रांगोळी म्हटलं की, आजकाल मोठमोठ्या रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या डोळ्यांसमोर येतात. पायघड्यांसारख्या रांगोळ्या घातल्या जातात. त्याचबरोबर धान्याच्या, फुलांच्या रांगोळ्या पण मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. याच मोठ्या रांगोळ्यांचे छोटे स्वरूप सणावाराला घराच्या दारासमोर दिसते.
पण खरंच रांगोळी आणि आपले खूप जवळचे नाते आहे, हे रांगोळी काढताना लक्षात येते. सकाळी उठले की, पहिले सडा-रांगोळी हे महत्त्वाचे काम. मला असे वाटते की, कालची रांगोळी आधी गोळा करायची (खराट्याने नाही बरं का. त्याचे फरशीवर ओरखडे उमटतात.) नंतर व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर सडा टाकायचा. त्यावर सुबक अशी रांगोळी काढायची. ती पण ठिपक्यांची. यामागे असे तर नसेल ना? कालचे सर्व “रात गयी बात गयी” याप्रमाणे विसरून जायचे. फडक्याने म्हणजे अलगद पद्धतीने कुठेही मनावर ओरखडा न उमटू देतां रांगोळी उचलून घ्यायची. सडा टाकायचा म्हणजे थोडेफार कुठे काही राहिले असेल तर, ते पुन्हा उडू द्यायचे नाही. सुबक रांगोळीने म्हणजे छान मनाने नव्याने सुरुवात करायची.
लहान असताना “पोरगी एकदम बारीक छान रेष काढून रांगोळी काढते म्हणजे पुढे संसार पण असाच आखीव रेखीव करेल…” असे वाक्य कानी पडायचे.
रांगोळी आणि त्यामध्ये भरलेले रंग आपले मन अगदी मोहून टाकते. आपल्या हिंदू धर्मात दारासमोर आणि तुळशीवृंदावन समोर रांगोळी काढणे, हे शुभ मानले जाते. रांगोळी हा सर्वांचाच अगदी आवडता विषय आहे. भारतात प्रत्येक सणाला दारासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे ही एक कला आहे. जेव्हा आपण रांगोळी काढत असतो, तेव्हा आपोआप आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते. रांगोळी काढताना आपण अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने रांगोळी काढत असतो. बोटाची ज्ञानमुद्रा तयार होते, त्यामुळे आपल्या मेंदूला सकारात्मक ऊर्जा मिळते, आपण तणावातून मुक्त होतो. तसेच, हाय ब्लडप्रेशरमधून दिलासा मिळून आपल्याला मन:शांती मिळते.
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
घरासमोरील रंग भरलेली रांगोळी घरात येणारी नकारात्मक ऊर्जा रोखते. रांगोळीमध्ये आपण त्रिकोण, चौकोन, आयात असे विविध आकार काढतो त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती बाहेरच्या बाहेर निघून जाते. म्हणून पूर्वीच्या काळापासून घरासमोर रोज सडा आणि रांगोळी काढली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणली जाते.
रांगोळी डोळ्यांना आल्हाद आणि मनाला उत्तेजन देते. रांगोळीचा पांढरा रंग शुभ मानला जातो.
हिरवा रंग – मंगलदायक
लाल रंग – शक्तिशाली
पिवळा रंग- मंगलकार्यात शुभ
रांगोळीतल्या आकृत्या-चिन्हांचे विशेष अर्थ आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कोणत्या दिवशी आणि कुठे कोणती रांगोळी काढावी, याचेही नियम होते. रोज देवापुढे आणि घराबाहेर देवीची पावलं रेखाटावीत. देवीची पावलं रेखाटताना उजवं पाऊल पुढे तर डावं पाऊल जरासं मागे काढलं पाहिजे. डाव्या पावलावर हळद वाहावी. उजव्या पावलांवर कुंकूसोबत शंख, स्वस्तिक आणि कमळ रेखाटावं…
- सोमवार – बेलाचं पान, नागराज आणि त्रिशूल-डमरू या भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू रांगोळीच्या माध्यमातून रेखाटाव्यात.
- मंगळवार आणि शुक्रवार – या देवीच्या वारी कमळाची रांगोळी, पण जरा नवीन पद्धतीने काढावी.
- बुधवार – विष्णूचं वाहन म्हणून गरूड काढलं जातं.
- गुरुवार – कमळ, ज्ञानकमळ, गोपद्मं काढावीत.
- रविवार – यादिवशी सूर्यदेवता काढली जाते.
- नागपंचमीला नागदेवतेची रांगोळी काढतात. पाच ठिपके, पाच ओळी काढून ठिपक्यांच्या मधे दोन उभ्या तसेच दोन आडव्या रेषा काढून त्या गोलाकार पद्धतीने जोडल्या जातात.
महाराष्ट्रात रांगोळीचे आढळणारे काही मुख्य प्रकार –
- ठिपक्यांची रांगोळी
- संस्कारभारती रांगोळी
- चैत्रांगण
- पानाफुलाची रांगोळी
- पोट्रेट रांगोळी
- बॉर्डर रांगोळी
- साधी रांगोळी
- धान्याची रांगोळी
- पाण्यातील रांगोळी
- तरंगणारी रांगोळी
- फ्री हॅंण्ड
- स्टिकर
- लाकडी रांगोळी
असे कितीतरी प्रकार आपण बघतो. ‘चैत्रांगण’ या नावातच ही चैत्र महिन्यात अंगणात काढायची रांगोळी हा अर्थ अभिप्रेत आहे. ही रांगोळी तशी अंगणभर काढायची नसते. ही रांगोळी अंगणात तुळशीजवळ काढतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी ही रांगोळी काढावयास सुरूवात करून अमावस्येपर्यंत म्हणजे महिनाभर ही रांगोळी काढतात. या रांगोळीमध्ये आपल्या संस्कृतीची जवळजवळ 50 शुभचिन्हे आहेत. जसे की चंद्र, सूर्य, स्वस्तिक, शंख, चक्र, गदा, पद्म आहेत. तसेच पूजा साहित्यातील कलश, हळद-कुंकू करंडे, पाट, समई, गणपती, मारुती या देवता आणि महादेवाची पिंड आहे. शिवाय, चैत्रगौरीची पाळणा पण आहे. त्रिशूळ, परशू, धनुष्य, गदा ही देवदेवतांची शस्त्रे आहेत. गाय वासरू, नागदेवता या प्राण्यांना पण या रांगोळीत स्थान आहे. ही रांगोळी काढल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी शांतता नांदते. उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण वर्षभर घरात रहावे म्हणून वर्ष प्रतिपदेपासून ही रांगोळी काढावयास सुरुवात करतात.
खरंतर रांगोळीविषयी लिहिताना अनेक गोष्टी लक्षात येतात, त्यातीलच ही “कवी केशवसुत” यांची कविता –
रांगोळी घालताना पाहून
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”
“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!


