींनी स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी सुमन कल्याणपूर यांचे करिअर मागे पाडण्याचा प्रयत्न केला,” अशा चर्चा सुरू झाल्या.
काही निर्माते आणि संगीतकार स्वतःच्या सोयीसाठी लतादिदींच्या नावाचा आडोसा घेत असत, ज्यामुळे या अफवांना जास्त खतपाणी मिळाले. यात स्वतः सुमन कल्याणपूर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केले आहे की, “त्यांच्या मनात लतादिदींबद्दल कमालीचा आदर होता आणि लतादिदींनी त्यांचे करिअर कधीही जाणीवपूर्वक खराब केले नाही.” आवाजातील साधर्म्याबद्दल बोलताना सुमनजी म्हणाल्या होत्या, “माझा आवाज लहानपणापासूनच असा नाजूक आणि बारीक होता, त्यात मी काहीच करू शकत नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना लतादिदींची गाणी गायचे, त्यामुळे त्यांच्या गायकीचा प्रभाव माझ्यावर असणे स्वाभाविक होते. पण मी कधीही त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही.” परंतु हे सांगतानाच, त्यांनी रेडिओ सिलोन आणि रेकॉर्ड कंपन्यांच्या चुकांबद्दलही खंत व्यक्त केली होती, कारण अनेकदा सुमनजींच्या गाण्यांवर चुकून लता मंगेशकर यांचे नाव छापले जायचे, ज्यामुळे लोकांमध्ये अधिक संभ्रम निर्माण व्हायचा.
दुसरीकडे, लता मंगेशकर यांनीही एका मुलाखतीत अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की, “कोणत्या गाण्यासाठी कोणत्या गायकाला घ्यायचे, हा पूर्णपणे संगीतकार आणि दिग्दर्शकांचा निर्णय असायचा. मी कधीही कोणाचे काम हिरावून घेतले नाही.” उलट, सुरुवातीच्या काळात स्वतः लतादिदींनी त्यांचे कौतुक केले होते. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर लतादिदींनी गमतीने म्हटले होते की, “सुमनजींचा आवाज ऐकून त्यांना काही क्षणांसाठी स्वतःचाच भास झाला होता.”
थोडक्यात सांगायचे तर, दोघींनीही एकमेकांबद्दल नेहमीच आदर राखला. जरी त्यांच्या आवाजात साधर्म्य असले, तरी सुमन कल्याणपूर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान स्वतःच्या बळावर अत्यंत मोलाचे आणि अजरामर आहे. रसिकांच्या मनात त्यांचे स्थान आजही अढळ आहे.
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
सुमनजींचे गाणे म्हणजे केवळ पार्श्वगायन नव्हते; ती सुरांची एक नितांत सुंदर, सात्विक आणि हळूवार साधना होती. अशोक परांजपेलिखित आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर…’ या शब्दांतील निसर्गाची व्याकुळता सुमनजींनी आपल्या आवाजातून अशी काही जिवंत केली की, ऐकणाऱ्याचे मन नकळत भावविभोर होऊन जाते.
आज त्या देहाने जरी आपल्यात नसल्या, तरी त्यांनी मागे ठेवलेला हा सांगीतिक ठेवा कधीही संपणारा नाही. सुमनजी चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात राहूनही नेहमीच एका संयमी, शांत आणि प्रसिद्धीपराङ्मुख आयुष्य जगल्या. त्यांनी कधीच कोणाशी वाद घातले नाहीत किंवा त्यांच्या क्षेत्रातील कुठल्याही कलाकाराचा राग किंवा अपमान त्यांनी केला नाही. तसेच, सुमनताईंनी कधीच कोणाला नावे देखील ठेवली नाहीत.
त्यांच्या जाण्याने आकाशातले मेघही गहिवरले असतील. या सात्विक आणि गुणी गायिकेबद्दल मी इतकचं म्हणेन की, त्यांचे जगणे एखाद्या तपस्विनीसारखे होते, हे सांगताना मला त्यांनीच गायलेल्या एकनाथांच्या अभंगाचे बोल आठवतात,
“देह शुद्ध करूनी भजनी भजावे, आणिकांचे नाठवावे दोषगुण…”


